मिरज तालुक्यातील बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारी स्वागत कमान पाडल्या प्रकरणी आणि संबंधितावर कारवाई न केल्याचा निषेध म्हणून गावातील दलित कुटुंबांनी गाव सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून असंख्य महिला डोक्यावर गाठोडे घेऊन मिरज शहराच्या दिशेने चालू लागल्या आहेत. दलित ग्रामस्थानी बेडग ते मंत्रालय असा लॉंग मार्च करणार आहेत अशी माहिती त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महेशकुमार कांबळे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरजेचे आमदार आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांचे मंत्री पद काढून घेण्याची मागणी यावेळी महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. तर जिल्ह्यातील खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे हे भाजपचे असून प्रशासनावर दबाव टाकून आंबेडकरी समाज बांधवांवर अन्याय करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.