चाळीसगाव येथील अस्पृश्योद्धारक बोर्डिंगला भेट दिल्यानंतर झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळ्यास कोर्टाच्या कामाकरिता गेले होते.
कोर्ट कामासंदर्भात धुळ्यास जात असताना दिनांक १७ जून १९३८ रोजी सकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चाळीसगाव स्टेशनवर उतरले तेव्हा त्यांच्या स्वागताकरिता प्रचंड लोकसमुदाय जमला होता. जयघोषांची एकसारखी गर्जना चालली होती. डॉ. बाबासाहेब गाडीतून उतरताच अस्पृश्योद्धारक बोर्डिंगचे सेक्रेटरी श्री. डी. एम. मागाडे यांनी बोडिंगतर्फे हार अर्पण केला. नंतर डॉ. बाबासाहेब धुळ्याच्या गाडीत बसले. स्त्रियांतर्फे कु. शांताबाई दिवाण चव्हाण यांनी व पिंपरखेड येथील क्रेडीट सोसायटीतर्फे सोमा संसारे यांनी बाबासाहेबांना हार अर्पण केले. स्टेशनवर मे. डी. जी. जाधव, बी. ए., एम. एल. ए., शामराव कामाजी जाधव, डिस्ट्रीक्ट लोकल बोर्ड मेंबर, जळगाव, श्रवण धर्माजी जाधव, म्युनिसीपल कौन्सिलर, चाळीसगाव, दिवाण सीताराम चव्हाण, धावजी पहिलवान, भापु मुकादम, उबाळे, आडंगळे, तात्याबा पवार, श्रीपत पवार, सीताराम आव्हाड वगैरे मंडळी व खेड्यातील जनता मोठ्या संख्येने जमली होती.
डॉ. बाबासाहेब साडेसहा वाजता धुळ्यास कोर्टाच्या कामाकरिता रवाना झाले. त्यांच्याबरोबर तरुण उत्साही व डॉ. बाबासाहेबांचे एकनिष्ठ सेवक श्री. डी. जी. जाधव व बोर्डिंगचे सेक्रेटरी डी. एम. मागाडे हे गेलेले होते. कोर्टाचे काम आटोपल्यावर डॉ. बाबासाहेब दिनांक १९ जून १९३८ रोजी रात्री साडे आठ वाजता चाळिसगावास उतरले. डॉ. बाबासाहेब येताच अतोनात गर्दी झाली. लोकसमुदाय ३-४ हजार जमला होता. डॉ. बाबासाहेबांनी जेवण घेतल्यानंतर बोर्डिंगची पहाणी केली व बोर्डिंग पाहिल्यानंतर बोर्डिंगच्या समोर सभेस सुरवात झाली. कवी बना सखाराम साळुंके यानी पद म्हटल्यावर कु. शांताबाई चव्हाण यांनी भाषण केले. त्यानंतर श्री. दिवाण सीताराम चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजची संस्थेची स्थिती समाधानकारक होण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातचे अमृताचे थेंब कारणीभूत होत. आज ग्रँट १११० रुपये व जागाही मिळून ३५०० रुपयापर्यंत इमारत बांधली गेली आहे. लवकरच शेते बोर्डिंगास मिळणार आहेत. अशी संस्थेची भरभराट ज्यांच्या अमृताच्या थेंबाने झाली आहे, त्यांच्याच हस्ते बोर्डिंगचा उद्घाटन समारंभ पार पाडण्याविषयी आमच्या मंडळाचा विचार ठरला आहे. डॉ. बाबासाहेब लवकरच आम्हास तारीख देतील अशी विनंती आहे, इतके बोलून मी भाषण संपवितो. ” नंतर श्री. डी. एस. मागाडे यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात सन १९२७ पासूनची एकंदर परिस्थिती निवेदन केली. नंतर श्री. एस. के. सोनवणे, बी. ए. ऑनर्स व श्री. डी. जी. जाधव यांचे भाषण झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करण्यास उठले. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
याप्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
“आज मला भाषण करण्याची पाळी येईल अशी माझी कल्पना नव्हती. आपण पुष्कळ लोक जमले असल्यामुळे दोन शब्द बोलतो. आपणावर सध्या जे सरकार राज्यकारभार करते ते ब्रिटिश सरकार नसून काँग्रेस सरकार आहे. ब्रिटिश सरकारचा मला ११ वर्षाचा अनुभव आहे व काँग्रेस सरकारचा ११ महिन्यांचा अनुभव आला आहे. कॉंग्रेस अधिकारारूढ होण्यापूर्वी मला जास्त आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे. ब्रिटिश सरकारच्या वेळेस पोलिस खात्यात अस्पृश्यांना शिरकाव नव्हता. मी असेंब्लीत २ वर्षे भांडण करून शिरकाव करून घेतला. ब्रिटिश सरकार काही तरी देत असे. ब्रिटिश सरकार पडित जमिनीबद्दल अस्पृश्यांच्या अर्जाचा अगोदर विचार करीत असे व तसे त्यांच्या दप्तरीही आहे. ते कचेरीत सापडू शकेल. पोलिस खात्यात अस्पृश्यांच्या अर्जाचा अगोदर विचार करावा. ब्रिटिश सरकारने आमच्याकरिता काहीही राखून ठेवलेले नाही असे दिसून येईल. सगळ्यांच्या बरोबर काही लाभ झाला तर तुम्ही घ्यावा. एका आईच्या पोटी जन्मास आलेल्या चार मुलांपैकी मोठ्या मुलास भाकरीचा मोठा भाग मिळतो. आई लहान मुलाकरीता भाकरी लपवून ठेवते तसे आपल्याकरिता काँग्रेसने काय राखून ठेवलेले आहे ? काँग्रेस आमच्याकरिता काहीच राखून ठेवत नाही. मग ती माय कशी होऊ शकेल ? आम्हाला मायेच्या लोभाव्याची जरूर नाही. आम्ही मरू व मनगटाच्या जोरावर मिळवू. आम्ही डरणार नाही व टोपली घेऊन दुसऱ्याच्या दारीही जाणार नाही. मायेच्या काँग्रेसचे काय आहे. मी गांधींचा शत्रु नाही. ज्याला जे सत्य वाटते तो ते करतो. मी गांधींच्या कार्याची पर्वा करीत नाही. गांधींच्या हातात काँग्रेस आहे. ‘ राजा बोले आणि दल हाले ‘ गांधी बोलतो व काँग्रेस करते. गांधींच्या मनात आले, अस्पृश्यांना सवलती देण्याचे ठरवले तर त्यास खावयास मिळेल. गांधींच्याविरुद्ध कोणीही जाणार नाही. ‘ कळवळ्याच्या याती आणि लोभाविन प्रिती. ‘ आईचे प्रेम सर्व मुलांवर सारखे असते. करंट्या मुलावर सुद्धा जास्त असते. काँग्रेसची व तुमची आई गांधी आहे. अर्थात गांधींचे प्रेम तुमच्यावर जास्त असले पाहिजे, तसे मुळीच दिसत नाही. करिता दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला याप्रमाणे आपले कार्य आपणच करावयास पाहिजे. आपल्यावर फारच मोठे संकट आहे. ते तुम्हास दिसत नाही. २००० वर्षांची परिस्थिती तुमच्या अंगवळणी पडली आहे. धुळ्याची गोष्ट सांगतो. धुळ्याचे पाठक शास्त्री हिंदुधर्म-शास्त्रज्ञ आहेत. ‘ अस्पृश्यांची पूर्वोक्ती ‘ म्हणून पुस्तक लिहिले आहे. काही कामाकरिता शास्त्रींची भेट घेण्याचा निश्चय केला. पाठक शास्त्रींना मी ९/१० वाजता आपणाकडे भेटावयास येईन असा निरोप पाठविला. मी मोटार घेऊन पाठक शास्त्रींकडे गेलो. एका इसमाजवळ मी आलो आहे, येऊ काय असे सांगितले. तेथे जेवण चालले होते. शास्त्रींचा निरोप आला नाही. ते धावत बाहेर आले. मी त्यांना सांगितले की, आपल्याशी चर्चा करावयाची आहे पाठशाळेत चला. त्यांनी सांगितले की, आपण मोटारीतच चर्चा करू. धुळ्याचे रस्ते अरूंद त्यामध्ये जास्तवेळ मोटारीत बसून चर्चा करणे योग्य नाही म्हणून पुष्कळ आग्रह केला. पण उपयोग झाला नाही. नाइलाजास्तव बंगल्यात जाऊन चर्चा करणे भाग पडले. त्याने चांगली चर्चा केली. माझ्यासारखे शिक्षण घेणारी माणसे थोडी असतील. परंतु माझ्या सारख्यांना शास्त्रींच्या पाठशाळेत शिरकाव करता आला नाही. किती अपमान ! माझ्या हृदयाला घरे पडतात. तुम्हाला त्याची जाणीव नाही. आपणाला जे काही मिळवून घ्यावयाचे असेल ते झगडा करून मिळेल. काँग्रेस, गांधींचे धोरण ११ महिन्यात चांगलेच दिसले आहे. याचा प्रत्यक्ष पुरावा नागपूरचे ना. शरीफ याचे प्रकरणच देईल. यासाठी आपण सर्वांनी संघटना करून सामर्थ्य एकवटून तोंड दिले पाहिजे. काँग्रेस ही ५० वर्षांची आहे. स्वतंत्र मजूर पक्ष दीड-दोन वर्षाचा आहे. काँग्रेसला जर कोणाची भीती वाटत असेल तर ती स्वतंत्र मजूर पक्षाची होय. आम्ही १५ माणसे काँग्रेसला भंडावून सोडतो. १५ च्या ऐवजी ३० अगर ४५ माणसे असती तर आपलेच राज्य आले असते. १०-१५ वर्षात एकी केली तर खात्रीने सांगतो की, आपलेच राज्य होईल. तुम्ही सर्वजण मला देव म्हणता. मी देव नसून महार आहे. तुमचा स्वतंत्र मजूर पक्षच देव आहे. धोंड्याला शेंदूर लावला म्हणजे देव होतो तसा मी आहे. तुमचा खरा देव स्वतंत्र मजूर पक्ष आहे. सर्वांनी स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हावे. वर्षाचे ४ आणे देण्यास जड नाहीत. मी पुष्कळ बोललो आहे.
🔹🔹🔹
इतके भाषण झाल्यानंतर डी. एम. मागाडे यांनी बोर्डिगतर्फे हार अर्पण केला. धावजी याने व्यायाम शाळेतर्फे हार अर्पण केला. हरिभाऊ कन्नडकर यांनी निजामस्टेटतर्फे हार अर्पण केला. भगिनीतर्फे कु. शांताबाई चव्हाण हिने हार अर्पण केला. शेवटी डी. एम. मागाडे यांनी सर्वांचे आभार मानून सभा बरखास्त केली. नंतर सकाळच्या गाडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईस रवाना झाले.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर