June 3, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही

“हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा आम्हाला लागलेला हा डागच आमच्या प्रगतीच्या आड येत आहे. तुमच्या सार्‍या मानहानीचे, सवर्ण हिंदूंच्या आमच्या बाबतीत तुच्छतापर वर्तनाचे तेच एक कारण आहे. असे जर आहे तर त्या धर्माच्या नावाचा केवळ शिक्का घेऊन बसण्यात काय अर्थ आहे? ज्याप्रमाणे आम्हाला मनुष्याच्या मोलाचे राहता येण्यात सुद्धा मज्जाव केला जात आहे, त्या हिंदू धर्माच्या कलशाचा एक भाग होऊन आम्ही का म्हणून आयुष्य घालवावे? अशा स्थितीत राहण्यापेक्षा या धर्मातून बाहेर पडून दुसऱ्या एखाद्या धर्माचा, ज्यामध्ये आम्हाला आजही मानखंडना सहन करण्याचा प्रसंग येणार नाही, हलक्‍या नीच दर्जाने वावरण्याची सवय होणार नाही, त्या धर्माचा अंगिकार करणे उचितच नाही का?
अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारावयाचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा. दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि, हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग -१,पान नं. ४३२)
दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ ला येवले (नाशिक) येथे मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषद भरली, त्यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹
संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर