भारताचे कायदेमंत्री डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना व घटनात्मक नीती यावर त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेटिव्ह चेंबरमध्ये केलेले भाषण ….
भारताचे कायदेमंत्री डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्मियांची परिषद आटोपून कोलंबोहून मुंबईस परत येत असतांना दिनांक १० जून १९५० रोजी, त्यांचे त्रिवेंद्रम येथील लेजिस्लेटिव्ह चेंबरमध्ये भाषण झाले. चेंबरच्या प्रशस्त हाॅलमध्ये सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अस्पृश्य बांधव यांची खूपच गर्दी होती. घटना व घटनात्मक नीती यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार प्रवर्तक व समयोचित असे भाषण केले.
घटना व घटनात्मक नीती यावर बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेन्टरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे आवश्यक आहे.
हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे आहे :–
सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्यांकांच्या नियमाचे पालन.
त्याचप्रमाणे सरकारनेही पुढील गोष्टी पाळल्या पाहिजेत :–
देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे, असे दिसून आल्यास घटनात्मक नीतीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकारपदाचा त्याग केला पाहिजे. अल्पसंख्यांकांबाबत आदर बाळगला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्यशासन निःपक्षपाताने चालविले पाहिजे.
आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहाणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की, घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटींवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिलेले असतात. त्यांना जर ही अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकारसूत्रे खाली ठेवली पाहिजेत.
अल्पसंख्यांकांबद्दल आदर
अल्पसंख्यांकांबद्दल सरकारने आदर बाळगला पाहिजे. अल्पसंख्याकांना आपली मते मांडण्याची योग्य संधी असावी. याच पायावर पार्लमेन्टरी लोकशाहीची उभारणी झालेली आहे.
त्याचप्रमाणे नि:पक्षपाती राज्यकारभार चालणे अवश्यक आहे. ब्रिटिश जनता कोणत्याही राजकीय पक्षाच्या लायकीचे मोजमापन त्याच्या गुणावरून करते. म्हणून एखादा पक्ष अधिकारावर आला तर त्याचे समाधान केले पाहिजे, त्याला खूष ठेवले पाहिजे, अशा वशिलेबाजीचा तेथे प्रश्नच उपस्थित होत नाही. भारतात मात्र अधिकारावर असलेला पक्ष काही लोकांना विशेष सवलती देतो असे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे.
जुन्या घातक प्रवृत्तीवर मात करून क्षुद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा छळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे. लोक या मार्गे लागतील अशी मला आशा आहे.
***
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर