June 7, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

साप- मुंगुस, उंदीर- मांजर यांची कधी मैत्री जमेल का ?

कष्टाळू लोकांची संघटना करावयाची झाल्यास त्यात जातीभेद, धर्मभेद यांना मुळीच थारा मिळता कामा नये. हा कष्टाळू वर्ग अगोदरच बिकट आर्थिक दडपणाने दडपला गेलेला आहे. अशा परिस्थितीत ही संघटना झाली आहे तीत मी म्हणत आहे त्याप्रमाणे विषमता दिसता कामा नये आणि आज मी म्हणत आहे अशा तऱ्हेचे सर्व जातींच्या कष्टाळू वर्गाचे हे संघटन पाहून मला आनंद होत आहे. म्हणूनच आजचा दिवस मी मोठ्या भाग्याचा समजतो. कारण की आजची आपली ही संघटना केवळ स्वार्थत्यागाच्या बळावर उभारलेली आहे. आपणास माहिती आहे की या जगात ज्याचे घर पेटते ज्याच्या घराला आग लावली जाते त्याचे व जो आग लावतो त्याचे कधीतरी संगनमत होईल काय? आपण साधारणपणे प्राणिमात्रांना कडेही दृष्टी फेकली तरी साप व मुंगूस कधीतरी एकत्र होऊ शकतील का? तसेच उंदीर- मांजराची मैत्री जमेल का? अशा रीतीने निसर्गाविरुद्ध सृष्टी निर्माण करणारे विषयी आपण कधीतरी विश्वास बाळगाल का?
असल्या फसव्या लोकांची यापुढे खरी पूजा पायाच्या ठाकरीने केली पाहिजे आणि आपला खरा हितकर्ता कोण हे निवडताना यापुढे फार सावधगिरी बाळगा. तुम्हाला बुद्धी प्राप्त झाली आहे. त्या बुद्धीच्या बळावर तुम्ही सारासार विचारसरणीने तुमचे खरे हितकर्ते कोण, कोणता पक्ष तुमच्यासाठी प्राणाचीही पर्वा न करता झगडण्यास समर्थ आहे, याची तुम्हीच निवड करा. खरे पाहिले असता जगात फक्त दोनच जाती आहेत. पहिली श्रीमंतांची दुसरी गरिबांची. आज जसे आपण संघटितपणे येथे आला आहात तसेच जातिभेद धर्मभेद विसरून आपली संघटना जोरदार करा.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२, पान नं.७४)
सोमवार दि.१० जानेवारी १९३८ रोजी मुंबई प्रांतिक असेम्ब्लीच्या बैठकीत मुंबई कौन्सिल हॉल मध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.