भाषावार प्रांतरचना करताना मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद तत्कालिन विचारवंतांनी (विशेषतः प्रा. सी. एन. वकील, प्रा. दातवाला आणि प्रा. घीवाला यांनी) केला होता. यावर मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ? याचे सर्वात प्रभावी आणि परखड विवेचन केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी !
( संदर्भ: ‘महाराष्ट्र- एक भाषिक राज्य’, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे सादर केलेले निवेदन ).
विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सडेतोड आणि तर्कसंगत उत्तरे यांचा गोषवारा खालीलप्रमाणेः
आक्षेप “मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तरः
“महाराष्ट्र प्रांताच्या संदर्भात मुंबईचे स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रांताची रचना झाल्यास तो आकाराने त्रिकोणी असेल. या त्रिकोणाची एक बाजू ही उत्तरेकडील दमण आणि दक्षिणेकडील कारवार यांमधील भारताची पश्चिम किनारपट्टी आहे. मुंबई शहर हे दमण आणि कारवारच्या मध्यावर पडते. गुजरात प्रांत दमणपासून पुढे उत्तरेकडे पसरतो. कन्नड प्रांत कारवारपासून पुढे दक्षिणेकडे पसरतो… जर दमण आणि कारवारमधील अखंड प्रदेश भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा भाग ठरतो, तर फक्त मुंबईच महाराष्ट्राचा भाग का बरे होऊ शकत नाही? ही निर्विवाद नैसर्गिक वस्तुस्थिती आहे. भूगोलाने मुंबईला महाराष्ट्राचा हिस्सा ठरविले आहे. जे या नैसर्गिक तथ्यालाच आव्हान देऊ इच्छितात त्यांना ते करू द्यावे. मात्र निःपक्षपाती बुद्धी याच निष्कर्षात येते की, मुंबई महाराष्ट्राचीच आहे.”
आक्षेपः “मुंबई कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तरः
“मराठ्यांनी मुंबईला आपल्या साम्राज्याचा एक भाग बनविण्याची पर्वा केली नाही, ही बाब भौगोलिकतेपासून काढलेल्या निष्कर्षाच्या वैधतेवर कोणताही परिणाम करीत नाही. मराठ्यांनी मुंबई जिंकून घेण्याविषयी गांभीर्य दाखविले नाही यावरून मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही, असे सिद्ध होत नाही. याचा अर्थ एवढाच होतो की, मराठेशाही ही भूमीवरील सत्ता होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांचे बळ बंदर जिंकून घेण्यासाठी वापरले नाही.”
आक्षेपः “मुंबई शहराच्या लोकसंख्येत मराठी भाषक मेजॉरिटीने नाहीत.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तरः
“भारताच्या सर्व भागांतील लोकांना जर मुंबईत येण्याची आणि स्थायिक होण्याची मुभा आहे तर त्याची शिक्षा महाराष्ट्रीयांनी का भोगावी? हा त्यांचा दोष नाही. म्हणूनच आजच्या लोकसंख्येची वस्तुस्थिती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी आधारभूत ठरू शकत नाही.”
आक्षेपः “गुजराती हे मुंबईचे जुने रहिवाशी आहेत.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तरः
“गुजराती मंडळी आपणहून मुंबईत आली नाहीत. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना व्यापारी अडते दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले गेले. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या अधिकाऱ्याची पहिली फॅक्टरी सुरतमध्ये होती, त्यांना त्यांचा धंदा चालविण्यासाठी, दलाल म्हणून सुरती बनियांची गरज होती. गुजरात्यांच्या मुंबई वास्तव्याचे हे स्पष्टीकरण आहे. दुसरे असे की, अन्य व्यापाऱ्याशी तुल्यबळ स्पर्धा करीत स्वतंत्र व्यापार करण्यासाठी गुजराती मुंबईत आले नाहीत. ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना दिलेल्या काही विशेष व्यापारी हक्कांचा फायदा घेऊन आलेली ही मंडळी होती.”
आक्षेपः “मुंबई हे महाराष्ट्राबाहेरील फार मोठ्या प्रदेशाचे व्यापारी केंद्र आहे म्हणून मुंबईवर महाराष्ट्राला हक्क सांगता येणार नाही. मुंबई ही पूर्ण देशाची आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तरः
“मुंबई संपूर्ण भारताची बाजारपेठ आहे हे स्वीकारता येईल. मात्र, त्यामुळे महाराष्ट्र मुंबईवर हक्क सांगू शकत नाही, हे म्हणणे समजून घेणे अवघड आहे. कोणतेही बंदर ते ज्या देशाचे असते त्यापलीकडे अधिक मोठ्या परिसराची सेवा बजावते. त्या बळावर कुणी असे म्हणू शकत नाही की, ज्या प्रदेशात ते बंदर आहे तो प्रदेश त्या बंदरावर आपला भूभाग म्हणून हक्क सांगू शकत नाही… तर मग मुंबईवर हक्क सांगण्यापासून महाराष्ट्राला का रोखता ? केवळ एवढ्यासाठीच की बंदर म्हणून मुंबई महाराष्ट्राखेरीज इतरही प्रांतांची सेवा बजावते ? आता महाराष्ट्रतरांसाठी हे बंदर बंद करण्याचा अधिकार महाराष्ट्राला असता तर गोष्ट वेगळी. असा अधिकार राज्यघटनेनुसार असणार नाही. परिणामतः मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याने महाराष्ट्रतरांनी या बंदराचा वापर करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.”
आक्षेपः “मुंबईतील गुजराती भाषिकांनी मुंबईचा व्यापार आणि उद्योगधंदा उभा केला. महाराष्ट्रीय केवळ कारकून आणि हमाल राहिले. महाराष्ट्रीय नावाखाली येणाऱ्या या कामगारवर्गाच्या राजकीय वर्चस्वाखाली व्यापार-उद्योगाच्या मालकाना राहू द्यावे हे चुकीचे ठरेल.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तरः
“मुंबईचा व्यापार-उद्योग कोणी उभा केला, याबाबत फार मोठया संशोधनाची गरज नाही. मुंबईचा व्यापार-उद्योग गुजरात्यांकडून उभारला गेला या म्हणण्याला खरेतर काहीच आधार नाही… तो यूरोपियनांकडून उभारला गेला, गुजरात्यांकडून नाही. गुजराती हे केवळ व्यापारी होते. हे उद्योगपती असण्यापेक्षा वेगळे आहे.” “व्यापार-उदीम गुजरात्यांच्या मालकीचा आहे हा युक्तिवाद मांडून मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी फेटाळता येणार नाही. गहाण ठेवून घेतलेल्या जमिनीवर कायमस्वरुपी बांधकाम केले आहे, अशी सबब पुढे करून गहाण ठेवणाऱ्याने जमिनीच्या परताव्यासाठी केलेली मागणी, गहाण ठेवून घेणारा धुडकावून लावू शकत नाही”
“बिहारमध्ये ज्या जमिनीत कोळसा सापडला ती जमीन बिहारी लोकांच्या मालकीची आहे. कोळशाचे मालक मात्र लोक गुजराती, काठेवाडी आणि यूरोपियन आहेत. तेथील बिहारी लोक गुजराती आणि काठेवाडी कोळसा मालकांबाबत भेदाभेद करण्याची शक्यता नाही काय? या गुजराती आणि काठेवाडी कोळसा उद्योजकांच्या हितार्थ बिहारचे कोळसा क्षेत्र बिहार प्रांतापासून वेगळे करून स्वतंत्र प्रांत स्थापणार काय?”
आक्षेपः “महाराष्ट्राला मुंबई हवी, कारण मुंबईच्या भांडवली नफ्यावर महाराष्ट्राला गुजराण करावयाची आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तरः
“महाराष्ट्रीयांना मुंबई हवी कारण ते मुंबईच्या नफ्यावर जगू इच्छितात हे म्हणणे चुकीचे तर आहेच, पण खरे म्हणजे हेतूबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आहे. अशा काही हेतूंनी महाराष्ट्रीय प्रेरित आहेत का, हे मला ठाऊक नाही. हा काही व्यापारी समाज नाही… पैसा त्यांचा ईश्वर कधीच नव्हता. हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नव्हे. म्हणूनच तर त्यांनी महाराष्ट्राबाहेरील इतर समाजांना महाराष्ट्राच्या व्यापार-उदिमाची मक्तेदारी घेण्यासाठी येऊ दिले… परंतु असा काही हेतू महाराष्ट्रीयांच्या मनात असेल, असे जरी गृहित धरले तर त्यांचे काय चुकले ? मुंबईच्या नफ्यावर त्यांचा अधिक हक्क आहे, हे स्पष्टच आहे, कारण मुंबईचा व्यापार-उदिम उभा करण्यासाठी अन्य प्रांतातील लोकांपेक्षा मजुरांचा पुरवठा करण्याबाबत त्यांचा सहभाग मोठा आहे व मोठा राहील…
“दुसरे असे, मुंबईचा नफा केवळ महाराष्ट्राकडून वापरला जात नाही तर संपूर्ण भारताकडून वापरला जातो. इन्कम टॅक्स, सुपर टॅक्स इत्यादी म्हणून जी संपत्ती मुंबई केंद्र सरकारला देते, ती केंद्र सरकारकडून संपूर्ण भारतासाठी वापरली जाते आणि सर्व प्रांतांना त्यातील वाटा मिळतो. मुंबईचा नफा संयुक्त प्रांत, बिहार, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल आणि मद्रासने गिळंकृत केला तर ते प्रा. वकीलांना चालतो. त्यांची हरकत कशाला तर महाराष्ट्राला त्यातील काही हिस्सा मिळणे याला. हा युक्तिवाद नव्हे. त्यांच्या महाराष्ट्रद्वेषाचे दर्शन आहे…”
त्याच निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात :
“मुंबईप्रमाणेच कलकत्ता ही संपूर्ण पूर्व भारताची बाजारपेठ आहे. मुंबईतील महाराष्ट्रीयांप्रमाणेच कलकत्त्यात बंगाली अल्पसंख्याक आहेत. मुंबईतील महाराष्ट्रीयांप्रमाणेच कलकत्त्यातील बंगालीही व्यापार-उदिमाचे मालक नाहीत. कलकत्त्यातील बंगाल्यांची स्थिती तर मुंबईतील महाराष्ट्रीयांपेक्षा डळमळीत आहे. उदाहरणार्थ- महाराष्ट्रीय किमान असा दावा करू शकतात की, त्यांनी मुंबईतील व्यापार-उद्योगांना भांडवल पुरवले नसले तरी कामगार पुरवले आहेत. बंगाली हेही म्हणू शकत नाहीत. मुंबई महाराष्ट्रापासून विलग करण्याचा आग्रही युक्तिवाद जर (राज्य पुनर्रचना) आयोगाने स्वीकारला तर त्याचबरोबर आयोगाला कलकत्ता पश्चिम बंगालपासून वेगळा करावा, अशी शिफारसही करावी लागेल, कारण, ज्या कारणासाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकते तेच कारण अस्तित्वात असताना कलकत्ता मात्र पश्चिम बंगालपासून वेगळा का केला जात नाही, असा समर्पक प्रश्न विचारला जाऊ शकतो…” महाराष्ट्र आणि मुंबई केवळ परस्परावलंबीच नाहीत तर अभिन्न आणि अतूट आहेत. त्यांचे विभाजन दोहोंसाठी घातक ठरू शकेल. मुंबईसाठीच्या वीजपाण्याचा स्त्रोत महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा बुद्धिजीवी वर्ग मुंबईत राहतो. महाराष्ट्रातून मुंबई वेगळी काढणे म्हणजे मुंबईचे आर्थिक जीवन डळमळीत करणे होय…”
More Stories
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर
भारतीय स्वातंत्र्य आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका – अनिल वैद्य