त्रिशत सांवत्सरिक श्री शिवाजी उत्सवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण ….
बदलापूर, जिल्हा ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रिशत सांवत्सरिक श्री शिवाजी उत्सव दिनांक ३ मे १९२७ रोजी आयोजित केला होता.
या उत्सवाच्या व्यवस्थापक कमिटीत या उत्सव समारंभाचे अध्यक्ष कोणाला करावे या विषयावर पुष्कळ वाटाघाटी झाल्यावर शेवटी सर्व गावकऱ्यांच्या संमतीने मुंबईचे बहिष्कृत वर्गाचे पुढारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ( बार-ॲट-लाॅ ) यांसच या उत्सवाचे अध्यक्ष म्हणून आणावे असे ठरले.
या ठरावाप्रमाणे उत्सव कमिटीचे मुख्य व्यवस्थापक पालये शास्त्री यांनी मुंबईस जाऊन ब्राह्मण-ब्राह्मणेतर पत्राचे संपादक रा. नाईक यांच्यामार्फत डॉ. आंबेडकरांची भेट घेतली व त्यांना शिवाजी उत्सवाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. पालये शास्त्र्यांसारख्या भिक्षुकी करणाऱ्या ब्राम्हणाने विनंती केल्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांची विनंती मोठ्या आनंदाने मान्य केली. उत्सवाच्या दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून रा. नाईक, रा. सीताराम नामदेव शिवतरकर, रा. गणपत महादू जाधव या सहकारी कार्यकर्त्यांसह बदलापूर येथे आले. मुख्य व्यवस्थापक पालये शास्त्री यांच्या घरी चहापाणी झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह सहा वाजता उत्सवाच्या ठिकाणी पोचले.
उत्सवाच्या सुरुवातीला इशस्तवनपर पद्य म्हटले गेले. त्यानंतर रा. पालये शास्त्री यांचे प्रास्ताविक भाषण झाले. त्यानंतर आजच्या उत्सवाचे अध्यक्षस्थान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारावे अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीने नानासाहेब चाफेकर यांनी सूचना मांडली. या सूचनेला मेसर्स काळे, सुळे, पाटील व मोकाशी यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेच्या अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाले.
त्रिशत सांवत्सरिक श्री शिवाजी उत्सवाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी छ. शिवाजींच्या अंगच्या निरनिराळ्या गुणांवर अत्यंत परिणामकारक असे एक तासभर भाषण केले व शेवटी सांगितले की, ज्या शिवाजीने आपल्या लोकोत्तर गुणाने राज्य मिळविले, ते त्यांचे राज्य चिरकाल का टिकले नाही ? याचे कारण हेच की, त्या राज्याचा अभिमान सर्वांना सारखाच नव्हता. एक राजा गेला व त्याठिकाणी दुसरा राजा आला तरी लोकांच्या नित्याच्या व्यवहारात काहीच फरक होत नसे. नेपोलियनच्या इंग्लंडवरील स्वारीचे वेळी इंग्लंडातील मजूर लोकांनी आपल्या देशातील लोकांना जे उत्तर दिले तेच उत्तर या ठिकाणी लागू पडते.
***
याप्रमाणे भाषण झाल्यावर रा. नाईक यांचेही विचारपरिपूर्ण असे भाषण झाले. नंतर रा. भा. रा. ओक यांनी आपल्या विनोदी भाषणाने सर्वांचे आभार मानल्यावर उत्सवाच्या कार्यक्रमातील पहिला भाग समाप्त झाला.
नंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर श्री. पालये शास्त्री यांच्याकडे भोजनास गेले. त्यांनी कसलाही किंतू मनात न बाळगता आपल्या घरात डॉ. आंबेडकर व त्यांच्या बरोबरीच्या अस्पृश्य मंडळीसह सहभोजन केले.
नंतर रात्री ९ ते ११-३० पर्यंत कीर्तन झाले. या कीर्तनात कसल्याच प्रकारचा जातीभेद न मानता लोक कीर्तनश्रवणास बसले होते. काही महार मंडळी तर कीर्तनी बुवांच्या समोरच बसली होती. कीर्तन आटोपल्यावर रात्री शिवाजी महाराजांची पालखी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारीपणाखाली अदमासे १५ हजार लोकांसह नगर प्रदक्षिणा करून आल्यावर हा उत्सव समाप्त झाला.
***
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर