October 1, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

‼️ बुद्ध आणि आजचा समाज ‼️ धीरज कदम

गौतम बुद्ध हे केवळ धार्मिक गुरु नव्हते, तर ते महान समाजसुधारक आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यांनी सुमारे २६०० वर्षांपूर्वी जे विचार मांडले, ते आजच्या आधुनिक समाजासाठी तितकेच सुसंगत आणि आवश्यक आहेत.

बुद्धांनी दिलेले अहिंसा, करुणा, समता, संयम आणि मध्यम मार्गाचे तत्त्व आजही सामाजिक समतेसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांनी सांगितले की, माणसाचे मूल्य त्याच्या कर्मावरून ठरते, जन्मावरून नाही. हे विचार आजही जातिव्यवस्था, विषमता आणि भेदभावाच्या विरोधात प्रभावी शस्त्र ठरतात.

आजचा समाज तंत्रज्ञान, विज्ञान आणि प्रगतीच्या मार्गावर जरी पुढे गेला असला; तरी मानसिक अशांती, असहिष्णुता, द्वेष आणि स्वार्थी वृत्ती वाढत चालली आहे. अशा वेळी बुद्धांचे तत्त्वज्ञान माणसाला अंतर्मुख करून शांतता आणि संतुलनाकडे नेते. त्यांनी दिलेले अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टिकोन, सम्यक आचार विचार, आणि सम्यक जीवनशैली हे आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

बुद्धांनी शिकवलेली करुणा आणि सहिष्णुता जर प्रत्येकाने आत्मसात केली; तर समाजात प्रेम, समता आणि सौहार्द निर्माण होईल. त्यामुळे आजच्या अस्वस्थ आणि तणावग्रस्त समाजासाठी बुद्धांचे विचार म्हणजे एक कालातीत, शाश्वत आणि शांततेचा मार्ग आहे. त्यांच्या शिकवणीचा स्वीकार म्हणजे एक आदर्श समाज घडवण्याची दिशा आहे.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण