June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

जेष्ठ पौर्णिमा – सुजातास धम्म उपदेश

तपस्सु व भल्लीक यांची दीक्षा

▪ जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धाच्या जीवनात महान ठरली आहे. मंगलदायी ठरली आहे. या पौर्णिमेचे आपण महत्व जाणून घेतले पाहिजे. बौद्ध जगतात या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. सिद्धार्थ गौतमाला इ. स. पूर्व ५२८ ला वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती, सम्यकसम्बोधि प्राप्त होऊन तथागत सम्यक सम्बुद्ध होतात. आपल्याला मिळालेल्या सम्यक सम्बोधिचा आनंद घेण्यासाठी व पुन्हा पुन्हा त्या ज्ञानाची उजळणी करावी, यासाठी चवथ्या आठवड्यात जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी रत्नघरया स्थळी राजायतन या झाडाखाली बसले असता ब्रह्मदेशाचे दोन व्यापारी तपस्सु आणि भल्लीक हे तिथे आले. आणि तथागत भगवान ज्या झाडाखाली बसले होते त्यांच्या जवळच्या दुसऱ्या झाडाखाली सावलीत भोजन करण्यासाठी बसले असता त्यांच्या मनात तथागत भगवान बुद्धांना भोजनदान देण्याची प्रेरणा झाली. कारण हा साधू या झाडाखाली बसला आहे, हा विचार ते दोघे करतात आणि भगवान बुद्धाजवळ येऊन विनंती याचना करतात. भन्ते, भगवान, आम्ही आपणांस भोजन म्हणून आणलेल्या गोड पदार्थाचा आपण स्विकार करावा. आम्हांला बरे वाटेल, समाधान वाटेल. भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र पुढे केले आणि त्यांच्या गोड पदार्थाचा स्विकार केला. भोजन झाल्यावर तथागताने ह्या व्यापा-यांना आपला पहिला धम्म उपदेश केला. ते व्यापारी धम्म उपदेश ऐकून भारावून गेले आणि ते म्हणाले – आम्ही जन्मभर आपला हा उपदेश विसरणार नाही. तुम्ही आमचे जन्मभराचे गुरु म्हणून आम्ही आपला स्विकार करीत आहोत. आमचा उपासक म्हणून स्विकार करावा. तथागताचे हे व्यापारी प्रथम उपासक झाले. त्या दिवशी जेष्ठ पौर्णिमा होती. त्या व्यापा-यांनी भगवान बुद्धाच्या केश धातूवर ब्रह्मदेशात १५८ फूट उंच स्तूप बांधला आहे. या चैत्य विहाराच्या पत्र्यावर सोन्याचे पाणी झळाळते आहे. स्तूपाला सुवर्ण मंदिर असेही लोक म्हणतात. तेथील लोक या जेष्ठ पौर्णिमेला फार श्रद्धेने जमतात आणि पूजापाठ, वंदना, प्रवचन यांचे आयोजन केले जाते. हा स्तूप आजही ब्रह्मदेशात आहे.
जेष्ठ पौर्णिमेचे दुसरे महत्व असेही आहे की, तथागताने कपिलवस्तु नगरवासीयांना महासमय सुत्ताचा उपदेश केला होता. सर्व नगरवासीय नागरिक जमले होते. भिक्षु संघाला नगरवासियांनी भोजनदान, अर्थदान केले होते, असे दुसरे महत्व आहे.

धम्मशील सम्राट अशोकाने कलिंग देशावर स्वारी केली. युद्धात एक लाख माणसे मारली गेली आणि दिड लाख माणसे जखमी झाली होती. खूप प्राणहानी झाली. ती युद्धभूमी रक्तरंजीत झाली होती. सम्राट अशोकाला फार आनंद झाला होता. त्यावेळी भन्ते निग्रोध रस्त्याने चारिकेसाठी चालले होते. ‘बुद्धं सरणं गच्छामि’ असा निनाद ऐकून राजा आदराने भन्तेजींना वंदन करतो आणि मी जगात अजिंक्य राजा झालो, मला आता कोणीही विरोधी नाही, संपूर्ण देश माझ्या अधिपत्याखाली राहणार आहे, असे म्हणतो. भन्ते निग्रोध यांनी राजाला भगवान बुद्धांचा अहिंसावाद, मैत्री, करुणा, मानवता, समता यावर उपदेश केला. तो उपदेश ऐकून राजा प्रभावित होतो आणि त्या दिवशी ‘मी यापुढे युद्ध करणार नाही’ अशी प्रतिज्ञा करतो. त्यानंतर आठ वर्षे बौद्ध तीर्थ स्थळांना भेटी देवून त्यांचे दर्शन घेतो आणि शेवटी भन्ते उपगुप्त यांचेकडून उपासकाची दीक्षा घेतो व धम्म प्रसाराचे कार्य करतो. भिक्षुंना भोजनदान, अर्थदान करून धम्माचरण करतो. त्यावेळी भिक्षुंची संख्या खूप वाढली होती. दान व भोजन मिळत होते. आदरातिथ्य होत होते, म्हणून आळशी, आयतखाऊ ब्राह्मण लोक भिक्षु झाले होते. धम्म प्रसाराचे कार्य फार मंदावले होते. असे भिक्षु आपल्या दूषीत वागण्याने संघाला बदनाम करीत होते. ते थांबले पाहिजे, याकरिता भन्ते मोगलीपुत्त तीस्स यांचेबरोबर विचार विनिमय करून निवडक भिक्षुंची तिसरी धम्म संगिती (परिषद) घेण्याचे ठरविले. राजा अशोकाने पाटलीपुत्र येथे ही धम्म संगिती आयोजित केली. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर २३६ वर्षांनी ही धम्म संगीती झाली. या धम्म संगीतीत भगवान बुद्धांची वचने लिपीबद्ध करून दगडावर कोरण्याचे ठरविले. शिलालेख कोरणे, स्तंभ उभारणे आणि धम्म प्रसारासाठी परदेशांत भिक्षुंना पाठविणे असे ठरले. या धम्मसंगीतीत भिक्षूंच्या मागणीप्रमाणे आपली मुलगी संघमित्रा व मुलगा महामहेंद्र ही मुले संघाला दान दिली. संघमित्रा आणि महामहेंद्र यांना श्रीलंका येथे पाठविले. संघमित्राने बुद्धगया येथील पिंपळाची एक फांदी नेली होती. ती अनुराधापूर येथे लावली. त्या दिवशी जेष्ठ पौर्णिमा होती. महामहेंद्र आणि संघमित्रा यांच्या प्रेरणेने श्रीलंकेत अनेक स्त्रिया व पुरुष भिक्षुनी व भिक्षु झाले होते. आज श्रीलंकेत ८० टक्के लोक बौद्ध आहेत. या जेष्ठ पौर्णिमेला अनुराधापूर येथे लोक जमतात. बुद्धपूजापाठ, वंदना, सुत्रपठन करतात, प्रवचनाचे आयोजन करतात. या जेष्ठ पौर्णिमेला उपोसथ व्रत धारण करतात अशी जेष्ठ पौर्णिमा बौद्ध धम्मात महान ऐतिहासिक व पवित्र मानली जाते.

संकलन-Rahul JAVLE

98197 14898