जेव्हा केंव्हा एखादी घटना घडते तेंव्हा ती कशी घडली ? ती घडण्याचे कारण काय ? हे जाणून घेण्याची जिज्ञासा ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. बरेचदा कारण आणि फलित होणारे कर्म एक दुसऱ्याच्या इतके निकट असतात की, त्या कर्माचे कारण जाणून घेणे फारसे कठीण जात नाही. परंतु काही वेळा कारण आणि फलित होणारे कर्म एक दुसऱ्यापासून इतके दूर असतात की, कर्माचे कारण जाणून घेणे कठीण होते. सकृतदर्शनी या परिणामाचे कारणच नाही असे वाटते. तेंव्हा प्रश्न उपस्थित होतो, ही घटना कशी घडली? त्याचे सर्वसामान्य उत्तर असे की, ही घटना पराप्राकृतिक कारणाचा परिणाम होय. यालाच बरेचदा चमत्कार म्हटले जाते.
बुद्धाच्या पूर्ववर्तींनी या प्रश्नाची विविध उत्तरे दिली. पक्कुद कच्चान म्हणतो, प्रत्येक कार्याला कारण असतेच असे नाही. त्याच्या मते घटना करणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मख्खली घोषल हे मान्य करतो की, घटनेला कारण असते, परंतु तो असा प्रचार करीत होता की, हे कारण दैव यासारख्या घटकात शोधले पाहिजे.
बुद्धाने या सिद्धांताचे खंडन केले. त्याने हे ठामपणे प्रस्थापित केले की, प्रत्येक घटनेला कारण असतेच. ते कारण नैसर्गिक प्राकृतिक नियमाचा परिणाम तरी असते किंवा मानवीय कर्माचा परिणाम तरी असते. काल, प्रकृती आणि आवश्यकता इत्यादीना घटनाचे कारण म्हणून स्वीकारण्यास त्याचा विरोध होता. त्याचे स्पष्टीकरण असे. जर काल, प्रकृती, आवश्यकता आदी तत्वे घटना घडण्याचे एकमात्र कारण असतील तर आह्मी कोण आहोत? आम्हचे प्रयोजन काय? मनुष्य काल, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर देव, आवश्यकता आदीच्या हातातील केवळ कळसूत्री बाहुले आहे काय? मानव मुक्त नसेल तर त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? पराप्राकृतिक कारणावर त्याची श्रद्धा असेल तर त्याच्या बुद्धिवंत होण्याचे कारण काय? जर मानव मुक्त असेल तर प्रत्येक घटना ही त्याच्या कृतीत परिणाम असावयास पाहिजे. कोणतीही अशी असू शकत नाही की, त्याला परा प्राकृतिक कारण असेल. ही शक्यता आहे की, एखादी घटना घडल्या नंतर त्या पाठीमागचे खरे कारण शोधणे माणसाला शक्य झाले नसेल. परंतु मनुष्य बुद्धिवंत असेल तर एक ना एक दिवस त्या कारणाचा शोध घेईलच.
पराप्राकृतिक वादाचे खंडण करण्यात बुध्दाचे तीन हेतू होते. त्यांचा प्रथम हेतू माणसाला विवेक पथावर अग्रेसर करणे हा होता. त्यांचा दुसरा हेतू माणसाला सत्य शोधण्या साठी मुक्त करणे हा होता. आणि तिसरा हेतू मिथ्या विश्वास, अंधश्रद्धेच्या प्रमुख कारणाचा समूळ उच्छेद करणे हा होता.कारण मिथ्या विश्वास, अंधश्रद्धा या मानवच्या सत्य शोधण्याच्या प्रवृतीची हत्या करतात. याला बुद्ध धम्मात कर्म सिद्धांत किंवा हेतूवाद म्हणतात. कर्म सिद्धांत किंवा हेतूवाद हा बौद्ध धम्माचा केंद्रीय सिद्धांत आहे. हा सिद्धांत विवेकवादाचा पुरस्कार करतो आणि बौद्ध धम्म म्हणजे विवेक वादाशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून पराप्राकृतिक शक्तीची उपासना म्हणजे अधम्म होय.
“बुद्ध आणि धम्म ” या पुस्तकातून सादर
संकलन – हंसराज कांबळे, नागपूर
मो. न.8626021520
More Stories
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu