“मी आपल्या सार्वजनिक आयुष्यक्रमाची सुरुवात केल्यापासून तो अगदी गेल्या वर्षापर्यंत अस्पृश्य वर्गाच्या चळवळीतच कार्य करीत होतो. परंतु बदललेल्या परिस्थितीला अनुसरून मी आपल्या कामाची दिशा बदलली आणि यापुढे धर्म आणि जात यांचा विचार न करता सर्व शेतकरी- कामकरी वर्गाच्या हिताच्या दृष्टीने कार्य करण्यास सुरुवात केली. मी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष हाच माझा बदललेल्या कार्यक्रमाचा द्योतकआहे.
आता राजकीय क्षेत्रात जिकडे तिकडे थंड वातावरण निर्माण झालेले आहे. सारा राजकीय खेळ बंद झाला आहे आणि सर्व बाजूला उद्वेगजनक परिस्थिती दृष्टोत्पत्तीस येत आहे. मात्र या परिस्थितीची जबाबदारी आपल्यावर बिलकुल नाही. राजकारणात अल्पसंख्य पक्षाला पुढाकार घेऊन काही करता येत नाही. लोकहितासाठी काहीतरी भरीव स्वरूपाचे कार्य करण्याची कायदेमंडळातील जबाबदारी आपल्याकडून पार पडली नाही तर त्याचा दोष ज्यांनी हा विपरीत प्रसंग निर्माण केला त्याच्या डोक्यावर बसेल. आज राजकारणाचा डाव बंद पडला असला तरी ज्या दिवशी हा डाव नव्याने सुरू होईल, त्यावेळेस जरूर असणारी तयारी आमच्याजवळ मजबूत आहे. आम्हाला जे कायदे घडवून आणावयाचे आहेत त्यांचे बार आमच्याजवळ भरून तयार आहेत. आज जरी सर्वत्र निराशेचे वातावरण पसरले असले तरी लवकरच अशायुक्त परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला निराश होण्याचे बिलकुल कारण नाही.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१८, भाग-२, पान नं. २७)
रविवार दि. ३० मे १९३७ रोजी परळ, मुंबई येथील कामगार मैदानावर कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
केवळ निवडणुकीत विजय मिळविल्याने चळवळीचे कार्य संपले असे समजू नका

More Stories
मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकरानंतर बौद्ध समाज
बौद्ध धम्मात धर्मांतर