June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

खोती नष्ट करण्याचे मी हाती कंकण बांधले आहे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

महाड येथील प्रसिद्ध गाडीतळात भरलेल्या जंगी जाहीर सभेत मुंबई प्रांतातील काँग्रेसचे राजकारण व खोती बिले या दोन विषयांवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्रांतीसाठी दिनांक १८ मे १९३८ रोजी महाड येथे गेले होते. दिनांक २० मे १९३८ रोजी तेथील प्रसिद्ध गाडीतळात भरलेल्या जाहीर सभेला सुमारे दहा हजार शेतकरी मोठ्या उत्साहाने आले होते. सर्व विरोधी पक्षाचे लोकही मुद्दाम आले होते. तसेच या सभेला अस्पृश्यांपेक्षा स्पृश्य शेतकऱ्यांचाच जमाव जास्त दिसत होता. शेठ, सावकार, जमीनदार वगैरे भांडवलदार लोक भीतीयुक्त मनाने आजुबाजूला उभे राहून गंमत बघत होते. स्वयंसेवकांच्या रांगांमधून डॉ. बाबासाहेब सभास्थानी आले. प्रथम श्री. नानासाहेब टिपणीस यांनी स्वतंत्र मजूर पक्षाने कुलाबा जिल्ह्यात शेतकऱ्यांकरिता काय केले याचे विस्तृत वर्णन केले. मुर्शी चांढोरे वगैरे गावच्या खोताचा कुळावर होत असलेला जुलूम दूर करण्याचे श्रेय स्वतंत्र मजूर पक्षालाच आहे वगैरे माहिती त्यांनी सांगितली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले. मुंबई प्रांतातील काँग्रेसचे राजकारण व खोती बिले या दोन विषयांवर सुमारे दीड तास डॉ. बाबासाहेबांचे जोरदार भाषण झाले.

मुंबई प्रांतातील काँग्रेसचे राजकारण व खोती बिले या दोन विषयांवर केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शेतकऱ्यांना पुष्कळशी गोड आश्वासने देऊन त्यांची मते मिळविली. काँग्रेसने अधिकार स्वीकार करून अकरा महिने होऊन गेले तरी अद्याप तिजकडून लोकहिताचे एकही काम झालेले नाही. पदवीदान विरोध, लोकलबोर्ड वगैरे सारखी निष्फळ व निरुपयोगी बिले पास करण्यात काँग्रेस मंत्रीमंडळाने कसातरी वेळ काढून लोकांना झुलविले आहे. नाही म्हणावयास शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे घाबरून काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची जमीन विकण्याला बंदी करणारे बील पास केले. त्यातसुद्धा म्हणण्यासारखा दम नव्हता. स्वतंत्र मजूर पक्षाने शेतकऱ्यांच्या हिताच्या मांडलेल्या अनेक उपसूचना सरकारने फेटाळून लावल्या. मोठ्या कष्टाने शेतीच्या उपयोगाचे दोन बैल जप्त न करण्याची उपसूचना मात्र त्यांनी मान्य केली. अशा तऱ्हेने काँग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. शेठ – सावकारांच्या पैशावर निवडून आलेले काँग्रेस सरकार आपल्या अन्नदात्याच्या विरुद्ध कायदे करून शेतकऱ्यांचे हित केव्हाच करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.

खोती नष्ट करण्याचे मी हाती कंकण बांधले आहे. काँग्रेस सरकार बिलाला पाठिंबा देईल किंवा नाही ते सांगता येणार नाही. परंतु वारा उलट दिशेने वाहत आहे. जर खोती बिल नापास झाले तर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तुरुंगात जाण्याचा निश्चय केला आहे. तुम्ही आमच्या मागे आले पाहिजे. इतकी तयारी असल्यावर खोती नष्ट करण्याला अवधी लागणार नाही.

🔹🔹🔹

यानंतर शेतकऱ्यांचे आवडते पुढारी श्री. भास्करराव कोवळे बोलावयास उभे राहिले. आपल्या खड्या सुरात ते म्हणाले ” राष्ट्रगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतील त्याप्रमाणे तुम्ही वागा व त्यांनी दिलेला मंत्र बरोबर पाळा. खोत – सावकारांच्या थापांना भुलून आपसात फूट पाडू नका म्हणजे खोती नष्ट होण्याला वेळ लागणार नाही.” रा. कोवळे यांचे भाषण संपल्यावर विरोधी पक्षांपैकी कोणाही दोघांना बोलण्याची परवानगी देण्यात आली.

⚫⚫⚫

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे