मु. बेळगाव, (कर्नाटक) येथे भरलेल्या बेळगाव जिल्हा बहिष्कृत वर्गाच्या सामाजिक परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण…..
मु. बेळगाव येथे श्री. सीताराम नामदेव शिवतरकर यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव जिल्हा बहिष्कृत वर्गाची सामाजिक परिषद दिनांक २३ मार्च १९२९ रोजी भरली होती. यावेळी परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. डी. आर. इंगळे यांनी नियोजित अध्यक्षांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले व उत्तम शृंगारलेल्या गाडीतून श्री. कोंडदेव श्रीराम खोलवडीकर यांच्यासह नियोजित अध्यक्षांची मिरवणूक काढली. या वेळी अस्पृश्य वर्गातील हुनर्गे येथील बॅंडवाल्यांनी बॅंडवादन करून लोकांना तल्लीन केले. ही मिरवणूक कलभाट रस्ता, लष्कर, हजाम गल्ली, कंगराळ गल्ली, दरबार गल्ली आणि चबाट गल्लीतून कर्नाटक बहिष्कृत विद्यार्थी आश्रम, बेळगाव येथे पोचली.
बेळगाव येथील विद्यार्थी आश्रमाच्या आंबराईत शनिवार दिनांक २३ मार्च १९२९ रोजी दुपारी चार वाजता ही परिषद सुरू झाली.
सुरवातीला विषय नियामक कमेटी बसून ठरावाचा मसुदा तयार करण्यात आला होता. या प्रसंगी अस्पृश्य वर्गाच्या सुधारणेकरिता नेमलेल्या स्टार्ट कमेटीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सोलंकी, मेसर्स जानवेकर, देशपांडे, रावसाहेब चिकोडी, रावसाहेब थोरात तसेच रा. मराठे, रा. गजेंद्रगडकर, नागगौडा इत्यादि बेळगावातील स्पृश्य पुढारी याजप्रमाणे रा. कोंडदेव खोलवडीकर, दत्तोपंत पवार, डॉ. रमाकांत कांबळे, रा. यशवंतराव पोळ आणि रामाप्पा कांबळे, धर्मान्ना सांब्राणी इत्यादि अस्पृश्यांचे पुढारी हजार होते.
सभेच्या सुरूवातीला ईशस्तवन व अध्यक्षांच्या स्वागतपर गीतगायन झाले. त्यानंतर स्वागताध्यक्षांचे अगदी मननीय, प्रतिपक्षास चीत करणारे असे सडेतोड भाषण झाले. त्या भाषणाचा लोकांच्या मनावर फार परिणाम झाला व त्यापासून स्पृश्यांनाही बोध घेण्यासारखा होता व त्यांच्यावरही चांगला परिणाम झाला. त्यानंतर परिषदेचे ठराव पास करण्यात आले.
त्यानंतर अध्यक्षांच्या विनंतीवरून आणि लोकाग्रहावरून अस्पृश्यांचे उद्धारक व पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणास सुरुवात केली.
बेळगाव जिल्हा बहिष्कृत वर्गाच्या सामाजिक परिषदेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
अध्यक्ष साहेब आणि सभ्यगृहस्थहो,
आता वेळ बराच झालेला आहे. पाऊस पडण्याच्या बेतात आहे व तशात आपल्या मातृभाषेपेक्षा माझी मातृभाषा निराळी आहे. भाषाभिन्नत्त्वामुळे माझे विचारही आपणास समजतील किंवा नाही, याबद्दल शंका वाटते. तरी मी माझे भाषण अगदी थोडक्यात आटोपणार आहे.
आपण ठिकठिकाणी सभा भरवतो, भाषणे करतो, ठराव पास करतो. मोठमोठ्या वक्त्यांना आणून त्यांची भाषणेही करवितो ; तथापि, माझ्या मते अस्पृश्यता नष्ट करण्याचा हा काही मार्ग नव्हे. आपल्यावर अन्याय, जुलूम, त्रास होतो या संबंधाने ठराव पास करून सरकारकडे पाठविले आणि हेही समजा की, सरकारने आपली अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपणास सार्वजनिक विहीरी, तलाव, चहाची हॉटेले आणि देवालये जरी कायद्याने मोकळी केली तरी त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आपणाला केल्याशिवाय गत्यंतर नाही व तशाप्रकारे आपण अंमलबजावणी करण्यास असमर्थ असू तर कितीही चांगले कायदे केले तरी त्यांचा उपयोग होणार नाही.
आपली अस्पृश्यता आपणच घालविली पाहिजे ! व त्यादृष्टीने आपण सबळ व निर्भय होण्यानेच आपली अस्पृश्यता जाणार आहे. या बाबतीत आपणास बरेच कष्ट करावे लागतील व प्रसंगोचित आपणास स्पृश्यांशी दोन हात करण्याचा प्रसंग येणार आहे व त्यासाठी आपण हिम्मत बाळगली पाहिजे. आपला समाज परावलंबी आहे व हे चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. अस्पृश्य समाज स्पृश्य समाजाशी सहकार्याने वागल्याशिवाय त्याचा तरणोपाय नाही ! अशा प्रबळ समाजाशी असहकारिता पुकारून आपला कार्यभाग कसा साधणार असे पुष्कळ लोकांना वाटते. परंतु बहिष्कृत समजातील लोकांनी हे पक्के लक्षात ठेवावे की, आपला स्वावलंबनाच्या अबाधित मार्गाशिवाय अन्य मार्ग निकामी व घातकी असल्यामुळे ते प्रयत्न सर्वस्वी ताज्य होत.
अस्पृश्य समाजात कसलाही मनुष्य असो, तो मनुष्य कितीही सर्वगुणसंपन्न असो ! कितीही विद्वान असो ! तथापि, तो एका विशिष्ट समाजात जन्मला एवढ्याच कारणास्तव त्याच्या गुणाचे चीज होत नाही. करिता आपण आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारले पाहिजे ! हे धोरण स्वीकारल्याशिवाय या धक्काबुक्कीच्या मामल्यात आपणास गत्यंतर नाही.
आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा अत्यंत महत्वाचा दुसरा उपाय म्हणजे सरकारी सत्ता प्राप्त करून घेणे होय ! आपल्याला चातुर्वर्ण्याच्या चौकटीबाहेर असावे लागते तरी ही चातुर्वर्ण्याची चौकट मोडून आत जावयाचे असेल तर आपणास राजकीय सत्ता हवी. राजकीय सत्ता हातात असल्याशिवाय समाजात आपणास वर्चस्व प्राप्त होणार नाही. हल्ली महाराष्ट्रातील ब्राम्हणांचेच एवढे वर्चस्व का आहे ? याचे कारण दुसरे काहीही असले तरी त्यांच्या हातात राजकीय सत्ता प्रबळ आहे हे विसरून चालणार नाही.
हल्ली महाराष्ट्रातील ब्राम्हणांचे इतके वर्चस्व का ? याबद्दल इतिहास प्रसिद्ध एक गोष्ट सांगतो. पेशवाईपूर्वी माझ्या प्रांतात राहणारा बाळाजी विश्वनाथ आणि त्याचे जातभाई चित्पावन ब्राम्हण अत्यंत निकृष्ठावस्थेत होते. परंतु त्यांच्या हातात राजकीय सत्ता आल्याबरोबर त्या समाजाने महाराष्ट्रात प्रमुख स्थान पटकावले आहे. परंतु आज ब्राम्हण समाजाची सरकारी नोकरीतून कायमची हकालपट्टी केली तर ब्राम्हणांचे यत्किंचीतही वर्चस्व राहणार नाही. इतर प्रांतात ब्राम्हणांचे कोणत्याही प्रकारचे महत्व नाही. गुजरातमध्ये ब्राम्हणांना पाणकी आणि स्वयंपाकी याशिवाय महत्व नाही. संयुक्त व पंजाब प्रांतातील ब्राम्हण हे महार, मांगाप्रमाणे ओले अन्न मागून खातात. एकंदरीत आपले हक्क प्रस्थापित करण्याबद्दलचे आपले चढाईचे धोरण व राजकीय सत्ता प्राप्त करून या दोन साधनांनीच आपली अस्पृश्यता आपणास घालवून टाकता येईल व इतर समाजाशी बरोबरीचा दर्जा आपणास प्राप्त करून घेता येईल. एवढे सांगून, आपण माझे भाषण शांतपणे ऐकिले याबद्दल आपले आभार मानून मी माझे भाषण पुरे करितो.
परिषदेत पास झालेले ठराव यावर मेसर्स माने, वराळे, आसोदे, इंगळे, कोंडदेव श्रीराम खोलवडीकर, कोल्हापूरचे पोळ (ढोर) व धारवाडचे सांब्राणी (ढोर) या प्रसिद्ध पुढारी लोकांची भाषणे झाली. नंतर हारतुरे देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारात सभेचे काम संपले.
बेळगाव जिल्हा बहिष्कृत वर्गाची सामाजिक परिषद
अधिवेशन १ ले यात पास झालेले ठराव :-
ठराव १ ला –
(अ) अस्पृश्यता मानणे हा कायद्याने गुन्हा समजला जावा.
(ब) सरकारी लिस्टातून जातीची सदरे अजिबात गाळून टाकावीत.
ठराव २ रा –
(अ) जन्मावरून कोणासही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ न समजणे. वेद, शास्त्र, पुराण व इतर धर्मग्रंथ यात जन्मावरून उच्चनीचत्वाचे प्रतिपादन केले असल्यामुळे या धर्मग्रंथांचा अधिकार न मानणे.
(ब) वर्णाश्रम धर्माने हिंदू समाजात ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे भेद पाडिले आहेत, म्हणून वर्णाश्रम धर्माच्या घातुक तत्वांचा ही परिषद तीव्र निषेध करिते व आपली जात किंवा समाज दर्शविणारे शब्द आपल्या नावामागे व पुढे जोडू नयेत.
(क) राष्ट्राच्या प्रगतीकरिता व समता प्रस्थापित करण्याकरिता अस्पृश्यतेची रूढी ताबडतोब नाहीशी करणे अत्यंत जरूर आहे; म्हणून समजाच्या अगर कायद्याच्यादृष्टीने कोणतीही जात उच्च अगर नीच समजली जाऊ नये. तसेच प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा समान हक्क असून, तो हक्क प्रत्येकाने बजाविला पाहिजे.
ठराव ३ रा – सरकारच्या धार्मिक बाबतीतील वृत्तीमुळे असंख्य आशा बहुजन समाजास अपमान सहन करावा लागत आहे. त्यांच्या सामाजिक हक्काचा अपहार झालेला आहे आणि त्यांची प्रगती खुंटलेली आहे. म्हणून यापुढे सरकारने धार्मिक बाबतीतील तटस्थपणाचे धोरण सोडून द्यावे आणि बहुजन समाजाचे सामाजिक स्वातंत्र्य रक्षण करण्याचे प्रयत्न करावे, तसेच या बाबतीत समाजसुधारकांच्या वतीने प्रचलित कायद्यात फरक करावा.
ठराव ४ था –
(अ) सरकारने सर्व दरखास्त जमीनी इत:पर ज्या समाजातील लोकांची सांपत्तिक स्थिती फारच हलाखीची असते अशा लोकांना द्याव्या आणि अशा जमीनी देताना त्या प्रथम अस्पृश्य लोकांना देण्यात याव्या. या परिषदेचे आणखी असे मत आहे की, सरकारने त्यांना उदारपणे ज्यादा रकमा ग्रँट म्हणून देऊन अशा जमिनीची डागडुजी करून मशागत करण्यास उत्तेजन द्यावे आणि सरकारी नोकर्यात अस्पृश्यवर्गीय उमेदवारांचा भरणा करणेची सरकारने उदारपणाने तरतूद करावी.
(ब) अस्पृश्य वर्गातील साक्षरतेचे प्रमाण इतर समजातील साक्षरतेचे प्रमाणाबरोबर येईपर्यंत अस्पृश्य वर्गातील विद्यार्थ्यांकरिता दरेक जिल्ह्यात १०० मुलांचे बोर्डिंग काढावे.
ठराव ५ वा –
रा. सा. पापण्णा यांचा मुलगा नारायण यांच्या मृत्यूबद्दल ही सभा दु:ख प्रदर्शित करते. ईश्वर मृताच्या आत्म्यास शांती देवो अशी सभेची ईश्वरास प्रार्थना आहे.
ठराव ६ वा –
चांभारांच्या धंद्याची स्थिती अत्यंत हलाखीची झाली असल्यामुळे त्यांचे धंदेशिक्षणाचे वर्ग काढावे व त्या समजातील लोकांनी सहकारितेच्या तत्वावर चालविलेल्या संस्थांना , सरकारने सढळ हाताने मदत करावी आणि त्यांच्यातील लायक विद्यार्थ्यांस सरकारी खर्चाने त्यांच्या धंद्याचे शिक्षण घेण्याकरिता परदेशी पाठवावे असे या परिषदेचे मत आहे.
ठराव ७ वा –
(अ) मुलाचे वय वीस वर्षांचे असल्याशिवाय व मुलीचे वय १६ असल्याशिवाय त्यांची लग्ने करू नयेत.
(ब) कोणत्याही जातीतील, वर्गातील व समाजातील स्त्री-पुरुषास मिश्र विवाह करण्याची पूर्ण मोकळीक असावी.
(क) लग्न किंवा इतर उत्सव यात अस्पृश्य वर्गांनी शक्य तितका पैसा व वेळ कमी खर्च करावा तसेच सर्व लग्नविधीत एक जेवणापलीकडे अधिक पैसा खर्च करू नये आणि उरलेल्या पैशाचा विनियोग आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाकडे करावा.
ठराव ८ वा –
ज्या हॉटेलमध्ये व खाणावळीत अस्पृश्य वर्गास मज्जाव करण्यात येतो अशी हाॅटेले व खाणावळी सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊ नये. तसेच रेल्वेच्या ताब्यात असलेली हाॅटेले व खाणावळी यामध्ये अस्पृश्य वर्गांना समतेने वागविण्याचा रेल्वे अधिकार्यांनी प्रयत्न करावा.
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर