June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

 तथागता तुच माझ्या गुरुंचा गुरू

या लेखात आपण प्रामुख्याने तीन प्रसंगांचा अभ्यास करणार आहोत.
1) राहुलची धम्मदिक्षा
2) भंते अश्वजीत व भंते सारीपुत्र यांची भेट
3) पंचवर्गीय भिक्षुंना धम्माचा प्रथम उपदेश.

1) राहुलची धम्मदिक्षा
ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तथागत बुद्ध सात वर्षांनी कपीलवस्तु येथे आले होते. तेथे माता यशोधरा यांनी सात वर्षीय राहुल यांना पुढे करून तथागत बुद्धांना गृह बंधनात बांधण्याचा प्रयत्न केला होता. माता यशोधरा यांनी राजकुमार राहुल यांना तथागत बुद्धाकडे पुत्र या नात्याने वारसा हक्क मागण्यासाठी सांगितले.
राजकुमार राहुलने तथागताकडे वारसा हक्क मागण्यास सुरुवात केली. व ते एकसारखे
“मला माझा वारसा हक्क द्या”
असे म्हणु लागले व त्यांना कुणीही तसे करण्यापासून आडवले नाही. तथागत राहुलास म्हणाले की,
“राहुल, बुद्ध धम्म व संघ या त्रिरत्नांच्या अध्यात्मिक संपंत्तीचा विपुल साठा माझ्याजवळ आहे. ती संपत्ती घेऊन जपण्याची क्षमता व योग्यता तुझ्यात असेल तर मी तुला वारसा हक्क देत आहे.”

राजकुमार राहुल यांनी स्वीकृती दिल्यावर तथागत बुद्धांनी राहुल यांना प्रवजीत करून भिक्षुसंघात सामील करण्यासाठी सारीपुत्र यांना सांगितले. राहुल यांचा दिक्षा विधी स्वतः भंते सारीपुत्र व भंते महामोग्गलायन यांनी केला होता, त्यामुळे धम्म सेनापती सारीपुत्र व भंते महामोग्गलायन हे राहुल यांचे अध्यात्मिक गुरू बनले.

2) भंते अश्वजीत व भंते सारीपुत्र यांची भेट
भंते अश्वजीत हे भिक्षाटन करण्यासाठी हलकी पावले टाकत गावात जात होते. त्यांची प्रसंन्न मुद्रा बघुन भंते सारीपुत्र अत्यंत प्रभावित झाले, त्यांनी भंते अश्वजीत यांना विचारले की,
“तुम्ही कुणाचे शिष्य आहात व तुमच्या धम्माचे मर्म काय आहे ?”
भंते अश्वजीत यांनी सांगितले की,
“मी सम्यक संबद्ध सिद्धार्थ गौतम यांचा शिष्य आहे.”
असे म्हणुन त्यांनी पुढील गाथा म्हटली.
“ये धम्मा हेतुप्पभवा तेसं हेतु तथागतो आह, तेसञ्ञ निरोधो एवं वादि महासमणो’ति”
म्हणजेच
कारणापासुन उत्पन्न झालेले जे दुःखद पदार्थ आहेत यांचे कारण तथागताने सांगितले आहे. व त्यांचा निरोध कसा होतो हेही महाश्रमणाने सांगितले आहे.
यानंतर भगवान बुद्धाच्या धम्मातील तथ्य जाणून भंते सारीपुत्र व भंते महामोग्गलायन यांनी भगवान बुद्धाच्या संघामधे दिक्षा घेतली. भंते सारीपुत्र म्हणतात की,
“जर मला भंते अश्वजीत भेटले नसते तर कदाचित माझे आयुष्यच वाया गेले असते. त्यांच्या मुळेच मला तथागताची भेट झाली व दिव्यज्ञान प्राप्त झाले.”
धम्म सेनापती सारीपुत्र यांनी भंते अश्वजीत यांना गुरू मानले होते. भंते अश्वजीत ज्याही गावात धम्म प्रचारासाठी गेले असायचे भंते सारीपुत्र सायंकाळी त्या दिशेला हात जोडून नमस्कार करायचे व त्या दिशेला कधीही पाय पसरून झोपत नसत.

3) पंचवर्गीय भिक्षुंना धम्माचा प्रथम उपदेश
ज्ञान प्राप्ती झाल्यावर तथागतांनी धम्माचा प्रथम उपदेश हा पंचवर्गीय भिक्षुंना देण्याचे ठरवले. त्यावेळी
पंचवर्गीय भिक्षु कौंडिण्य, अश्वजीत, महानाम, वप्प व भद्दीय हे वाराणसीच्या ॠषिपतन मृगदाय वनामधे विहार करत होते. तिथे गेल्यावर भगवान बुद्ध पंचवर्गीय भिक्षुंना संबोधित करतांना म्हटले की,
हे भिक्षुंनो, सन्यस्त जीवन जगत असताना दोन टोकाच्या गोष्टी आहेत ज्यांना करणे टाळले पाहिजे. कोणत्या दोन? जे हीन, अयोग्य, अनार्य व अनार्थाने भरलेले कामभोगांचे जीवन व दूसरे दुखमय, अनार्य व अनर्थ युक्त आत्मपीडा व देहदंडन तप करणे. भिक्षुंनो, या दोनही टोकाच्या गोष्टीकडे न जाता, तथागतास मध्यम मार्गाचा साक्षात्कार झाला आहे. जो दृष्टी उत्पन्न करणारा आहे, ज्ञान देणारा आहे, शांतीसाठी पुर्ण ज्ञान व निर्वाण प्राप्तीसाठी परिपूर्ण आहे. तो कोणता मध्यम मार्ग आहे, ज्याचा तथागतास साक्षात्कार झाला आहे, जो दृष्टी उत्पन्न करणारा आहे, ज्ञान व निर्वाण प्राप्तीसाठी परिपूर्ण आहे…तो मध्यम मार्ग आर्य आष्टांगीक मार्ग आहे. (Noble Eightfold Path)
जो सम्यक दृष्टी(Right Understanding)
सम्यक संकल्प(Right Thoughts)
सम्यक वाणी(Right Speech)
सम्यक कर्मांत(Right Action)
सम्यक आजीविका(Right Livelihood)
सम्यक व्यायाम(Right Effort)
सम्यक स्मृती (Right Mindfulness)
व सम्यक समाधी(Right Concentration)
भिक्षुनो हाच आहे मध्यम मार्ग जो दृष्टी व ज्ञान उत्पन्न करणारा आहे.
भिक्षुनो, हे दुःख आर्यसत्य आहे, जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजार दुःख आहे, मरण सुद्धा दुःख आहे, प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे, अप्रिय व्यक्तीची भेट दुःख आहे, जे ईच्छित आहे ते न मिळने दुःख आहे, पाच उपादान स्कंध दुःख आहे.

भिक्षुनो, हा दुःख समुदाय आर्यसत्य आहे. ही काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा दुःख समुदाय आहे.

भिक्षुनो, हे दुःख निरोध आर्यसत्य आहे. तृष्णेचा सर्वथा नाश करुन निर्वाणाचा लाभ होऊ शकतो, हे हेच दुःख निरोध आर्यसत्य आहे.

भिक्षुनो, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा हे दुःखचा नाश करुन निर्वाणाचा लाभ करुन देणारे आर्यसत्य आहे, हाच आर्य आष्टांगीक मार्ग आहे. जसे की सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी.

भिक्षुनो, हे दुःख आर्य सत्य आहे. हे पुर्वी न ऐकलेल्या अज्ञात गोष्टींमधे मला दिव्यदृष्टी उत्पन्न झाली आहे. ज्ञान, प्रज्ञा, व विद्या उत्पन्न झाली आहे. हे आर्यसत्य जाणुन घेण्यायोग्य आहे.
जे दुःख समुदाय आर्य सत्य व दुःख निरोध आर्य सत्य आहे. हे पुर्वी न ऐकलेल्या अज्ञात गोष्टींमधे मला दिव्यदृष्टी उत्पन्न झाली आहे. भिक्षुनो दुःख निरोध आर्यसत्याची भावना केली पाहिजे. दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्याची भावना केली पाहिजे.
जोपर्यंत या चारही आर्यसत्याची बारा प्रकारे भावना करुन मला यथार्थ विशुद्ध ज्ञान दर्शन झाले नाही, तोपर्यंत मी दावा नाही केला की, देव, मार, मनुष्यांमधे, श्रमनांमधे अनुत्पन्न सम्यक संबोधिला मी प्राप्त केले आहे. मला चारही आर्य सत्याचे यथार्थ ज्ञान दर्शन जेव्हा झाले तेव्हाच मी दावा केला की देव, मार, मनुष्य व श्रमण यामध्ये प्राप्त करण्यास कठीण अशा सम्यक संबोधिला मी प्राप्त केले आहे. माझ्या मधे ज्ञान दर्शन उत्पन्न झाले आहे. माझी विमुक्ती अचल आहे, माझा हा जन्म अंतिम आहे. पंचवर्गीय भिक्षुंनी संतुष्ट होऊन तथागताच्या उपदेशाचे अभिनंदन केले. तथागताचा उपदेश ऐकुन आयुष्यामान कौंडिण्य यांना न ऐकलेल्या धम्मामधे दृष्टी उत्पन्न झाली व भगवान बुद्धांनी उदान वाक्य म्हटले, ओहो कौंडिण्यला समजले, ओहो कौंडिण्यला समजले.
यामुळे कौंडिण्य यांना आज्ञात कौंडिण्य नाव पडले.
वरील तीनही प्रसंगातून आपल्या लक्षात येते की आयुष्यामान राहुल यांचे गुरू भंते सारीपुत्र व भंते महामोग्गलायन यांनी आहेत. भंते सारीपुत्र व भंते महामोग्गलायन यांचे गुरू भंते अश्वजीत आहेत. भंते अश्वजीत व त्याचे चार सहकारी यांचे गुरू सम्यक संबद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत.

You are in Dhamma
राहुल खरे, नाशिक
9960999363