रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषदेत ( चिपळूण येथे ) दिनांक १४ एप्रिल १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
रविवार दिनांक १४ एप्रिल १९२९ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद भरविण्यात आली होती. ह्या परिषदेसाठी मुद्दाम मुंबईहून श्री. देवराव नाईक, द. वि. प्रधान, भा. र. कद्रेकर, शंकरराव गुप्ते, शंकर वडवलकर, श्री. शिवतरकर, बाबा आडरेकर, गायकवाड, मोरे वगैरे मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर आली होती. या परिषदेला स्थानिक मंडळीपैकी इतर समाजातील मंडळीही बरीच आली होती. श्री. विनायकराव बर्वे, साठे, श्री. राजाध्यक्ष, खानसाहेब देसाई, पिता-पुत्र बेंडके, शिवराम जाधव वगैरे स्थानिक मंडळी दिसत होती.
या परिषदेच्या सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेच्या अध्यक्षपदी रीतसर स्थानापन्न झाल्यानंतर श्री. रगजी यांचे भाषण झाले. यानंतर श्री. बेंडके यांनी रायबहादूर बोले ॲड., आनंदराव सुर्वे, श्री. साळवी, सबजज्ज वगैरे मंडळींचे संदेश व तारा वाचून दाखविल्या. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या गजरात भाषणासाठी उभे राहिले.
रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषदेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
मला असे वाटते की, माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच असावा. मी देखील मजूर वर्गापैकी एक असून, इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर बॅरिस्टरप्रमाणे मला देखील बंगल्यातून राहता आले असते पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधुंकरिता चाळीत राहूनच काम केले पाहिजे. याबद्दल मला केव्हाही वाईट वाटत नाही. मला मुंबईला येऊन अवधी चार वर्षे झाली. अत्यंत हीन मानलेल्या समाजात जन्म झाल्यामुळे त्याच समाजासाठी जीवापाड मेहनत करणे मला भाग पडले आहे. तशात अस्पृश्य कामगारांना इतर कामगारांचे हक्क मिळवून देणे माझे कार्य आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी श्री. बेंडके यांचा परिचय झाला. त्यांनी खोती प्रकरणाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे व ती मी मान्य केली आहे. खोती पद्धतीचा फायदा व तोटा याचा विचार करून त्यासंबंधी नक्की योजना बिलांच्या रुपाने कायदेकौन्सिलात आणणे माझे कर्तव्य आहे. खोतीसारखी दुष्ट पद्धत कशी अंमलात आली याचे मला मोठे आश्चर्य वाटते. ह्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या चित्ताला शांती नाही. काबाडकष्ट करून तयार केलेल्या शेतीवर धनिकांनी ” आयत्या बिळावर नागोबा ” या नात्याने हल्ला करून त्या आपल्या ताब्यात घ्याव्या ? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवन चारी बाजूंनी संकटात राहिले तरी धनिकांना व खोतांना त्याची पर्वा नसते. अशा वेळी श्रमजिवी शेतकऱ्यांच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ सरकारने मिळवून दिले पाहिजे. माणसाच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे आणि अशा बाबतीत सरकारने गरिबांची दाद घेतली नाही तर ते सरकार सुधारलेले आहे असे म्हणता येणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील एक जुलमी खोत आपल्या अधिकाराचा अतिरेक स्त्रियांच्याही अब्रूवर घाला घालून करू शकतो. शेतकरीवर्ग आज खोती पद्धतीमुळे गुलामगिरीत खितपत पडला आहे. सत्तेचा दुरुपयोग ही न्यायनीती आहे असे कसे म्हणता येईल ! ब्रिटिश राज्यात चाललेली गुलामगिरी सरकारला नालायक ठरवित आहे. अन्यायाच्या चौकटीवर कोणत्याही समाजात स्वास्थ निर्माण होणार नाही. शांतता टिकवायची असेल तर सरकारने न्याय दिला पाहिजे ; न्यायी सरकारने इतके दिवस खोती पद्धती चालू ठेविली ही गोष्ट अन्यायाची आहे. सरकारी रानावर खोतांनी हक्काचा अंमल गाजवावा आणि कुळांना जुलुमाखाली नाहक छळावे हे काय गौडबंगाल आहे हेच कळत नाही. सारासार विचार करता खोतीची पद्धत मुळासकट सदोष आहे. सरकार कधीही लहानसहान ओरडीला भीक घालीत नसते. तुम्ही तुमची चळवळ अत्यंत धिटाईने चालू ठेविली पाहिजे. आपल्यावरील अन्यायाची ओरड सारखी करीत राहून उलटपक्षाशी लढत राहिले, तरच चारपाच वर्षात स्वराज्याला पोषक असे हक्क मिळणार आहेत. आजतागायत चळवळी करताना सरकारची मिनतवारी करावी लागत असे. पण चारपाच वर्षांनी पूर्ण सत्ता स्थापन होणार आहे. कौन्सिलमध्ये तुमच्या प्रांतातर्फे प्रतिनिधी पाठविताना योग्य काळजी घ्या. काही झाले तरी कुणाच्या भिडेस बळी न पडता आपल्या मताला पाठिंबा देणारा मनुष्य कौन्सितात पाठविला पाहिजे. तावून सुलाखून प्रतिनिधी पाठवा, खोतांना व खोतांच्या जातभाईंना मते देऊन कौन्सिलात पाठवू नका. समाजाचे जीवन परस्वाधीन असल्यामुळे एकमेकावर अवलंबून राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. कुणबी लोकांनी आपल्या स्वाभिमानाला जागून वरिष्ठ लोकांची हलकीसलकी कामे करून स्वतःचा सामाजिक दर्जा मुळीच कमी करून घेऊ नये. स्वावलंबन आणि स्वाभिमान बाळगून आपण आपले कार्य नेटाने करताना ऐक्य व संघटना स्थापन करा. आणि अशा एकोप्याच्या संघटनेच्या चळवळीने आपल्या गाऱ्हाण्यांची दाद कौन्सिलपर्यंत जाऊन लावून घेता येईल. असल्या नेटाच्या प्रयत्नांचा परिणाम खात्रीने यशस्वी होईल याची मला खात्री वाटते.
🔹🔹🔹
अध्यक्षांच्या भाषणानंतर खालील ठराव एकमताने पारित करण्यात आला. —
” खोतीपद्धत ही निखालस गुलामगिरी आहे, ह्या पद्धतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरीवर्ग सर्वस्वी खोताचा ताबेदार झाला आहे. उपरी कुळांची दशा तर होतेच होते पण पोचपावती देण्याची पद्धत अस्तित्त्वात नसल्यामुळे कायम धारेकऱ्यांचे हक्कही सुरक्षित राहात नाहीत. आर्थिकदृष्ट्या खोतीपद्धत कुळांना घातक आहे, इतकेच नव्हे तर, नैतिकदृष्ट्याही ही पद्धत विघातक असून कुळांना कोणत्याही प्रकारे सुस्थिती करून घेण्यास स्वातंत्र्य उरत नाही. अशा या खोती पद्धतीचा ही परिषद तीव्र निषेध करते व ती नाहीशी करावी अशी सरकारास आग्रहाची सूचना करते.”
वरील ठरावावर श्री. रगजी, श्री. बेंडके यांची भाषणे झाली. याशिवाय किरकोळ ठराव पास झाल्यावर या परिषदेचे काम सायंकाळी ७ वाजता संपले. ” डॉ. आंबेडकर की जय ” ह्या घोषणेत, आभार प्रदर्शन व पानसुपारीच्या समारंभानंतर परिषद बरखास्त करण्यात आली.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर