June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्धांनी अस्तित्वाची तीन लक्षणे सांगितली आहेत – अनिच्च लख्खन (अनित्य लक्षण ) दुःख लख्खन (दुःख लक्षण ) अनात्त लख्खन (अनात्म लक्षण )

नैसर्गिक वस्तूच्या अस्तित्वाविषयी बुध्दाने कोणते विचार मांडले ते सर्वांना माहित असणे जरुरीचे आहे. सजीव व निर्जीव वस्तू विषयी तीन महत्वाची लक्षणे त्यांनी सांगितलेली आहेत ती खालीलप्रमाणे…

🌸 १. अनिच्च लख्खन (अनित्य लक्षण )

🌸 २. दुःख लख्खन (दुःख लक्षण )

🌸 ३. अनात्त लख्खन (अनात्म लक्षण )

🌸 १. अनिच्च लख्खन (अनित्य लक्षण ) : अनित्य लक्षण म्हणजे अशाश्वतपणा होय. प्रत्येक वस्तू ही बदलकारी आहे. नाशवंत आहे आणि ती अस्थिर व अविश्वसनीय आहे.  कोणतीच वस्तू शाश्वत नाही. सर्व वस्तू सतत नाश होत जातात. आपण त्या वस्तूला धरुन ठेऊ शकत नाही. आज मितीला ज्यास्थितीत आहे त्याच स्थितीत ती उद्या राहू शकत नाही किंवा नंतरच्या काळात राहू शकत नाही. उदाहरनार्थ आपण एका पेटल्या मेणबत्तीचे निरीक्षण करु, तिच्या ज्योतीविषयी विश्लेषण करु त्यातून काही विशेष लक्षणे स्पष्ट होतात सुरुवातीला मेणबत्ती पेटविल्यावर तिची ज्योत सतत वाढत जाते. काही वेळ सामान्य स्थितीत जळत राहते. नंतर हळूहळू संपताना कमी कमी होत जाते व शेवटी संपूर्ण संपताना नष्ट होते.

दुसरे उदाहरण सजीवांच्या जीवनचक्राचे पाहू.  तो प्राणी असेल, मानव असेल किंवा वनस्पती असेल. लहान मुल जन्मास येते. ते वाढू लागते, तरुण होते, नंतर वृध्द होते व आजारी पडून शेवटी मृत्यू येतो.  फूल उमलते नंतर काही वेळाने कोमेजते व शेवटी सुकून जाते.

अशाप्रकारे हे अद्वितीय विशेष लक्षण आपण निरीक्षण केल्यानंतर ध्यानात येते की ज्योत ही अशाश्वत आहे. त्याचप्रमाणे आपल्या ध्यानात येते की सर्व वस्तू ह्या बदलणाऱ्या आहेत व त्या अशाश्वत आहेत.

🌸 २. दुःख लख्खन (दुःख लक्षण ) : माणसाचा तथा प्राण्याचा असंतुष्ठपणाचा अनुभव म्हणजे दुःख होय, मानव प्राणी यांचे जीवन दुःखमय आहे. दुःख लख्खनाची चिन्हे क्लेश, दडपण, विफलता, वेदना, आजारीपणा, दुर्दैवीपणा, अस्थिरपणा वगैरे आहेत अशाश्वतपणाचे लक्षण म्हणजे दुख होय. संसारातील जन्ममृत्यूचे चक्र हे दुःखमय आहे अशी सूज्ञांची संकल्पना आहे.

थोडक्यात बोलावयाचे झाल्यास पृथ्वीवरील दुःखाची संकल्पना आपणास खालील यादीप्रमाणे दर्शविता येईल.

(१) जन्मामुळे दुःख,  (२) नाशामुळे दुःख,  (३) शारीरिक आजारीपणामुळे दुःख,  (४) मानसिक आजारामुळे दुःख, (५) मृत्यूमुळे दुःख,  (६) शोकामुळे दुःख.  (७) आक्रोशामुळे दुःख,  (८) आशाभंगामुळे दुःख,  (९) प्रियजनाच्या विभक्तीमुळे होणारे दुःख, (१०) अनिष्ठ वस्तूप्राप्तीमुळे होणारे दुःख,  (११) इच्छा अतृप्तीमुळे होणारे दुःख,  (१२) अप्रिय व्यक्तीच्या संघामुळे होणारे दुःख.  (१३) वाईट वातावरणात राहत असल्यामुळे होणारे दुःख

जागतिक सुख जरी प्राप्त झाले तरीही प्रसंगानुसार तेथेही दुःख प्रवेश करील.

🌸 ३. अनात्त लख्खन ( अनात्म लक्षण ) : प्रत्येक वस्तू ज्या अस्तित्वात आहेत त्या निरपेक्ष आहेत. प्रत्येक वस्तू निरपेक्ष आहे कारण त्या वस्तूचा असा स्वतंत्र भाग सापडू शकत नाही ज्याला आपणास स्वतंत्र म्हणता येईल. म्हणून आपणास कोणत्याच बाबीवर अधिकार सांगता येत नाही. उदाहरणार्थ आपण आपल्या शरीरास सांगू शकत नाही की तु आजारी पडू नको, तथा म्हातारपणास थांबवू शकत नाही. म्हणून म्हणता येईल की मानवी शरीर विविध घटकांचा संच आहे त्यात पांच वस्तूचे अस्तित्व आहे. शरीर, भावना, मन, मानसिक कार्य व जागृतपणा ह्या पांच घटकाला अलग करता येत नाही. यामध्ये कोणताच घटक कायमस्वरुपी नाही. त्यापैकी एक जरी नष्ट झाला तरी मागे काहीच राहत नाही.

सर्व सजीव व निर्जीव घटक चार बाबीपासून बनलेले आहेत. पृथ्वी, पाणी, तापमान व वायू मानवी शरीर आणखी पुढे बत्तीस घटकांचे बनलेले आहे. पाणी, रक्त, आलू, तेल, कफ, लाळ, अस्थी, दात, नखे, केस, मांस, यकृत, फुफ्फुसे, इत्यादी.

जर वरीलपैकी एखादा भाग योग्यप्रकारे कामकरीत नसेल तर त्या शरीराचे अस्तित्वह नाहीसे होते.

बुध्दाने स्पष्ट केले आणि आपल्या शिकवणूकीत सांगितले की प्राथमिक तीन वाईट बाबी इच्छा, द्वेष व मोह जर स्वतःमधील नष्ट झाले तर मनुष्य सर्वबाबीपासून मुक्त होईल व तेथे अज्ञानाचा नाश झालेला असेल. त्याने स्व: ओलांडलेले असेल. मन हे दिव्यत्वप्राप्ती झालेले असेल.