February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

……तर आपली स्वतंत्र युनियन स्थापावी – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

नागपूर येथे विद्यार्थ्यांतर्फे स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी व कामठी मुक्कामी खाजगी चर्चेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले मार्गदर्शन….

दिनांक ११ मे १९३८ रोजी नागपूर येथे सकाळी ८ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यातर्फे स्वागत करण्यात आले.

त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्याभ्यास संपल्यावर समाज कार्य हाती घ्यावे व समाजाची सेवा करावी वगैरे आशयाचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ४.३० पर्यंत बाबा कचेरीत गेले व नंतर संध्याकाळी ६ वाजता कामठी मुक्कामी पोचल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे व श्री. हरदास एल. एन. यांचे जाहीर स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने लोकसमुदाय जमला होता पण दुष्ट पावसाला ही गोष्ट खपली नाही व लोकांचा उत्साह दाबण्याकरिता त्याने आपले उग्र स्वरूप धारण केले. त्यामुळे समारंभ थोडक्यातच संपवावा लागला. लोकांना हार अर्पण करण्याकरिता वेळ नसल्यामुळे शेकडो हार मोटारीवर वरून टाकण्यात आले.

याप्रमाणे कामठीचा समारंभ संपवून आल्यावर बाबासाहेबांच्या मुक्कामी बरीच कार्यकर्ती मंडळी जमली होती. त्यांच्यातील झालेल्या खाजगी चर्चेचा गोषवारा पुढीलप्रमाणे….

प्रथम जी. आय. पी. रेल्वे कामगारांनी आम्ही रेल्वेच्या युनियनमध्ये सामील व्हावे किंवा नाही म्हणून प्रश्न केले. त्यावर डॉ. बाबासाहेब म्हणाले, युनियन तुमच्या हिताचे कार्य करीत असेल तर तिचे सभासद सर्वांनी व्हावे. जर ही संस्था तुमचे हिताचे कार्य करीत असेल, तुमच्या हिताकरिता तुम्ही दिलेल्या वर्गणीतून एक पंचमांश भाग तुमच्या हिताकरिता राखून ठेवणे, तुमच्या संख्येच्या मानाने तुमचे प्रतिनिधी घेणे वगैरे गोष्टी राखीव करून तुमच्या हिताकरिता ठेवत असतील तर जरूर सर्वांनी भाग घ्यावा, नाही तर आपली स्वतंत्र युनियन स्थापावी. (हा प्रश्न गिरण्यातील कामगारांना देखील लागू आहे.)

यानंतर नागपूर येथील कार्यकर्त्यांकडे त्यांचा मोर्चा फिरला व यावेळेला एम. एल. ए. सेक्रेटरी, सि. स्टे, सं. कमेटी, न्युः सभासद, श्री. आर. आर. पाटील, सेक्रेटरी, मध्यप्रांत आणि वऱ्हाड फेडरेशन व इतर काही विरोधी पक्ष याशिवाय बरेच नागरिक हजर होते. ही खाजगी चर्चा रात्रीचे साडेबारा वाजेपर्यंत झाली. तिचा मुख्य व त्रोटक वृत्तांत पुढीलप्रमाणे….

विरोधी पक्ष व डॉ. बाबासाहेबांचा पक्ष यांच्यातील एकमेकांच्या वैगुण्याविषयी बरीच चर्चा झाल्यावर यावर रामबाण उपाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालील प्रमाणे सुचविले….

(१) स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद हजारोंनी करा व ह्या पक्षाचे एकोप्याने बल वाढवा.                                                                                      (२) दलित फेडरेशनचे कार्य जातीय ऐक्यापुरते ठेवा. (Optional)
(३) समता सैनिक दलातर्फे सार्वजनिक विहिरी व स्थळे हस्तगत करा.

🔹🔹🔹

यानंतर पक्षाचे तुकडे पाडणारांचे बरेचसे समर्थनपर भाषण झाले. पण प्रामुख्याने बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होऊन सर्वांनी याच पक्षाखाली नवीन प्रतिनिधी निवडून एकच पक्ष ठेवावा व स्वतंत्र मजूर पक्षाचेच कार्य जोराने चालवावे असे सुचविले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने इतर विरोधी पक्ष दिपून गेले व आता लोकनियुक्त कारभार चालल्यास आमची गती काय होईल हे त्यांनाच समजेनासे झाले. डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग करून स्वतःला आंबेडकर पक्षीय म्हणविणाऱ्या इतर मंडळींना आमची सूचना आहे की, आतातरी बाबासाहेबांची ही आज्ञा शिरसावंद्य मानून स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे व आपापले प्रतिनिधी निवडून देऊन सर्व नागपूरात एकच एक डॉ. बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष कायम ठेवावा अशी श्री. आर. आर. पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.

⚫⚫⚫

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे