June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

समाजाची दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यांवर कडक नजर ठेवली पाहिजे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई प्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वार्ड कमिट्यांच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक १ जुलै १९५४ रोजी मुंबईतील कामा हॉलमध्ये मुंबई प्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वार्ड कमिट्यांची बैठक पार पडली.

मुंबई प्रदेश शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वार्ड कमिट्यांच्या या नियोजित बैठकीत केलेल्या भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
बंधु आणि भगिनींनो,
तसे पाहिल्यास मला या ठिकाणी काही स्थान आहे असे वाटत नाही. कारण मी कोणता एखादा वार्ड मेंबर म्हणून येथे आलो नाही, तर पुढे होणाऱ्या हीरक महोत्सवासाठी तुम्ही किती पैसा गोळा केला आहे व करणार आहात हे पहावयासाठी मी येथे आलो. बऱ्याच शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन शाखेच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत पैसा जमविला, पावत्या पुस्तके नेऊन पैसा उकळला, परंतु योग्य त्या अधिकाऱ्याकडे मात्र तो पोहोचता केलेला नाही असे मला आढळून आले आहे. कुणाकडे किती पैसे आहेत व त्याची काय विल्हेवाट लावली आहे याचा हिशोब नाही. तेव्हा त्या गोष्टीची अगोदर चौकशी व्हावी असे मला वाटते.

आज पर्वताला देखील मुंग्या भोके पाडू लागल्या आहेत व आता पुढेही पाडीत राहातील याची तुम्हाला फारशी जाणीव नाही. तेव्हा आज तुमची ही स्थिती आहे, पुढे काय होणार ? तुमचा भावी काळ काय आहे ? तुमचे भवितव्य काय आहे ? ह्याची अजून कल्पना नाही. तुमच्या पुढील काळाची जरी कल्पना असली तरी आज मी तुम्हाला त्याबद्दल काही बोलत नाही. असा एखादा दिवस येईल की, ज्या दिवशी मी तुम्हा साऱ्यांना एकत्र जमा करून पुढे काय होणार आहे व त्याकरिता काय करावयास पाहिजे, हे सर्व काही सांगेन. निदान आजतरी या बाबतीत मी काही बोलू इच्छीत नाही. परंतु तुमच्या भविष्यकाळाकडे नीट नजर द्या.

आपल्या सार्वजनिक कार्यासाठी अशा एखाद्या हॉलची जरूर आहे की ज्याच्या भाड्यावर आपला थोडाफार सार्वजनिक खर्च भागेल. त्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही ८७ हजार जमा केले पण मी एक लाखाच्यावर जमा केले आहेत. अद्याप आपल्याला २५ हजारांची आवश्यकता आहे. त्याकरिता तुम्ही ठिकठिकाणी चाळ कमिट्या स्थापन करा. ज्यांच्याकडे पावत्या पुस्तकें किंवा त्याबद्दलचे पैसे शिल्लक राहिले असतील त्यांच्याकडे जा. त्यांच्या सारखे पाठीशी लागून, त्यांच्याकडून सार्वजनिक कामाचा पैसा काढून योग्य माणसाकडे पोहचता करा. सार्वजनिक काम करताना, समाजाचा पैसा देताना किंवा घेताना कोणी आपणाला फसवीत तर नाहीना याचा संपूर्णपणे विचार करा. असा पैसा गोळा करणे व योग्य त्या व्यक्तिकडे पोहचता करणे हे तुम्ही तुमचे कर्तव्य समजले पाहिजे. कारण समाजाचा पैसा खाण्याची चाल अलिकडे फार बोकाळली आहे व त्याचा निदान मला तरी अत्यंत कंटाळा आला आहे. अशा लोकांना समाजातून हुडकून काढले पाहिजे व कोण समाजाला कशा धर्तीने फसवितो हे बारकाईने पाहिले पाहिजे.

समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात. कार्याची कळकळ फार थोड्या माणसांना असते. सर्वजण कार्यकर्ते असते तर इमारत फंडासाठी एवढा आटापिटा करावयास लागलाच नसता. सामाजिक कार्याचा उमाळा फारच थोड्या लोकांना असतो. बाकीचे सर्वजण शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात. तेव्हा अशा माणसाला टोचून ‘ तू शेणातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस ‘ याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुशिक्षिताने आपले कर्तव्य समजले पाहिजे.

निदान आज तरी  ‘ आंधळे दळते कुत्रे पीठ खाते ‘ अशी परिस्थिती समाजापुढे येऊन ठेपली आहे. आम्ही शेताची राखण व्हावी म्हणून खास कुंपणाची सोय केली. परंतु आता कुंपणच शेत खाऊन टाकायला लागले आहे. तेव्हा याला काय म्हणावे. या बिकट प्रसंगाची जाणीव प्रत्येकास झाली पाहिजे.

समाजाची अशा धर्तीने दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यावर कडक नजर ठेवली पाहिजे. सामाजिक जीवनातील त्याच्या चळवळीवर बारकाईने लक्ष पुरविले पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे आजपासून तीन चार महिन्यांनी हीरक महोत्सवासाठी मी येणार आहे, तेव्हा इमारत फंड जितक्या लवकर जमा होईल तितका बरा. कारण त्या कार्याला आता उशीर लावण्यात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. म्हणून जागोजागी चाळ कमिट्यामधून पैसा गोळा करा. ज्याच्याकडे पैसे राहिले असतील, पावत्या पुस्तके राहिली असतील ती गोळा करा. मी तुमच्याबरोबर आहेच.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे