June 21, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध धर्म हा पुन्हा या देशाचा धर्म होईल ‌- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

वरळी, मुंबई, महाराष्ट्र राज्य (भारत) येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने ” तथागत भगवान बुद्धाबद्दल आणि त्यांनी जगाला दिलेल्या अद्वितीय, मानवतावादी धर्माबद्दल जनतेस माहिती व्हावी या हेतूने ” भरविण्यात आलेल्या मेळाव्यात मध्यवर्ती सरकारचे कायदेमंत्री डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रविवार दिनांक १४ जानेवारी १९५१ रोजी केलेले भाषण…..

प्रिय भगिनींनो आणि बंधुजनहो,
मी या ठिकाणी उपस्थित झालो आहे तो तुमच्यापुढे व्याख्यान देण्याकरिता नव्हे. मला वाटले हा मेळा संपलासुद्धा असेल, पण काल माझे मित्र प्रो.भागवत मला भेटले व त्यांनी सांगितले की, मेळा पुष्कळ दिवस चालणार आहे. मला इथे येण्याइतका वेळ नव्हता; पण लोकांच्या आग्रहामुळे मला नाही म्हणता आले नाही आणि मी हजर झालो. अशा समारंभाला हजर रहाण्याचे परिणाम काय होतात हे मला चांगल्या त-हेने माहित आहे. मी आपणापुढे बोलण्यासाठी कसलीही पूर्वतयारी करून आलो नाही.

शतकानुशतके धर्माचा दिवस मानायचा झाला तर तो कोणता मानावा ? तर असे वाटते की शिवरात्र मानावी. राम जयंती वा कृष्ण जयंती मानावी. हिंदू धर्माच्या संस्कृतीने नियोजित केलेल्या दिवसाशिवाय दुसरा दिवस आमच्या मनात येत नाही. बुद्धाचा दिवस मानावा ही भावना कोणाच्याही मनात येत नाही ! आश्चर्य आहे ! असे का व्हावे, याचे कारण समजत नाही.

बुद्ध या देशात ८० वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची ४५ वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश कल्याणाकरिता तो जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पायी फिरला. १२०० वर्षापर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.

केंव्हा केंव्हा खोट्याचा जय होतो, ख-याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केंव्हातरी जय होईलच आणि आज ती वेळ आली आहे. १२०० वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे. ( प्रचंड टाळ्या )

हिंदू धर्म एका नाल्यासारखा आहे. दोन नाल्यांचा मिळून संगम होतो व त्याचा तिसरा नाला बनतो. तसा हिंदू धर्म त्या नाल्यासारखा झाला आहे. एका नाल्यातले पाणी स्वच्छ असते व दुस-यातील घाणेरडे असते. या दोहोंचा संगम घाणेरडा. तसेच हिंदू धर्माच्या नाल्यात दोन त-हेचे पाणी वाहून आले आहे. स्वच्छ असा बौद्ध धर्माचा नाला आणि ब्राह्मणी धर्माचा गलिच्छ नाला. या दोहोंच्या संगमामुळे हिंदू धर्माचा नाला घाणेरडा झाला आहे. त्यातील घाणेरडे आणि स्वच्छ पाणी निराळे केले पाहिजे. तरच घाण साफ करता येईल.

येथील भिक्षुमित्राने सांगितले की, पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी आणि माझे लोक मिळून आम्ही काही नियम करणार आहोत. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध हे चालणार नाही.

शिवाय ज्या हिंदू लोकांना बौद्ध दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राम्हणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मुळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही.

ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे व बौद्ध धर्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईंची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धर्मच पाळा इतर काही नाही.

हल्ली धर्माला ग्लानी आली आहे. पण मी म्हणतो की धर्माची सर्वांनाच आवश्यकता आहे. माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे, धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धर्मच पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्धाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील. मी आज २० वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्मच स्विकारायला पाहिजे, असे माझे मत झाले आहे.

विचार करा ! हा देश एका काळी सुसंस्कृत झाला होता म्हणून सांगतात. मग ५ कोटी अस्पृश्य त्यात कसे निपजले ? जवळ जवळ ५/७ कोटी लोकांना चो-यामा-या करण्याव्यतिरिक्त दुसरा जीवन मार्ग नसावा, हे कसे झाले ? अस्पृश्यता सांगणारा जगात एकही धर्म नाही. त्या काळच्या व आजच्या सुसंस्कृत पुढा-यांनी प्रयत्न का केला नाही ? चो-यामा-या करून जगणारी जात ज्या संस्कृतीत पैदा होते तिला सुसंस्कृती म्हणता येईल काय ? असल्या जमातींना सुधारण्याचा लोकांनी प्रयत्न केला नाही त्याअर्थी तीत काही तरी वैगुण्य निश्चित आहे. या हिंदू धर्मात ५ कोटी अस्पृश्य आणि ५-१० कोटी लोक चो-यामा-या करणारे का आहेत ? कारण या धर्मात दोष आहेत.

हे नवीन कार्य पारखून बघा. त्याचा अभ्यास करा; त्यात सामील व्हा ! या सुमंगल कार्यात आपण सामील झालात म्हणून मी तुमचे अभिनंदन करतो.

***

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे