June 21, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ६

भाग – ६

जातिव्यवस्थेचे निर्मूलन अनुवादाच्या निमित्ताने

गांधीविरोधक म्हणजे देशद्रोही, स्वातंत्र्यविरोधक व ब्रिटिशांचे हस्तक अशा शेलक्या विशेषणांनी त्यांच्या विचारांना व कार्याला निकाली काढण्यात आले होते. परंतु म. गांधींना मात्र या घटनेचे महत्त्व समजत होते. त्यांचा तत्कालीन समाजमनावर प्रचंड प्रभाव होता. तरीही किंवा त्यामुळेच या भाषणावर प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत हे त्यांना कळत होते. त्यांनी ‘हरिजन’ मध्ये लेख लिहिला आणि बौद्धिक पातळीवरील एक संघर्ष-वादविवाद (डिबेट) सुरू झाला. म. गांधींच्या लेखनासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी मते व्यक्त केली आहेत, ती त्यांचा अभ्यास, त्यांचे बौद्धिक सामर्थ्य आणि आंतरिक तळमळ व्यक्त करणारी अशीच होती. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाजी मारल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे करार, राऊंड टेबल कॉन्फरन्समधील वादविवाद हा इंग्लंडमध्ये झाला व तो एक राजकीय वाद होता एवढेच चित्र भारताच्या वर्तमानपत्राने रंगविल्यामुळे ही बौद्धिक झटापट आपल्यापर्यंत पोहचण्यास खूप काळ जावा लागला. तो पूर्णपणे अभ्यासकांच्या समोर आला आहे असे आजही म्हणणे थोडे धाडसाचे होईल.

बुद्धिवादी आंबेडकर हे या देशाने अपवाद वजा करता स्वीकारले, असे दिसत नाही. या विधानाची सत्यता तपासण्यासाठी डॉक्टरांचे शैक्षणिक कर्तृत्व बघणे आवश्यक ठरेल. डॉक्टरांचे शिक्षण दापोली, सातारा, मुंबई येथील हायस्कूल व पुढे एल्फिन्स्टन कॉलेज येथे झाले. या संपूर्ण कालावधीत डॉक्टरसाहेब हे हुशार विद्यार्थी म्हणून या संस्थांनी दखल घेतल्याचे संदर्भ कुठेही मिळत नाहीत. मॅट्रिकनंतरचा सत्कारदेखील त्यांच्या समाजाने केला आहे. केळुस्कर गुरुजी, रा. ब. बोले यांनी त्यांचे कौतुक केले आहे. परंतु ‘अतिशय बुद्धिमान, कुशाग्र बुद्धीचा हा विद्यार्थी असल्याचे कोणी म्हटल्याचे आढळत नाही. याचा एक अर्थ असा निघू शकतो की, या सर्व प्रक्रियेत त्यांना आपल्या बुद्धीची चुणूक दाखविण्यास येथे संधी मिळालेली दिसत नाही. स्थळ, काळ, संस्कृती बदलली तेथे मात्र या गृहस्थाने जगाला अचंबित करावे एवढा बुद्धीचा साक्षात्कार घडवून आणला आहे. इ.स. १९१३ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्ती योजनेतून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. यावेळी कसलेही वलय ‘भीमराव रामजी आंबेडकर’ या नावाला नाही अशी परिस्थिती ! पण संधी मिळताच त्यांनी कोलंबिया विद्यापीठातील डॉ. गोल्डनवायझर यांच्या मानववंशशास्त्राच्या सेमिनारमध्ये ‘कास्ट्स इन इंडिया’ हा निबंध सादर केला. या सेमिनारमध्ये अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि जातिसंस्थेच्या प्रश्नांवर नवीन प्रकाश टाकणारा प्रबंध सादर केला. त्यात डॉ. श्री. व्यं. केतकर, सेनार्ट, नेसफिल्ड आणि सर एच. रिसले या जगप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांच्या जातिविवेचनावर डॉ. आंबेडकरांनी कोरडे ओढून त्यांचे विवेचन कसे कच्चे आहे हे आपल्या अभ्यासपूर्ण लेखनाने सिद्ध केले.

🔹संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर