१२ मे १९५६ रोजी ‘ ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग काॅर्पोरेशन ‘ च्या नभोवाणी केंद्रावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
मला देण्यात आलेल्या अल्पवेळात मला दोन प्रश्नांचा शोध घ्यावयाचा आहे. एक म्हणजे, मला बौद्ध धम्म का प्रिय आहे ? आणि दुसरा म्हणजे, वर्तमान परिस्थितीत तो जगासाठी कसा उपयुक्त आहे ?
इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बौद्ध धम्मात मात्र ज्या तीन तत्त्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे, तसा इतर धर्मांमध्ये दिसून येत नाही. हा धम्म प्रज्ञा (अंधश्रद्धा आणि अलौकिक घटनांविरूद्ध आकलनशक्ती), करुणा (प्रेम) आणि समतेची शिकवण देतो. मनुष्याला या पृथ्वीवर सुखमय जीवन व्यतीत करण्यासाठी यापेक्षा वेगळे काय हवे ? म्हणून ही तीन तत्वे देणारा बौद्ध धम्म मला आकृष्ट करतो. जगाला तारण्याचे सामर्थ्य न ईश्चरात आहे, न आत्म्यामध्ये. ही तीन तत्त्वेच जगाच्या दृष्टीने तारक आहेत.
एक बाब अशी आहे की, जी जगाच्या, विशेषतः आग्नेय आशियाई देशांच्या संदर्भात विशेषत्वाने आकृष्ट करणारी ठरू शकते. जग सध्या कार्ल मार्क्स आणि त्यांनी जन्माला घातलेला साम्यवाद यांच्या आवर्तात सापडलेले आहे. हे आव्हान अतिशय गंभीर आहे. सर्व देशांच्या धार्मिक प्रणालींचा पाया या आव्हानामुळे हादरला आहे. याचे कारण म्हणजे मार्क्सवाद आणि साम्यवाद निधार्मिक बाबींशी निगडित आहेत. सध्याच्या धार्मिक अधिष्ठानाला बसणारा हा धक्का समजावून घेणे कठीण नाही. आजची धार्मिक प्रणाली जरी निधार्मिक रचनेपासून अलिप्त असली तरी याच प्रणालीच्या आधारावर प्रत्येक निधार्मिक बाब टिकून आहे. दूरान्वयाने का होईना, धर्माची मान्यता असल्याशिवाय निधार्मिक रचना फार काळ टिकणे शक्य नाही.
आग्नेय आशियातील बौद्ध राष्ट्रांची मानसिकता साम्यवादाकडे झुकलेली पाहून मला आश्चर्य वाटते. मी तर असेच मानतो की, त्यांना बौद्ध धम्माचे आकलन झालेले नाही. मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांना परिपूर्ण उत्तर बौद्ध धम्मात आहे असा माझा ठाम विश्वास आहे. रशियन पद्धतीच्या साम्यवादाने रक्तरंजित क्रांती हे समर्थनीय साधन मान्यच केले आहे. साम्यवादी प्रणालीसाठी आसुसलेल्या लोकांना कदाचित हे माहीत नसावे की बौद्ध धम्मातील ‘ संघ ‘ हे एक साम्यवादी संघटनच आहे. त्यामध्ये खाजगी मालमत्तेला जागा नाही आणि विशेष म्हणजे हे परिवर्तन हिंसेतून आलेले नाही. मानसिक परिवर्तनातून झालेला हा बदल गेली २५०० वर्षे टिकून आहे. अर्थात या रचनेत प्रदीर्घ काळात काही विचलन झाले असेल, परंतु त्यातील आदर्श मात्र आजही अनिवार्यपणे दिसून येतात. रशियन साम्यवादाने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
त्यांनी आणखी दोन प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. एक साम्यवादी रचना ही सर्वकाळ असणे आवश्यक आहे काय ? मला हे मान्य आहे की रशियनांना एरवी जी कामे जमली नसती ती साम्यवादी चौकटीमुळे करणे शक्य झाले. परंतु ही कामे झाल्यानंतर तेथील लोकांना बुद्धाने उपदेशिलेले प्रेमासह स्वातंत्र्य का मिळू नये ? ते मिळत नाही यावरूनच दक्षिण आशियाई देशांनी सावध व्हावे आणि रशियन साम्यवादाच्या जाळ्यात अडकू नये, अन्यथा त्यामधून ते कदापि बाहेर पडू शकणार नाहीत. त्यांना हे आवश्यक आहे की, त्यांनी बुद्धाची शिकवण अनुसरावी आणि तिला राजकीय रचनेत सम्मीलित करावे. दारिद्र्य पूर्वीही होते आणि पुढेही राहणार आहे. रशियातसुद्धा दारिद्र्य आहेच. म्हणून दारिद्र्याचे कारण पुढे करून मानवी स्वातंत्र्याचा बळी देणे सुज्ञपणाचे नव्हे.
दुर्दैव हे आहे की बुद्धाच्या शिकवणीचा अन्वयार्थ लावणे व आकलन होणे या गोष्टी नीट झालेल्याच नाहीत. त्यांची तत्त्वे आणि सामाजिक पुनर्रचना याबाबत पूर्णत: गैरसमज झालेला आहे. बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्त्वप्रणाली आहे हे सर्वांना समजल्यानंतरच त्याचे पुनरुज्जीवन ही एक शाश्वत घटना घडेल. कारण सर्वांना आकृष्ट करणारी किंवा प्रभावित करणारी कोणती महानता या धर्मात आहे ते जगाला कळलेले असेल.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर