June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्धांनी कसे वागावे ?

✍️ बौद्धांनी कसे वागावे ?

बौद्धांनी धम्माच्या निती-नियमांचे उल्लंघन करू नये. धम्मावर श्रद्धा असावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवावर देखील श्रद्धा असावी. धम्म पालन करण्यासाठी किमान त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, भीमस्मरण, भीमस्तुती तरी पाठ असावी. पंचांग प्रणाम करता आला पाहिजे. भिक्खूंना वंदामी भंते म्हणावयास पाहिजे. स्वर्गवासी न म्हणता कालकथित किंवा स्मृतीशेष असे शब्द वापरावे. जयभीम शब्दाचा’वापर नम्रतापूर्वक करावा. बावीस प्रतिज्ञा पाठ असाव्यात. बावीस प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन करावे म्हणजे अंधश्रद्धेतून मुक्तता होते. वेगळी संस्कृती निर्माण होते. देवाचे अस्तित्व मान्य करू नये. देव संकल्पना नाकारण्यास कोणतेही कर्मकांड करण्याची गरज भासत नाही. पूजाअर्चा, आराधना, उपवास, व्रत, नवस, कंदोरी, जागर, यज्ञ, पशू किंवा इतर वस्तू यज्ञात टाकणे, नामजप, देवाला दान, प्रदक्षिणा, कठोर व्रत, शरीराला त्रास देणे, अनवाणी चालणे, पात्र घालणे, असले कर्मकांड करण्याची गरज नाही.
विहाराशिवाय इतर कोणत्याही मंदिरात बौद्धांनी जाऊ नये. बुद्धाला, धम्माला, संघाला अनुसरावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अभ्यासपूर्वक धम्म पालनासाठी बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत. धम्म उल्लंघन करू नये, यासाठी तयार केलेल्या आहेत. दैनिक ‘सम्राट’ने त्या वारंवार प्रकाशित केलेल्या आहेत. बौद्ध बांधव ‘सम्राट’‌ वाचीत नाहीत. काही लोक जाणूनबुजून झोपेचे सोंग घेऊन धम्माचे उल्लंघन करतात. कर्मकांड करतात. अंधश्रद्धेच्या पूर्ण आहारी जातात. इतर मंदिरात जाऊन मार खातात.
बुद्धधम्म सत्यावर आधारित तर्कांच्या कसोटीवर बुद्धिप्रामाण्यावर विज्ञाननिष्ठ आहे. काल्पनिक मनाला न पटणाऱ्या भाकड कथांवर बौद्धांनी कदापि विश्वास ठेवू नये. प्रत्येक घटना सत्यशोधक दृष्टीने अभ्यासावी, खरे खोटे पाहूनच विश्वास ठेवावा. नितीनियम, धम्माचरण, नैतिक मूल्ये, करुणा, मैत्री, शील, अंधश्रद्धा विरहित कर्म दैनंदिन जीवनात पाळावे. पंचशील आपण पाळतो की, नाही याचे स्वतः परीक्षण करावे व कुशल कर्म करीत जगावे. स्वाभिमानाने जगावे. अन्याय सहन करू नये. जीवन सरळमार्गी नाही. संकटांशी धैर्याने तोंड द्यावे. संघर्ष करीत जगावे. गरीबीत समाधान मानू नये.
बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास करावा. सत्यशोधक खरे मानव सेवक दीनदलितांसाठी झटणारे अशा महान व्यक्तींनी निर्माण केलेले साहित्य व त्यांचे समाजोपयोगी कार्य त्यांच्या चरित्रातून वाचावयास मिळते. अशा महान व्यक्तींचे चरित्र व इतर साहित्य वाचावे. धम्माचा अभ्यास प्रचार व प्रसार करावा. धम्म स्वीकारल्यामुळे मानवाधिकार मिळाले, हे विसरता कामा नये. मानव विकास माणसाप्रती माणुसकी मनातून निर्माण होईल, असे बुद्धी विकसित करणारे, अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारे समग्र वाङ्मय वाचावे. श्रवण करावे. जगाला युद्धापासून परावृत्त करणारे बुद्ध तत्त्वज्ञान वाचावे व धम्माचे पालन करावे. अशी किमान आवश्यकता आहे. बौद्धांनी व बहुजन बांधवांनी व्यसनापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याची अपेक्षा आहे.
धम्म शिबीरे, धम्म मेळावे, धम्म परिषदा, धम्मीक चर्चा यामध्ये तन, मन, धनाने सामील व्हावे व समुपदेशनाचे पालन करून धम्म चळवळ चालू ठेवावी. धम्म मिशनने धम्म प्रचार व प्रसार करून सुसंस्कारित व्हावे. मानव हा उत्सव प्रिय आहे. यात्रा, धार्मिक मेळावे प्रिय आहे. विविध जाती धर्माचे पंथांचे उत्सव व सण आनंद म्हणून साजरे केले जातात. बौद्धांनी फक्त बुद्ध धम्माचेच सण, उत्सव साजरे करावे, हीच अपेक्षा आहे. इतर धर्माचे सण, उत्सव साजरे करू नये. सहभाग घेऊ नये. धम्म परिवर्तन दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, डॉ. बाबासाहेबांनी क्रांती केलेले स्मृती दिनच साजरे करावेत. इतर कोणतेही सण, उत्सव साजरे करू नयेत. सहभाग घेऊ नये. हार्दिक शुभेच्छा देऊन सहभागी होऊ नये. बौद्ध संस्कृती तसेच रितीरिवाज वेगळे आहेत, हे दाखवून द्यावे. काही गद्दार बौद्ध इतर सण, उत्सव साजरे करतात. त्यांना माफी मागावयास लावून वठणीवर आणले आहे. दोन डगरीवर पाय ठेवू नये. बुद्ध धम्माचा स्वाभिमान बाळगून वैयक्तिक व सामाजिक जीवन जगावे. वारंवार सांगून देखील कंदोरी करतात. नवस करून प्राण्यांचे बळी देतात. नवस करणे देवाला काहीतरी देणे, कबूल करणे, हे बुद्ध धम्मात मान्य नाही. हे मनावर पक्के बिंबवावे. बौद्धांनी गद्दार बनू नये. समाजानेही अकुशल कर्मात त्यांना साथ देऊ नये.
देवाच्या नावाने यात्रा, मेळावे भरतात. यात्रेत बहुजन समाज जास्त प्रमाणात आढळतो. बौद्धांनी बुद्धधम्माची पवित्र स्थळे आहेत तेथेच आवर्जून जावे. ऐतिहासिक बौद्धकालीन स्तूप, लेणी, विहार, स्मारके येथे सहली काढाव्यात. देशात तसेच परदेशात बुद्ध धम्माच्या पवित्र स्थानाला शक्य असेल, तेव्हा भेटी द्याव्यात. अनेक लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती विविध आकाराच्या भव्यदिव्य आहेत, त्या पहाव्यात. बुद्ध काळाच्या घटनांचा अभ्यास करावा. डॉ. बाबासाहेबांनी केलेली आंदोलने, मोर्चे निषेध केलेली विशिष्ट स्थळेसुद्धा पहावीत.
कोणताही विधी पार पाडताना समाजात सुसूत्रता असावी. उपासक किंवा बौद्धाचार्य आपल्या मतानुसार विधी पार पाडतात, अर्धवट गाथा म्हणू नये. कार्यक्रमानंतर सरणत्तय म्हटलेच पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमात विषयानुसारच भाषण द्यावे. विसंगत तत्त्वज्ञान सांगू नये.
सामाजिक ऐक्य असावे. क्षुल्लक कारणावरून एकमेकांची मने खराब करतात. एकमेकांचा द्वेष करतात. सामाजिक कार्यात फूट दाखवितात. द्वेषामुळे एक-दुसऱ्याच्या कार्यक्रमात भाग घेत नाहीत. किंवा वाघ्न आणतात. फुटीचा फायदा इतर समाज घेतो. अन्याय होतो. एकतेच्या अभावामुळे सामाजिक हानी होते. अन्याय, अत्याचार झालेल्या एकमेकाला मदत करीत नाहीत. ही बौद्ध समाजाची चूक आहे. सामाजिक एकता व एकीची शक्ती दाखवावी. आपसी भेद मिटले पाहिजेत. बौद्ध समाजात खेड्यात, शहरात एकता असावी. एकमेकांच्या सुख-दुःखात सहानुभूती दाखवून काया, वाचा, मनाने, धनाने सहकार्य करावे, द्वेष करणे हा सामाजिक दोष आहे. एकता दाखविण्याची अत्यंत गरज आहे, ही बौद्ध बांधवांकडून अपेक्षा आहे. सर्व विधी व सामाजिक कार्यक्रमामध्ये एकोपा दाखविणे हे प्रत्येक धम्मीयाचे कर्तव्य आहे. तसे बौद्धांनी वागले पाहिजे. धम्म विरोधी किंवा समाज विरुद्ध कोणी वागत असल्यास शांततेने समजावून सांगावे, न ऐकल्यास बहिष्कार टाकावा. सामाजिक शक्ती कोणालाही वठणीवर आणू शकते. केवढेही अधिकारी धनवान झाले, तरी धम्माला विसरू नका. बुद्ध धम्म अनेक राष्ट्रांत आहे. मानवाचे कल्याण करणारा, जातपात न पाळणारा समुद्रासारखा विशाल आहे. त्यातील तत्त्वे अंमलात आणावी. स्त्री-पुरुष समानता असणारा बुद्धधम्म होय.
राजकीय क्षेत्रात बौद्धांची अतिशय दयनीय अवस्था आहे. गटागटात समाज विखुरलेला आहे. लहान-मोठे अनेक पक्ष आहेत. संघटना आहेत. समाजात राजकीय एकता नाही. राजकीय स्वाभिमान नाही. राजकारणी अतिशय स्वार्थी आहेत. समाजाचे देणे-घेणे नाही. एक होत नाहीत. मते विभागली जातात. परिणामी आरपीआय पक्ष पराभूत होतो. राजकारणी नेते स्वार्थासाठी प्रस्थापित पक्षात काम करतात. त्यांचे गुलाम बनतात. स्वतंत्र अस्तित्व नाही, स्वाभिमान नाही. राजकीय सत्तेपासून कोसो दूर आहोत. राजकीय सत्ता संपादन करण्यासाठी गटतट मोडीत काढले पाहिजेत. एका झेंड्याखाली राजकारण करणे गरजेचे आहे. सत्तेशिवाय धम्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती होत नाही.
▪️▪️▪️
सौजन्य : लेखक : उ. भि. इंगोले