शाक्यमुनी भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस अशा काही चार महत्त्वाच्या घटना घडल्या की, ज्यांच्या चर्चेशिवाय बुद्ध चरित्राला परिपूर्णता येणेच शक्य नाही.
पहिली घटना : राणी महामायेचे स्वप्न
स्वप्न ही एक अशी वैयक्तिक अनुभूती आहे की, ती प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या जीवनात नेहमी येतच असते. स्वप्न हे शेवटी स्वप्नच असते. ते खरे झालेच पाहिजे असा कोणी आग्रह धरीत नाही. उलट सत्यात कधीही न उतरणाऱ्या बाबींसाठीच ‘ स्वप्न ‘ म्हणण्याची रीत रूढ आहे.
राणी महामायेचे स्वप्न मात्र रूढ अर्थाने ‘ स्वप्न ‘ या व्याख्येत बसणारे नव्हते. जेव्हा जेव्हा बौद्ध साहित्यात ‘ स्वप्न ‘ या विषयावर चर्चा सुरू होते, तेव्हा तेव्हा राणी महामायेच्या स्वप्नाची चर्चा झाल्याशिवाय ती पूर्णच होत नाही.
आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते. या स्वप्नात राणीने पाहिले की, चारही दिशेने दूत येतात, राणीचा शाही पलंग राणीसह उचलून हिमालय पर्वताच्या ‘ हिमवन्त ‘ प्रदेशातील एका शालवनाजवळील ‘अनोतवदह ‘ नावाच्या सरोवरावर नेतात. सुंदर, सुगंधी, अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवतात. थोड्या वेळानंतर त्या चारही दूतांच्या पत्नी तेथे येतात. त्यांनी राणीस हळूच झोपेतून उठवून सुगंधी लेपाने सर्वांगास सजवून राणीस स्नान घालतात. स्नानानंतर सुंदर सुसज्जीत वस्त्र देतात. त्यानंतर राणीस सुगंधी फुलांनी, सुवासिक अत्तरांनी असे काही सजवतात की राणी एका सुंदर वनकन्येसारखी दिसू लागते. काही वेळाने सहा दातांचा शुभ्र गजराज तेथे येतो. त्याने आपल्या सोंडेत श्वेत कमलपुष्पांची माळ धारण केलेली असते. राणीच्या शय्येभोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो, नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने हे स्वप्न राजा शुद्धोधनास सांगितले. तेव्हा त्यांनी स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शम्म, ध्वज, लक्खण, मंत्री, कोण्डज, भोज, सुयाम आणि सुदत्त या आठ स्वप्नशास्त्रतज्ञांना दरबारात बोलावून घेतले. त्यांना तेंव्हा स्वप्नाचा सविस्तर वृत्तांत कथन करून या स्वप्नशास्त्रींना या राणीच्या स्वप्नाचा अर्थ विचारण्यात आला. सर्व ऐकून झाल्यानंतर त्यांपैकी जो सर्वात वृद्ध शास्त्री होता, त्याने राजास या स्वप्नाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला, “राजन! आपण स्वप्नासंबंधी कसलीही चिंता करू नये. निश्चिंत असावे. हे स्वप्न फारच सुखद असून याचा परिणाम अतिशय शुभ व मंगलमय आहे. आपल्या घरी एक राजपुत्र लवकरच जन्मास येणार आहे. या स्वप्नाच्या द्वारे राणी महामायेस या आषाढ पौर्णिमेच्या शुभ घडीस गर्भधारणा झालेली आहे. ” म्हणूनच या पौर्णिमेस ‘ गर्भमंगलम-दिन ‘ म्हणतात. जगभरातील बौद्ध हा दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न करतात.
तो शुभदिन होता आषाढ पौर्णिमा इ.स.पू. ५६४ चा.
दुसरी घटना: गौतमाचा गृहत्याग
सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाची घटना मज्झिम-निकायातील अथिपरियेसन सुत्तात भगवंतानी कथन केलेली आहे. त्याचप्रमाणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या ” भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या पुस्तकात कथन केली आहे. ती पुढील प्रमाणे :–
सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांचे नाव शुद्धोधन, शाक्यवंशीय राजा. सिद्धार्थ है राजवंशीय नाव असून त्यांचे गोत्र गौतम किंवा गोतम असे होते. ते सूर्यवंशी घराण्यातील प्रसिद्ध इक्क्षवाकू कुळातील असून कपिलवस्तू नगरीचा राजा होय. शुद्धोधनाची राजधानी कपिलवस्तू. ही कपिलवस्तु नगरी भारत देशात उत्तर प्रदेशात वाराणसीच्या उत्तरेला १४० किलोमिटरवर हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून सुमारे ६५ किलोमिटरवर रोहिणी नदीच्या काठावर वसलेली होती. या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक. प्रजासत्ताक शासनव्यवस्थेस ‘ संघ ‘ किंवा ‘ गणराज्य ‘ असे म्हणत. शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते. ते आळीपाळीने राजसत्ता चालवित. राजपुत्र सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी राजसत्ता उपभोगण्याचा मान सिद्धार्थाचे पिता शुद्धोधन यांचा होता. राजा शुद्धोधनाची सत्ता कपिलवस्तूवर होती. तथापि, कपिलवस्तू हे एक कोशलनरेश प्रसेनजीत या राजाचे मांडलिक राज्य. कोशल नरेशाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेने काही अधिकार यांना वापरता येत नसत.
कपिलवस्तूच्या शेजारी रामग्रामचे कोलीय यांचे राज्य होते. या दोन राज्यांमधून रोहिणी नावाची नदी वाहत असे. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेती करीता वापरीत. नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे? व किती घ्यावे? याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात यांचा वाद होत असे. हा वाद कायमचा मिटवावयाचा असेल तर तो युद्धानेच मिटवावा असा निर्णय शाक्य संघाने आमसभेत घेतला. याच आमसभेत, सिद्धार्थ गौतमाने असे घोषित केले की, “संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे,” “युद्धाने हा प्रश्न न सोडवता दोन्ही बाजूंकडील दोन-दोन प्रतिनिधी निवडून द्यावेत आणि त्यांनी एक पाचवा प्रतिनिधी निवडावा व पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा.” असे स्पष्ट मत सिद्धार्थाने मांडले. गौतमाचे हे मत म्हणजे शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान होते. जो कोणी संघाच्या निर्णयाविरुद्ध वागतो वा संघाचा आदेश मोडतो, त्यास संघ शासन केल्याशिवाय सोडत नसे. संघाच्या शिक्षेची अंमलबजावणी निमूटपणे करणे हे संघाच्या प्रत्येक सभासदाचे आद्य कर्तव्य
असे.
आदेश गौतसंघाचा माने मोडला म्हणून त्यास शिक्षा दिली व त्या शिक्षेचे तीन पर्याय संघाने गौतमासमोर ठेवले. ते पर्याय असे ;
*१. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे,
२. देहांत शासन स्वीकारणे अथवा देशत्याग करणे.
३. कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती व सामाजिक बहिष्कारास राजी होणे.*
यापैकी पहिला पर्याय तर गौतमास मान्य होणे कदापि शक्य नव्हते. कारण त्याच्या विचारात युद्धविरोध ठासून भरलेला होता. तिसरा पर्यायही त्यास मान्य नव्हता. कारण या निर्णयात कुटुंबाचा काहीही दोष नव्हता. संघाच्या दृष्टीने दोष कोणाचा असेलच तर तो गौतमाचा होता. म्हणून दुसरा पर्याय गौतमास लागू होतो. त्यातीलही पहिली शिक्षा सिद्धार्थास मान्य नव्हती कारण देहदंड त्यास दिला जातो, जो देशद्रोहासारखा गंभीर अपराध करतो. तेव्हा देहदंडाचा प्रश्नच उद्भवत नाही. राहिला पर्याय देशत्यागाचा. त्यावर सिद्धार्थाने संघास असे सांगितले की, ” देश त्यागाचा पर्याय स्वीकारण्यास मी स्वखुशीने केंव्हाही तयार आहे. सत्य व न्याय यापासून परावृत्त होण्यापेक्षा देशत्याग करण्याचा निर्णय केंव्हाही चांगला. ”
पुढे राजपुत्र सिद्धार्थास देशत्याग करावा लागला, ही वार्ता कोशल नरेश प्रसेनजीत यांस समजली तर तो शाक्य संघास जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती सेनापतीस वाटत होती. सेनापतीच्या या शंकेस गौतमाजवळ उत्तर होते. तो म्हणाला, ” मी परिव्रज्जा घेऊन देश सोडेन. यामुळे कोशल नरेशास शंका सुद्धा येणार नाही. ” यावर सेनापतीने दुसरी एक शंका उभी केली. ती म्हणजे, ” माता-पिता आणि घरच्या सर्वांची अनुमती घेतल्याशिवाय परिव्रज्जा घेता येत नाही. ” यावरही राजपूत्र गौतमाने मोठ्या धैर्याने ही शंकाही दूर केली. त्याने राजा-राणीकडून मोठ्या कष्टाने अनुमती मिळविली. माता-पित्यांनी दुःखी अंतःकरणाने अनुमती दिली. त्याचबरोबर सिद्धार्थ गौतमाने पत्नी यशोधरेचीही अनुमती घेतली. युवराज्ञी यशोधरेचे या वेळचे विचार ऐकून राजपुत्र गौतम प्रभावित झाला. यशोधरा म्हणाली, ” आपला निर्णय योग्य आहे. मीही तुमच्याबरोबर परिव्रज्जा घेतली असती, पण आपल्या पाठीमागे बाळ राहूलचे संगोपन करण्याची जबाबदारी मजवरच पडणार आहे. आपण आपल्या सर्व प्रियजनांना सोडून परिव्राजक होत आहात. तेव्हा आपण असा एखादा जीवनमार्ग शोधून काढा की, तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल. ” हे ऐकून गौतमास फारच समाधान वाटले. आपल्याला अशी शूर, धैर्यवान व उदात्त मनाची पत्नी मिळाल्याबद्दल गौतम स्वतःस भाग्यवान समजतो. त्याने यशोधरेला पुत्र राहूल यास आणावयास सांगितले. एक वेळ त्याच्याकडे पितृत्वाच्या नजरेने पहिले आणि त्याने तो महाल सोडला.
दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा ‘ कंथक ‘ यावर आरूढ होऊन आपला प्रिय सेवक छन्न यास सोबत घेऊन त्याने कपिलवस्तूचा निरोप घेतला. तो दिवस होता, सोमवार आषाढ पौर्णिमा, इ.स.पू. ५३४चा. त्यावेळी गौतमाचे वय होते २९ वर्षांचे. या गृहत्यागाच्या घटनेसच गौतमाचे ‘ महाभिनिष्क्रमण ‘ असे म्हणतात. या आषाढ पौर्णिमेस ‘ महाभिनिष्क्रमण दिवस ‘ म्हणून विश्वातील सर्व बौद्धजन साजरा करतात.
तिसरी घटना पंचमवर्गीय भिक्खूंची दीक्षा
भगवंतास संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मज्ञान कोणास सांगावे किंवा सांगू नये ? असा प्रश्न तथागतांस पडला. संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की, आत्मकल्याणापुरताच तो सीमित ठेवावा असा विचार ते करू लागले. यासच बुद्धांचा ‘ विषादयोग ‘ असे म्हणतात.
तथागतांस असे वाटले की,
१. मला धम्माचे ज्ञान मिळाले हे खरे, परंतु प्रत्येक सामान्य व्यक्तीला ते समजणे व त्याचे अनुकरण करणे कठीण आहे. बुद्धिमान लोकांसाठी देखील ते अतिसूक्ष्म आहे.
२. माणसाला आत्मा आणि परमात्मा यांच्या मोहजालामधून निघणे कठीण आहे. त्याला रीतीरिवाज, रूढी आणि धार्मिक संस्कार यांच्या बंधनातून निघणे कठीण आहे. ब्राह्मणी कर्मवादापासून मुक्त होणे कठीण आहे.
३. लोकांना, ‘ आत्मा नित्य आहे ‘ या स्वीकारलेल्या सिद्धांतापासून मुक्त होणे कठीण आहे.
४. जर मी माझ्या सिद्धांताचा उपदेश दिला व लोकांना तो समजला नाही किंवा समजून देखील त्यांनी जर त्याचा स्वीकार केला नाही किंवा स्वीकार केल्यावर देखील ते जर त्यानुसार आचरण करू शकले नाहीत तर लोकांनाही व्यर्थ श्रम होतील व मलादेखील उगाचच त्रास होईल.
५. मी संन्यासी राहून स्वतःचे कल्याण निश्चित करू शकतो.
या प्रकारे भगवंताचे मन सुरुवातीस सद्धम्माच्या प्रचाराकडे न झुकता
निष्क्रियतेकडे झुकले.
किच्छेन में अधिगतं हलं दानि पकासितुं ।
रागदोसपरेतेहि नायं धम्मो सुसम्बुद्धो ।।१।।
परिसोतगामि निपुणं गंभीर दुद्दंस अणूं।
रागरत्ता न दक्खन्ति तमोखन्धेन आवुटा ति ||२||
अर्थ: (१) – मोठ्या प्रयत्नाने या मार्गाचे ज्ञान मला झाले आहे. आता ते लोकांना सांगण्यात अर्थ दिसत नाही. कारण लोभाने आणि द्वेषाने भरलेले लोक ते जाणू शकणार नाहीत.
(२) – हा मार्ग लोकप्रवाहाच्या उलट जाणारा आहे, हा ज्ञानयुक्त आहे. हा गंभीर आहे, हा दुरधिगम आहे, आणि हा सूक्ष्म आहे (म्हणून) अज्ञानावरणाने अच्छादित व कामासक्त मनुष्यांना याचे ज्ञान होणार नाही.
शेवटी तथागताने विचार केला, – सर्व जगास शांती प्राप्त व्हावी, दुःखातून सर्वांची मुक्तता व्हावी हे तर आवश्यक आहे. तेव्हा या सद्धम्माचा इतरांस उपदेश केला पाहिजे, असा विचार करून आपणास प्राप्त झालेले ज्ञान धम्मोपदेशाद्वारे इतरांस देण्याचा निश्चय तथागतांनी पक्का केला. सर्वप्रथम हा धम्म कोणास द्यावा असा विचार करता त्यांना सर्वप्रथम आलारकालाम यांची आठवण झाली. तथागतांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व शुद्धाचरणी होता. परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले. त्यानंतर उद्दक रामपुत्ताला धम्मोपदेश देण्याचा विचार त्यांनी केला. परंतु तोही आठ दिवसांपूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले.
निरंजना नदीच्या काठी सिद्धार्थ गौतमाच्या घोर तपश्चर्येच्या कालावधीत जे पाच शिष्य त्यांच्याबरोबर होते, परंतु सुजाताच्या खीर ग्रहणानंतर गौतमाने तपस्या व कायाक्लेशाचा त्याग केला म्हणून ते रागावून निघून गेले होते. त्यांना हा सद्धम्म सर्वप्रथम सांगावा हा विचार करून तथागताने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समजले की हल्ली ते वाराणसी येथे आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी भगवान वाराणसी येथील सारनाथ जवळील मृगदाय वनात गेले. लांबूनच त्या पंचमवर्गीय भिक्खूंनी पाहिले की, सिद्धार्थ आपल्याकडे येतोय. त्यांचा गौतमावरचा राग अजून पुरता गेलेला नव्हता.
अश्वजीत श्रमण म्हणाला, ” हा तोच गौतम आहे, जो सुजाताची खीर खाऊन तप सोडून भ्रष्ट झाला आहे. आता परत इथे आला आहे. ”
त्यानंतर लगेच कौण्डिण्य श्रमण म्हणाला, ” आपण त्यास प्रणाम करायचा नाही. उठून उभे राहून त्यास सम्मान द्यायचा नाही. ”
कश्यप (वप्प) म्हणाला, ” त्यास बसण्यास आसन द्यायचे नाही, की त्याचे चीवर सांभाळायचे नाही. ” बाकीचे श्रमण महानाम व भद्रिक अथवा भद्दीक यांनी त्यांना समर्थन केले.
त्यामुळे त्यांनी ठरवले की, ” गौतमाचे स्वागत करावयाचे नाही ; कारण त्या गौतम श्रमणाने तपस्येचा मार्ग सोडून वैभव आणि विलासी जीवनाचा अंगिकार केला आहे. त्यामुळे आपण तो आला म्हणजे उभे राहायचे नाही, त्याचे आदरातिथ्य करायचे नाही. त्याच्यासाठी बाजूला एक आसन ठेवून देऊ, इच्छा असेल तर तो त्यावर बसेल. अन्यथा आला तसा निघून जाईल. ” बुद्धाने या पाच परिव्राजकांना दीक्षित करायचे ठरवूनच त्यांचा शोध घेत इथपर्यंतचा प्रवास केला होता. ते जेथे बसले होते तेथपर्यंत तथागत स्वतःहून संथ पावले टाकत चालत गेले. तथागत जवळ येईपर्यंत त्यांचे स्वागत न करण्याचा निश्चय करून निर्विकारपणे बसलेले ते ब्राह्मण श्रमण केव्हा त्यांचा तो दृढ निश्चय विसरले, कधी त्यांचा विरोध गळून पडला हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. भगवंतांचे व्यक्तिमत्वच इतके प्रभावी होते की, त्याने प्रभावीत होऊन ते चुंबकाकडे लोखंड जसे आकर्षित व्हावे तसे ते सर्व प्रभावित झाले. त्यांचा या आधीचा गौतमाचा सत्कार न करण्याचा निश्चय असा गळून पडला, जसा वाऱ्याच्या झोताने पिकलेला आंबा झाडावरून गळून पडावा. ते सर्वच्या सर्व श्रमण तथागतांच्या स्वागतासाठी उठून कोणत्या क्षणी उभे राहिले हे कोणासही समजले नाही. एकाने आपल्या हाती बुद्धाचे पात्र घेतले. एकाने चीवर सांभाळले. एकाने आसन स्वच्छ केले, तर बाकीचे त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणावयास धावले. या स्वागतानंतर या सर्वांनी भगवंतास त्यांच्या धम्माची दीक्षा देण्याची नम्र विनंती केली.
बोधिप्राप्तीनंतर तथागताचे हेच पहिले ‘ धम्मचक्रप्रवर्तन ‘ होय. ज्या स्थळी हे पवित्र ‘ धम्मचक्रप्रवर्तन ‘ घडून आले ते स्थान म्हणजेच सारनाथ येथील ऋषीपतन (इसिपतन हे प्राचीन नाव) ‘ मृगदाय वन ‘ हे होय. असे म्हणतात त्रिसरणामधील प्रथम सुत्त ” बुद्धं सरणं गच्छामि ” हे बुद्धगयेमध्ये जन्मले, तर उर्वरित दोन्ही सुत्त ” धम्मं सरणं गच्छामि ” आणि ‘ संघ सरणं गच्छामि ” हे सारनाथ येथे जन्मास आले. यावरून बौद्ध संस्कृतीमधील सारनाथचे महत्त्व लक्षात येते. म्हणूनच तर सिद्धार्थाने जेथे जन्म घेतला त्या लुम्बिनीस प्रथम क्रमांकाच्या पवित्र क्षेत्राचा दर्जा बौद्धजन देतात तर बुद्धगयेस सर्व जगातील बौद्ध दुसरे धम्मक्षेत्र मानून तेथे मस्तक टेकवतात. जेथे तथागतास महापरिनिर्वाण प्राप्त झाले त्या कुशीनगरला चौथ्या धम्मक्षेत्राच्या ठिकाणी मानतात आणि तत्पूर्वी जेथे पहिले धम्मचक्रप्रवर्तीत झाले त्या सारनाथला आपोआपच तृतीय धम्मक्षेत्राचा दर्जा बहाल करण्यात येतो. असे हे चार पवित्र तीर्थक्षेत्र बौद्ध धम्मात मान्यताप्राप्त झालेले आहेत.
ज्या दिवशी तथागतांनी या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन प्रव्रज्जीत केले, तो पवित्र दिवस होता सोमवार, आषाढ पौर्णिमा, इ. स. पू. ५२८ चा. आणि त्या पंचवर्गीय भिक्खुंची नावे होती कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप (वप्प), महानाम आणि भद्रिक. या आषाढ पौर्णिमेस सर्व बौद्ध जनता “धम्मचक्र प्रवर्तनदिन ” या नावाने संबोधिते.
दीघनिकायानुसार वाराणशी हे कश्यप बुद्ध व भावी मैत्रेय बुद्धाचीही जन्मभूमी आहे. धम्मचक्रप्रवर्तन करतेवेळी तथागतांनी कथन केलेल्या मार्गाला ‘ विशुद्धीमग्ग ‘ किंवा ‘ पावनपथ ‘ असे म्हणतात. धम्मचक्रप्रवर्तन सुत्तात तो नमूद केला आहे. भगवंतानी यावेळी पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता (सद्गुणपथ) हा मानवमुक्तीचा मार्ग उपदेशीला. पंचवर्गीय भिक्खुंना पवित्र धम्माची दीक्षा दिल्यानंतर पुढील महिन्याच्या तेथील वर्षावासात तथागताने वाराणसी येथील श्रेष्ठीपुत्र यश व त्याच्या ५४ मित्रांना धम्मोपदेश केला आणि त्यांना जनकल्याणाकरिता जन्मभर भ्रमण करण्याचा आदेश दिला, तर यावेळी तथागत बुद्ध असे म्हणतात की, ” हे भिक्खुनो ! बहुजनाच्या हितासाठी व सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करून तुम्ही सर्व बाहेर पडा. देव आणि मनुष्याच्या हितास व सुखास कारण ठरणारा हा धम्मोपदेश सुरूवातीस, मध्य स्थितीत आणि अंतिम घटकेपर्यंत देखील कल्याणप्रद आहे.”
जेथे भगवंतानी या पंचवर्गीय भिक्खूंना दीक्षा दिली त्या ठिकाणास पुढे ‘ धम्मेक स्तूप ‘ या नावाने तर जेथे वर्षावासासाठी तथागत वास्तव्य करून होते, त्या ठिकाणास ‘ मूलगंधकुटी ‘ असे म्हणतात. सम्राट अशोक आपल्या राज्याभिषेकाच्या २४ व्या वर्षी स्थवीर उपगुप्त यांच्या सोबत येथे आला व त्याने पंचवर्गीयांना जेथे उपदेश दिला गेला तेथे एक भव्य स्तूप व त्याच्या शेजारी एक विहार बांधला. ज्या ठिकाणी भगवंत वर्षावासासाठी थांबले त्या जागेवरील मूलगंधकूटी विहाराचे अवशेष आजही पहावयास सापडतात. त्याच्या दक्षिणेस विशाल धम्मेक स्तूप, पश्चिमेस स्तंभ, त्या स्तंभावर चतुर्मुखी सिंहमूर्ती बसवलेली होती. त्या शीर्षावर एक चक्रसुद्धा कोरले होते. भारत सरकारने राष्ट्रीय चिन्हाच्या रूपाने चार सिंहशीर्ष स्वीकारले तर ध्वजाच्या मध्यभागी स्थान दिले आहे ते धम्मचक्राला – अशोक चक्राला स्थान दिले. हे सिंहशीर्ष सारनाथ येथील म्युझिअममध्ये सुरक्षित ठेवल्याचे आजही पहावयास मिळते.
चौथी घटना: वर्षावास
पावसाळ्यात कोणा एका विहारात राहून धम्मोपदेश करणे यासच वर्षावास असे म्हणतात. भिक्खूने धम्माची शिकवण देता देता भिक्षा मागून चरितार्थ चालवावा असा दंडक होता. दोन भिक्खूंनी एकत्र न फिरता अलग अलग दिशेने धम्मप्रचार करावयाचा व एका गावी दोन दिवसांपेक्षा अधिक कधीच मुक्काम करावयाचा नाही, असाही नियम तथागतांनी संघासाठी घालून दिलेला होता. पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत मात्र कोणा एका मध्यवर्ती शहराच्या बुद्ध विहारात भिक्खूंनी मुक्काम करावयाचा व तेथे राहून धम्मदेसना करावयाचा प्रघात धम्मात आहे. यासच पावसाळ्यातील मुक्काम म्हणजे ‘वर्षावास’ असे म्हणतात.
भगवंतानी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मदीक्षा सारनाथ येथील मृगदाय वनात दिली. तो कालावधी पावसाळ्याचाच होता. तेव्हा तथागतांनी साजरा केलेला वर्षावास, भगवंताचा व बौद्ध धम्माचा प्रथम वर्षावास या नावाने ओळखला जातो. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते, तर त्याची सांगता अश्विन पौर्णिमेस होते. भगवंतांनी साजरा केलेला वर्षावासाचा प्रथम दिवस होता आषाढ पौर्णिमा, इ. स. पू. ५२८ चा.
***
( संदर्भ :– बारा पौर्णिमांचे महत्व – प्रकाशक – भदंत आर. धम्मांकुर थेरो )
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
🪷 तथागत भगवान बुद्ध, योग आणि विपश्यना : आत्मशुद्धीचा खरा मार्ग 🪷
बुद्ध धम्म (बौद्ध धर्म) हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे Buddha Dhamma (Buddhism) is the path to liberation from suffering.
गौतम बुद्धांचे 10 प्रेरणादायी विचार 10 Inspirational Thoughts of Gautama Buddha