June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

समृद्धी महामार्गावरील 12 जणांच्या मृत्यूला RTO अधिकारी जबाबदार, दोघांचे निलंबन, सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल

Samrudhhi Highway Accident :आरटीओ खात्यातील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचं  निलंबनही करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही आहे. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर काळानं घाला घातला. या अपघाताला आरटीओ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप अपघातग्रस्तांनी केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातासाठी (Samrudhhi Highway Accident) आरटीओ अधिकारी जबाबदार असल्याचं सांगत दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचं नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.

ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात असून दोनही आरटीओ अधिकाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. अपघात होताच आरटीओ अधिकारी त्या ठिकाणाहून पळून गेले मग नंतर परत येऊन त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे.

नाशिक जिल्ह्यातील 35 भाविक बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. ते तेथून परतत असताना वाहनाला अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक बसली. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर शासकीय खर्चांनी उपचार करण्याचे निर्देश दिलेत तर पंतप्रधान मोदींनींही यावर शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी फिर्यादी कमलेश मस्के याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी ड्रायव्हर ब्रिजेशकुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरटीओ अधिकारी प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

अपघात कसा घडला ? 

बुलढाण्याहून वैजापूर मार्गे निघालेल्या या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर आल्यावर बसच्या पुढे एक ट्रक चालत होता. यावेळी जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला. यामुळे ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळायच्या आत ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे दिसून आलं. मात्र या अपघातात पुन्हा एकदा बारा निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी काळरात्र ठरली आहे.