July 29, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

विद्यार्थ्यांच्या ५२ दिवसांच्या आंदोलनाला यश BARTI च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर,

मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या ५२ दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होते. त्यांच्या आंदोलनाला  यश मिळाले आहे सरकारच्या निर्णयानंतर अनुसूचित जाती अनुसुचित जमाती च्या विद्यर्थान सोबत भेदभाव करून सरकारने बार्टीचा निधी कपात केला होता त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आंदोलन करत होते. ह्या आंदोलनात आंबेडकरी जनतेने सहभाग घेत येत्या १४ एप्रिल रोजी सरकार मधील मंत्री याना जयंती मध्ये सहभागी होऊ देणार नाही असा निर्णय घेतला होता तसेच आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या आंबडेकरी समाज यांच्या वतीने निर्धार करण्यात आला होता त्या मुळे सरकारने सरसकट फेलोशीप देण्याचा निर्णय मान्य केला.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याचवेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते. यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. त्यांचे स्वागत करतानाच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.

विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जल्लोष केला

बार्टीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (बीएएनआरएफ) ही फेलोशिप दिली जाते. दरवर्षी ठाराविक विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र महाज्योती आणि सारथी या संस्थांकडून ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप सरसकट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर बार्टीनेही सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यासाठी गेल्या ५२ दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध संस्था संघटनांनी पाठींबा दर्शविला होता. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यावेळी शिंदे यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत त्यांना दिलासा दिला. ही मागणी मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जल्लोष करत आनंद साजरा केला.