जातिव्यवस्थेचे निर्मूलन ( महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरासह )
डॉ. बी. आर. आंबेडकर
लाहोर येथील जात-पात तोडक मंडळाच्या १९३६ च्या वार्षिक परिषदेसाठी लिहिलेले परंतु
भाषणात व्यक्त केलेले विचार परिषदेला पटणार नाहीत या कारणास्तव स्वागतसमितीने परिषदच रद्द केल्यामुळे
न दिले गेलेले भाषण
भाग – १
जातिव्यवस्थेचे निर्मूलन अनुवादाच्या निमित्ताने
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातिनिर्मूलनासंबंधी विवेचन करणारे Annihilation of caste’ हे मूलभूत पुस्तक आहे. हे पुस्तक इ.स. १९३६ मध्ये प्रथम प्रकाशित झाले. इ.स. २०१२ साली या पुस्तकास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक पुस्तकाच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने या ग्रंथाचा मराठीत अनुवाद करून तो अल्प किमतीत जनतेस महाराष्ट्र शासनाकडून समितीच्या वतीने भेट द्यावा ही कल्पना पुढे आली व ती यानिमित्ताने थोड्या उशिरा का होईना पूर्ण होत आहे. याबद्दल आनंद वाटतो.
यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्थेसंबंधो १९१६ साली अमेरिकेमध्ये मानववंशशास्त्राच्या सेमिनारमध्ये “Caste in India: Their Origin and their Mechanism”, Genesis and Development या नावाचा निबंध सादर केला होता. तो एक उत्तम समाजशास्त्रीय अभ्यासाचा दस्तऐवज असल्याचा निर्वाळा समाजशास्त्राच्या मान्यताप्राप्त नियतकालिकाने दिला होता. या निबंधातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातिसंस्थेची वैशिष्ट्ये, विकास व कार्यपद्धती याबाबत विचार मांडले आहेत. जातीच्या उत्पत्तीबद्दलचे पाश्चात्त्य समाजशास्त्रज्ञ सेनार्ट, नेसफिल्ड, रिसले व भारतीय समाजशास्त्रज्ञ केतकर यांच्या विचारांचा परामर्श घेऊन त्यांच्या मर्यादाही दाखवून दिल्या होत्या. तसेच जातिसंस्थेच्या उत्पत्तीसंबंधीची स्वतःची स्वतंत्र अशी उपपत्ती मांडली होती. त्यानंतर जातिनिर्मूलन वा उच्छेदासंबंधी स्वतः ची अभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित मते पुढे त्यांनी ‘Annihilation of Caste’ या ग्रंथात मांडली आहेत.
हे पुस्तक म्हणजे १९३६ साली लाहोर येथील जात-पात तोडक मंडळाच्या न झालेल्या वार्षिक परिषदेचे अध्यक्षीय भाषण होय. या परिषदेच्या संयोजन समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची प्रकृती बरी नसताना केवळ स्वागतसमितीच्या तगाद्यामुळे हे निमंत्रण स्वीकारले होते. परंतु अध्यक्षीय भाषणातील वेदावरील व हिंदूधर्माच्या पवित्र ग्रंथाविषयीच्या व्यक्त ल्या मतांबद्दल संयोजन समितीचे प्रतिनिधी हर भगवान यांनी ही मते अध्यक्षीय भाषणातून काढून टाकावीत, असे त्यांना सुचविले. त्यावर आपल्या भाषणातील एक कानामात्रा अगर स्वल्पविरामही मी बदलणार नाही’ असे बाबासाहेबांनी उत्तर दिले. तसेच माझी मते पटली नाही तर स्वागतसमितीने असहमतीचा ठराव मांडून आपली नाराजी दाखविली तरी त्याचे मी स्वागत करेन.
🔹संकलन -नितीन संतोष पिंपळीसकर
More Stories
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ९
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ८
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ७