“गेल्या वीस वर्षात समाजाच्या प्रगतीची जबाबदारी माझ्या शिरावर होती, मी ती माझे कर्तव्य म्हणून समजतो. वीस वर्षांपूर्वी मी हे सामाजिक कार्याचे झाड लावले आहे. त्याला आता पालवी फुटली आहे. उद्या फळे येण्याचा रंग दिसत आहे. झाली ही प्रगती अखंड कशी राहील याची व्यवस्था करणे प्राप्त आहे. आतापर्यंतची कार्य झाले ते शुष्क, निष्फळ झाले असे कोणीही म्हणणार नाही आणि जो म्हणेल तो माझा शत्रू असला पाहिजे. मी म्हणतो ते सत्य आहे. हे कार्य पायाशुद्ध आहे. कोणापुढेही दात विचकण्याचा प्रसंग न येईल अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
माझ्या कार्याचा इतिहास जर कोणी लिहिला तर तो बराच मोठा होईल असे मला वाटते. पण माझ्या पश्चात तुमचे काय? अजून दिल्ली बहुत दूर—-‘ अजून पुष्कळ मजल मारायची आहे’. हा एक खांबी तंबू मी उभारला आहे. त्यास चोहोकडून खुंट्या मारून मजबूत करणे आवश्यक आहे. तसे न केले तर उंचावर गेलेला पतंग कनी कापल्यानंतर जसा खाली येतो तशी तुमची स्थिती होता कामा नये. माझ्या नंतरही तुमचा मार्ग फार दूर आहे. तो सुखकर व्हावा म्हणून मी हे कार्य करत आहे, तरी बंधू-भगिनींनो या कार्यास नेटाने सुरुवात करा.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग- २, पान नं. ३५७)
रविवार दि. २४ नोव्हेंबर १९४०रोजी श्री सोमवंशीय समस्त मंडळ, चिखलपाडा फोरास रोड, मुंबई येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
आता पालवी फुटली आहे उद्या फळे येण्याचा रंग दिसत आहे.

More Stories
“मुंबई महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ?” – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर