देवतांना वाहिलेल्या सर्व वर्गांची, पुरुष (वाघे, पोतराज, भूते वगैरे) व स्त्रिया (मुरळ्या, जोगतीणी, देवदासी इत्यादी) समाजाने त्याग केलेल्या वर्गातील सदाचरणाने उदरनिर्वाह करण्यास असमर्थ झाल्यामुळे, अनितीकारक व्यवसायात पडलेल्या स्त्रियांच्या सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण…..
दिनांक ३० मे ते १ जून १९३६ ला आयोजित मुंबई इलाखा महार परिषदेत पास झालेल्या धर्मांतराच्या ठरावाचा समाजावर खूपच सकारात्मक परिणाम झाला. या ठरावाचा परिणाम कामाठीपुऱ्यात वस्ती करून राहिलेल्या मुरळ्या, जोगतिनी, देवदासी इत्यादी समाजाने त्याग केलेल्या वर्गावरही झाला. साधारणतः या वर्गातील सर्व स्त्रिया सदाचरणाने उदरनिर्वाह करण्यास असमर्थ झाल्यामुळे, अनितीकारक व्यवसायात पडल्या आहेत. महार परिषदेनंतर या स्त्रिया आपल्या परिस्थितीचा विचार करू लागल्या व त्यांनी स्वयंस्फूर्तीने एक खाजगी बैठक बोलाविली व त्यात असे ठरविण्यात आले की, आपल्या व्यवसायातील बायांची व पुरुषांची एक सभा बोलवावी व त्यावेळी डॉ. बाबासाहेबांना आमंत्रण देऊन त्यांच्या मुखातून आपल्या मुक्ततेच्या चार उपदेशपर गोष्टी ऐकाव्या. त्याप्रमाणे देवतांना वाहिलेल्या सर्व वर्गांची, पुरुष (वाघे, पोतराज, भूते वगैरे) व स्त्रिया (मुरळ्या, देवदासी, जोगतिनी इत्यादी) यांची एक सभा, दिनांक १६ जून १९३६ रोजी रात्री परेल, मुंबई येथील
पोयबावडीवरील दामोदर हॉलमध्ये भरली होती. या सभेस मोठा जनसमुदाय जमला होता व त्यामुळे दामोदर हॉल माणसांनी अगदी फुलून गेला होता.
आरंभी काही देवदासी, मुरळ्या, पोतराज व वाघे यांची भाषणे होऊन त्यांनी या व्यवसायापासून परावृत्त होण्याची आपल्या बंधुभगिनींना विनंती केली. काही वक्त्यांनी जाहीररितीने असे सांगितले की, आपण या व्यवसायातून पूर्वीच बाहेर पडलो असून आपण प्रामाणिकपणे, निढळाच्या घामाचा पैसा मिळवून आपला उदरनिर्वाह करीत असतो व त्यामुळे आपले जिणे स्वाभिमानाचे झाले आहे.
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या कडकडाटात भाषण करण्यास उठले. त्यांच्या चेहऱ्यावर त्या रात्री उद्विग्नतेची छाया पसरली होती. त्यांनी भाषणास सुरुवात करताच सभागृहात एकदम शांततेचे व गंभीर वातावरण पसरले.
समाजाने त्याग केलेल्या वर्गातील सदाचरणाने उदरनिर्वाह करण्यास असमर्थ झाल्यामुळे, अनितीकारक व्यवसायात पडलेल्या स्त्री-पुरूषांच्या या सभेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आजच्या सभेचे महत्त्व नुकत्याच भरलेल्या महार परिषदेपेक्षा मला शतपटीने अधिक वाटते. समाजाचा जो भाग अत्यंत हीन किंवा टाकावू गणला जातो, असा तुमचा समाज आहे. धर्माच्या नावाखाली अनैतिकरितीने आपला निर्वाह करणाऱ्या अशा तुम्ही स्त्रिया आहात. ज्यांचा स्वाभिमान लुप्त झालेला आहे, देह-विक्रय करून पोट भरणे हेच ज्यांचे जीवितसर्वस्व आहे, अशा वर्गाने जगात काय चाललेले आहे हे समजून घेण्याची जिज्ञासा दाखवावी व आपला चरित्रक्रम सुधारण्याची तयारी करावी ही गोष्ट खरोखर तुम्हास भूषणावह आहे आणि म्हणूनच महार परिषदेत २५,००० लोक समुदाय जमला याचे मला महत्त्व वाटत नाही, पण आज तुम्ही जरी ४००-५०० येथे जमला असला तरी त्याचे मला अधिक महत्त्व वाटत आहे. आजच्या तुमच्या या सभेबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो.
एवढ्या प्रस्तावानंतर मी मुख्य विषयाकडे वळतो. आज मुंबई शहरात महार समाजाला कोठे लज्जेने मान खाली घालावी लागत असेल तर तुमच्या कामाठीपुऱ्यातून जाताना. आपल्या भगिनी त्या ठिकाणी इतर समाजाकडून आपली कशी विटंबना करून घेत आहेत हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिल्याबरोबर प्रत्येक महाराला खेद वाटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आज महार समाजाबरोबर धर्मांतर करण्याची तयारी दाखविलेली आहे. परंतु या तुमच्या निश्चयाने माझ्या अनुयायांची संख्या वाढली म्हणून मला आनंद वाटत नाही किंवा माझ्या धर्मांतराच्या घोषणेस अधिकाधिक पाठिंबा मिळत आहे म्हणूनही मला समाधान वाटत नाही. आमच्या धर्मांतराचा अर्थ नीट लक्षात घ्या. आम्ही धर्मांतर करीत आहोत ते या दुर्गंधीच्या वातावरणातून बाहेर पडण्याकरिता करीत आहोत. सर्वांना समतेचे, बंधुत्वाचे व स्वाभिमानाचे आदर्श जीवित लाभून त्यांचा आयुष्यक्रम उज्ज्वल व्हावा या दृष्टीने आम्ही धर्मांतरास तयार झालो आहोत. तुम्हाला जर आमच्याबरोबर यावयाचे असेल, तुमच्या जाती बांधवांबरोबर यावयाचे असेल तर तुम्ही प्रथम हा आपला दुर्गंधित आयुष्यक्रम अजिबात सोडून दिला पाहिजे. तुमच्या मलीन वृत्तीचा तुम्हास त्याग केला पाहिजे. हे करण्यास तुम्ही तयार असाल तर तुम्ही आमचेबरोबर या. नाहीतर तुम्ही आमचेबरोबर येऊ नका. वाटल्यास तुम्ही आहात त्याच ठिकाणी रहा. तुम्ही मुसलमान व्हा किंवा खिश्चन व्हा. आमची त्यास हरकत नाही, परंतु जर आमचेबरोबर तुम्हास यावयाचे असेल तर तुम्ही काया, वाचा व मन याची शुद्धी करून व या त्रिशुद्धीने शुचिर्भूत होऊनच तुम्हाला आमचेबरोबर येता येईल. नाहीतर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्हाला आमचेबरोबर येता येणार नाही.
आणि जर तुम्ही आपला आयुष्यक्रम पूर्ववत चालू ठेवून महार जातीस बट्टा लावण्याचे कार्य सोडणार नाही तर मी तुम्हास बजावून सांगतो की, हजारो तरूण स्वयंसेवक तयार करून मी तुमचे कामाठीपुऱ्यातून उच्चाटन करीन.
तुम्हाला समजले पाहिजे की स्त्रीजात समाजाचा अलंकार आहे. प्रत्येक समाज स्त्रियांच्या चारित्र्याला अधिक मान देतो. आपली गृहिणी होणारी स्त्री उत्तम कुलातील असावी अशी प्रत्येकजण अपेक्षा करतो व तशी भार्या मिळावी म्हणून खटपट करतो. कारण त्याला माहीत असते की, आपला, आपल्या मुलाबाळांचा, आपल्या कुटुंबाचा व कुळाचा नावलौकिक स्त्रियांच्या शीलावर अवलंबून आहे. इतकी थोरवी स्त्रीवर्गाला प्राप्त झाली आहे. परंतु तुमच्या कामाठीपुऱ्यातील चरित्रक्रम पाहिला तर समाजाला व स्त्रीजातीला काळिमा फासण्यासारखा आहे. म्हणून तुम्हा स्त्रियांचे समाजात काय स्थान आहे, हे जाणून आपल्या मलीन आयुष्यक्रमाचा त्याग केला पाहिजे व आपला स्वतःचा आणि जातीचा दर्जा व नावलौकिक वाढविला पाहिजे. तुम्ही कदाचित असा प्रश्न कराल की, हा धंदा आमच्या उपजीविकेचे साधन आहे. इतकेच नव्हे तर या धंद्यामुळेच आज आम्हाला कशाची ददात नाही, आमचे आयुष्य सुखाने चालू आहे. आम्हाला यात नोकर-चाकर वगैरे सुखसोयी आहेत. असा ऐषआरामाचा व थाटाचा चरित्रक्रम सोडून आम्ही काय करावे ? ज्यावेळेस मी तुम्हास हे लाजिरवाणे जिणे सोडण्यास सांगतो त्यावेळेस असेही निक्षून सांगतो की, तुम्हास उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेणार नाही. आज हजारो स्त्रिया गरीब नवऱ्याशी लग्न लावून त्यांच्या सहवासात अठराविश्वे दारिद्र्यात दिवस कंठीत आहेत. त्यांना पोट भरण्याकरता हरएक तऱ्हेचे कष्ट करावे लागतात. हजारो स्त्रिया गिरण्या, कारखाने यात नोकऱ्या करून संसारातील इतर हालअपेष्टा सोसून आपल्या मुलाबाळात गरिबीने अर्धपोटीही राहतात परंतु त्या तुमच्या धंद्यात सुख लाभते म्हणून त्यात शिरत नाहीत. त्या तसे का करीत नाहीत ? दुःखे का सहन करतात, याचा तुम्ही विचार करा. महाभारतातील कथा तुम्ही ऐकल्या आहेत. ज्यावेळेस पांडव द्युतात हरले त्यावेळी ते वल्कले व मृगचर्म धारण करून वनवासात जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर हीच वस्त्रे परिधान करून द्रौपदीदेखील होती. वाटेत, कौरवांपैकी दुर्योधनाने तीस म्हटले; ” द्रौपदी, ह्या मूर्ख नवऱ्यांबरोबर सहवास करून तू आपले हाल का करून घेतेस ? तुझ्या सुकुमार देहाला का कष्ट देतेस ? तू मजबरोबर रहा. मी तुला पूर्ण ऐश्वर्यात ठेवीन व तुला काडीचेही दुःख होणार नाही. ” पण त्या वेळेस मानी साध्वी द्रौपदीने दुर्योधनास जे उत्तर दिले ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. ती म्हणाली, ” जर मला नीतीने आयुष्यक्रम कंठिता येत नसेल तर मला ऐश्वर्य नको. राजवाड्यापेक्षा कष्टमय वनवास मला अधिक प्रिय आहे.” तुम्हीदेखील हाच बाणा बाळगला पाहिजे. तुम्ही कष्ट करण्यास का भ्यावे ? तुमच्या इतर हजारो भगिनींप्रमाणे आपापल्या गावी जाऊन किंवा नोकऱ्या करून काबाडकष्टाने उपजीविका करण्यास तुम्हास का जड वाटावे ? तुम्हाला आपल्या जातीचा अभिमान का नसावा ? हे स्वतःचे विटंबना करणारे व जातीला काळिमा फासणारे जीवित तुम्ही का सोडू नये ? तुमच्या या लांच्छनास्पद धंद्याने सबंध महार जातीला किती लाज आणली आहे याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. पण आम्हाला हरघडी तुमच्यामुळे मान खाली घालावी लागते. काही वर्षापूर्वी कामाठीपुऱ्यात मी एका सभेला गेलो होतो. त्यावेळेस माझे मित्र डॉ. सोळंकीही हजर होते. शिक्षणाविषयी भाषण करताना मी म्हणालो होतो की, सरकार शिक्षणाच्या बाबतीत मुसलमानांना ज्या सवलती देते त्या अस्पृश्य समाजास देत नाही, ही गोष्ट अगदी खरी आहे. त्या ठिकाणी काही मुसलमान गृहस्थ हजर होते त्यापैकी एकाने सांगितले की, ” महारास मुसलमानांविषयी का वैषम्य वाटावे ? आम्ही दोन-दोन, चार-चार महारणी ठेवतो.” या बोचक वाक्याचे प्रत्युत्तर मी दिले नाही, पण या वाक्याने मला किती वाईट वाटले असेल, याची तुम्हीच कल्पना करा. मला कोणत्या गोष्टीची अतिशय चीड येत असेल, ज्या गोष्टीचा अतिशय संताप येऊन तळपायाची आग मस्तकात जात असेल तर या तुमच्या आयुष्यक्रमाची व तुमच्या कामाठीपुऱ्यातील राहणीची ! म्हणून मी तुम्हास परत एकवेळ बजावून सांगतो की, तुम्हास महार म्हणवून घ्यायचे असेल तर हा गलिच्छ धंदा तुम्हाला एकदम सोडलाच पाहिजे. या धंद्यात राहून मी तुम्हास आमचेबरोबर येऊ देणार नाही आणि इतकेही करून तुम्ही ऐकणार नाही तर मी तुमचा या ठिकाणाहून उठाव केल्याशिवाय राहणार नाही. तरी तुम्ही ताबडतोब जाग्या व्हा व ह्या हीन चरित्रक्रमाचा त्याग करा.
मला आशा वाटते ती ही की, आजची सभा तुम्ही स्वयंस्फूर्तीने बोलाविली आहे, आपली सुधारणा करून घेण्यास तुम्ही उद्युक्त झाला आहा. तरी ही माझी आशा लवकर सफल होईल अशी इच्छा प्रदर्शित करून मी माझे भाषण संपवितो.
●●●
भाषण चालू असता जमलेल्या स्त्रियांची अंतःकरणे सद्गदीत झाली होती. कारण डॉ. बाबासाहेबांचे भाषण अत्यंत स्फूर्तिदायक असे झाले. नंतर सभेतील इतर कार्यभाग आटोपल्यावर सभा बरखास्त झाली.
***
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर