June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

दी ग्रेट नागमहार

महार हे भारताचे मूळ व पुरातन रहिवाशी आहेत. महाराचा प्राचीन इतिहास मोठा गौरवशाली शूरवीरांचा होता. महार ही मूळ राज्यकर्ती जमात होती. महाराच्या उज्वल इतिहासाला उच्चवर्णीयांनी दडपून टाकले. यूरोपीय संशोधक जॉन विल्सन यांनी महाराष्ट्र हे महाराचे राज्य असलेला देश होता असे म्हटले आहे. जे. टी मोलवर्थ यांचे सुद्धा हेच मत आहे. राजाराम शास्त्री भागवत यांनी शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून प्राचीन नाग म्हणजे “महार ” होय असे म्हटले आहे. जागतिक किर्तीचे डॉ. केतकर यांनी महाराष्ट्र हे महाराचे प्राचीन राज्य आहे असे म्हटले आहे. महात्मा जोतिबा फुले आपल्या ‘गुलामगिरी ‘ ह्या पुस्तकात लिहितात महार हे पूर्वीचे राजे होते. मांग स्वदेशासाठी भट लोकांशी लढले म्हणून भटांनी त्यांची अशी दुर्दशा केली की, त्यांना अन्न करावयास लावले. विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात की, महार हे मध्य युगात जमिनीचे मालक होते. वतनदार म्हणून वावरत आलेले आहेत. समाज शास्त्रज्ञ दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर आपले मत मांडताना म्हणतात की, सर्व अस्पृश्यात हिंदू उच्च वर्णियांनी फक्त महार जातीचाच जास्त अपमान व छळ केला.
महार लोक आपल्या नावापुढे नाक हे उपपद लावीत असत. नाक हे नाग शब्दाचा अपभ्रंश आहे. जानेवारी 1818 रोजी दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज फलटणी सोबत भीमा कोरेगाव (पुणे ) येथे युद्ध झाले होते. स्वतः बाजीराव पेशवे सैन्यासोबत त्या युद्धात होते. ते अरबी पठाण लोकांच्या फलटणीसह 28000 सैन्य तोफ गोळयासह होते. इंग्रज फलटण प्रमुख कॅप्टन स्टाटन (कलकत्ता) सोबत दोन तोफा व 800 सैनिक होते. त्यात जास्तीत जास्त महार सैनिक होते. रात्रभर इंग्रज व पेशवे यांच्यात घनघोर युद्ध झाले व बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला. त्या विजयाप्रित्यर्थ इंग्रजानी भीमा कोरेगावं येथे दगडाचा विजयी स्तंभ उभारला तो आजही अस्तित्वात आहे. त्यावर युद्धात ठार झालेल्यांची नावे आहेत. त्यात महार सैनिकांची नावे “नाक ” हे उपपद लावून कोरलेली आहेत. नावे पुढीलप्रमाणे –
1) मेतर नाईक

2) सोननाक

3) कमलानाक

4) रायनाक पेसनाक शिपाई

5) गोरनाक कोठेनाक शिपाई

6) रामनाक येसनाक शिपाई

7) भागनाक हरनाक शिपाई

8) अंबनाक काननाक शिपाई

9) गणनाक बाळनाक शिपाई

10) बालनाक बोडनाक शिपाई

11) रुपनाक नखनाक शिपाई

12) बदनाक रामनाक शिपाई

13) विटानांक धामनाक शिपाई

14) राजनाक मननाक शिपाई

15) बपनाक हरनाक शिपाई

16) रैनाक जाननाक शिपाई

17) सजनाक यसनाक शिपाई

18)गोपाळनाक बाळनाक शिपाई

19)हरनाक इरनाक शिपाई

20) जाननाक इरनाक परगावं वाला

21) हिकनाक रतननाक शिपाई

22) रतननाक भाननाक शिपाई

याप्रमाणे फार पूर्वीपासून “नाक ” ही उपाधी फक्त महारांची होती. बिदरच्या मुस्लिम बादशहाने महारांना जी 52 हक्काची सनद दिली होती, ती सनद अंबरनाक महाराचे नावाने आहे. छत्रपती शाहू राजांच्या काळात सातारा जिल्हातील कळबी गावचा जहागीरदार सिद्धनाक महार फार लढवय्या होता. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षांत सभारंभात महार हे पूर्वीचे नागवंशीय राजे होते असे म्हटले आहे. आंध्र आणि त्याचे जवळचा प्रदेश नाग लोकांच्या कारभाराखाली होता. सातवाहन राज्याचे काळात बेल्लोरी जिल्यात स्कंदनाक नावाचा राजा राज्य करीत होता.
पुरातन काळाच्या बौद्ध धर्माच्या खाणाखुणा आजही लेण्या, गुंफा, पुरातन मंदिराच्या रूपाने अस्तित्वात आहेत. फक्त त्या शोधण्याची दृष्टी आपले जवळ असण्याची गरज आहे. नुकतेच जान प्रिन्सेप या पाश्चात्त्य इंग्रज अधिकाऱ्याने लेणी, गुहा, शिलालेखावरील ब्राह्मी लिपी बाराखडी चा शोध लावून वाचन केले आहे. व माहिती प्रकाशीत केली आहे. त्यांच्या वाचनातून खालील पुरातन लिहिलेल्या लेण्यात दानधर्म केल्याचा महार लोक महार नागांचे लोकांचा उल्लेख आढळतो.
1) कान्हेरी येथील लेण्यात शिलालेखावर नकनाक, अपरनाक, धमनाक, मोलनाक, मित्तनाक यांच्या नावाचा उल्लेख आहे.
2) भाजा लेणी शिलालेखात -अंपीनाक किंवा अदिकीनाक
3) कुडा येथील लेणी -वसुलनाक, पुसनाक
4) बेडसा येथील शिलालेखात नाशिक चा शेठ आनंदचा मुलगा पुसनाक, अपरदेवनाक याची बायको महाभोजाची मुलगी महार्थिनी महादेवी समादीनिका यांचे नावाने आहे.
5) कार्ला लेणीत -महारथी अगीमीतनाक, मितदेवनाक व उसभनाक
6) शिवनेरी लेणी – विरसेननाक
7) नाशिक येथील बुद्ध लेणीत -राज्यमंत्री अरहलय चाळीसनाक राज्यमंत्री आगीयतनाक, कफकनाक, रामानाक इत्यादी नावाचा उल्लेख आढळतो.
8) नानाघाट लेणीत महारथी त्र्यंनाक राणी नायनिका यांची नावे आहेत.
9) अजिंठा लेणीत – नागराजा व राणीच्या मुर्त्या आहेत.
ह्यावरून हे सिद्ध होते की, आजचे महार हे पूर्वीचे नाग असून राजे, शेठ, विद्वान व श्रीमंत होते. कट्टर बौद्ध धर्मीय होते ते कधीच दरिद्री नव्हते.
एकसंघ नाग बौद्धाचे अनेक गट पाडले व त्यांच्यात जबरदस्त फूट पाडली कारण एकच की, त्यांनी एकत्र येऊन बौद्ध धर्म पुन्हा मजबूत करू नये. त्यासाठी खालील पोटजाती महाराच्या पाडल्या. अवणे, अंधोण, अनंत, कुल्थ, ओढकांबळे, वलयी, बालकांबळे, बार्के, बावना, नाविशे, बेले, होन, बंकर, बोले, चेंलकर, डोले, धेड, धार्मिक, डोंब, गरदी, गवसई धडशी, घाटकांबळे, गोंडवाना, गोपाळ, हेडशी, डोलार, झाडें, जोगती, जुनरे, कबुर्ले, लाडवन, कांबळे, मढकांबळे, मुरली, प्राण, प्रधान, पुलार, रती, सलादी, शिलावात, शिरसाळकर, सोमवंशी, सोनकांबळे, सोमयबल, सुताड, तिलवन, पानमहार, विणकर, गसेवार, देस्कर, हटकर, गोडालिमा, रायपुरे, धरशीक, डोंगरवार, झाडेंवान, सुरती, पाजींनी व म्हली!
ह्या प्रमाणे पोटजाती पाडून त्या सर्वांना तुमचीच पोटजात सर्व पोटजातीत श्रेष्ठ आहे असा कानमंत्र दिला. ह्या भिकार कानमंत्राने आपणास आज पर्यंत एकत्र येऊ दिले नाही हा महान हेतू त्यांनी साधलेला आहे. त्यांनी एकत्र येऊन बौद्ध धम्मात जाऊन पुह्ना धम्म बळकट करू नये हाच तो मूळ उद्देश बौद्ध विरोधकाचा होता. तरीही सत्याचा विजय होत असतो. आज त्याच अस्ताव्यस्त व देशोधडीला लागलेल्या महार नागाने ग्रेट महार बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्य स्पर्शाने आह्मी पुन्हा बौद्ध एकसंघ झालो आहोत. म्हणून पोटजातीचे भेदाभेदी चे राजकारण सोडून सर्वांनी बौद्ध धम्मा करिता मनाने एकत्र आले पाहिजे व धम्म कार्य करायला लागलो पाहिजे.