शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट् फंड तर्फे संचालित होस्टेलला दिलेल्या भेटीदरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर केलेले मार्गदर्शनपर भाषण….
हैद्राबादच्या मुक्कामात दिनांक १४ नोव्हेंबर १९५४ रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट् फंड तर्फे संचालित होस्टेलला भेट दिली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलला भेट देणार असल्याने होस्टेलला लता-पल्लवांनी सुशोभित करण्यात आले होते. याप्रसंगी होस्टेलचे चालक श्री. शेरसिंग यांनी थोडक्यात होस्टेलचा अहवाल सादर केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेळाव्यापुढे भाषण केले.
शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट् फंड तर्फे संचालित होस्टेलच्या विद्यार्थ्यांपुढे केलेल्या भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
ज्या लोकांनी ही बोर्डींग काढली आहे, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर हैद्राबाद सरकारचेही आभार मानणे जरूर आहे. लोक आपणास नावे ठेवतील अशाप्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये. त्यांना मिळालेल्या या संधीचा वेळीच योग्य फायदा करून घेतला पाहिजे. माझ्यावेळची परिस्थिती फारच कठीण होती. आमची दहा बाय दहाची एक खोली होती. तीत सामान, कुटुंबातील दहा माणसे, एक बकरी व दोन पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागला आहे. मी फार अभ्यास केला असल्यामुळे लोक मला भितात. दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी दोन मिनिटात करतो (टाळ्या). याचे कारण मी फारच शिकलो आहे. तसेच तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही. परीक्षा कोणीही पास होतो. नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळविण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे. दगड फोडीचे काम करण्यात व कारकून बनण्यात काहीच फरक नाही.
या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती की, विद्या फक्त आम्हीच प्राप्त करू शकतो. परंतु हे साफ खोटे आहे. कोणा एका युरोपियनाने म्हटले आहे की, जगात सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक होत (टाळ्या). विद्या ही एक तलवार आहे. या तलवारीने कोणी कोणाची मान कापतो तर शीलवान मनुष्य तलवारीने कुणाचे रक्षण करतो. त्यासाठी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ-संध्याकाळ सामुदायिक वंदना करून बौद्ध तत्त्वाची उपासना केली पाहिजे. दर आठवड्याला वादविवादात्मक विषय ठेऊन कोणाला तरी बोलावून त्यावर व्याख्याने करविली पाहिजेत. तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकविले जात आहे. तेव्हा सुट्टीत घरी गेल्यावर आरोग्य व स्वच्छता याविषयी आई-वडीलांना माहिती सांगून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तुमच्या बोर्डिंगला जी आर्थिक मदत मिळत आहे ती तळ्यातील पाण्याप्रमाणे आहे. ती केव्हाना केव्हा आटणार हे निश्चित. यासाठी सरकारने कायम स्वरुपाच्या मदतीची सोय केली पाहिजे.
🔹🔹🔹
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
⚫⚫⚫
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर