सज्जनहो! आपण म्हणतो आपली स्थिती फार वाईट आहे, लोक आपणाला फार अन्यायाने वागवितात. या सर्व गोष्टी खऱ्या; पण या अन्यायाचा परिहार व्हावा कसा? तुम्हाला कबूल करावे लागेल की, एकदा लादलेल्या वर्चस्वाचा पेच सुटण्यास योग्य उपाय म्हटला म्हणजे ज्यांना त्या पेचाने रग लागली असेल त्यांनी शहाणपण शिकावे आणि सामर्थ्य संपादावे व दिवसाउजेडी प्रतिपक्षाशी सामना करून, त्यांच्या वरचढ होऊन त्यांच्या हातून निसटून जावे अशा प्रकारचे शहाणपण व सामर्थ्य आम्हास कसे व केव्हा प्राप्त होणार?
सज्जनहो! सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. वडिलांनी जे केले तेच त्याच्या मुलांनी करावे, हा शिरस्ता काही रास्त नाही. वस्तुस्थिती बदलल्या बरोबर आचार-विचार पालटणे आवश्यक असते. तसे जर आपण केले नाही तर आपल्या परिस्थितीशी टक्कर देण्यास आपण केव्हाही समर्थ होणार नाही. नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावह होणार नाही. कालगती बरोबर आपल्या हातून जेवढे होईल तेवढे कार्य करणे आवश्यक आहे. तसे जर आपण केले नाही तर काळ बदलेल पण आपल्या स्थितीत मात्र बदल होणार नाही. “!!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-१, पान नं.३०)
दि. ११ एप्रिल १९२५ रोजी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी ‘मुंबई इलाखा प्रांतिक बहिष्कृत परिषद ‘ मध्ये तिसऱ्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
घनघोर संग्राम केला तरच माणुसकी परत मिळेल.

More Stories
“मुंबई महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ?” – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर