नमो बुद्धाय जयभिम!
घर घर माघ पौर्णिमा उत्सव साजरा करूया,
प्रत्येक परिवारात धम्म संस्कृति रुजवूया
उद्या बुधवार,दिनांक 16 फेब्रूवारी 2022 माघ पौर्णिमा निमित्त विशेष लेख-
धम्मकार्यासाठी नियमित दान देणे हा गृहस्थाचा मंगल ( श्रेष्ठ ) धर्म आहे
दान का द्यावे?दान काय द्यावे?दान किती द्यावे व दान कोणाला द्यावे?
वरील चारही प्रश्न सहसा नेहमीच बुध्दविहारात नियमित जाणाऱ्या अथवा न जाणाऱ्या बौध्द उपासकांना पडत असतात.दान का द्यावे याचे उत्तर दान देणे हे बौध्द धम्मामध्ये महान कुशल कर्म समजले जाते.त्यामुळेच धम्मामध्ये दान ही दस पारमितापैकी एक महत्वपूर्ण पारमिता मानली आहे.जर दान देण्याचे कोणतेही फळ नसते तर मग धम्मामध्ये दान करायला का सांगितले गेले याचा आपण अवश्य विचार करावा?
दान देताना जे उपयोगी असते तेच दान करावे. जेणेकरून देणाऱ्याला दान दिल्याचे व घेणाऱ्याला दान स्विकारल्याचे सुख लाभेल. इथे देणारा जितका श्रेष्ठ असतो तितकाच दान घेणाराही श्रेष्ठच असतो. दान देण्यामागे देणाऱ्याचा अंहकार कमी व्हावा व घेणाऱ्याच्या मनामध्ये देखील दान दात्याच्या प्रती मंगल भावना असावी.किंबहुना दान घेणारा हा आपल्यावर आपले दान स्विकारून एक प्रकारे अनुकंपाच करत असतो.म्हणून आपण सतत दान देत राहिले पाहिजे.कारण दान दिल्याने तेच दान आपल्याला कित्येक पटिने योग्यवेळी परत मिळत असते.
धम्मामध्ये दानाचे अनेक प्रकारचे दान सांगितले आहे.जसे की,वेळदान,श्रमदान, फलाहारदान, अष्टपरिस्कार,भोजनदान, वस्त्र(चिवरदान),आर्थिकदान,औषधदान,बुध्द विहारासाठी, भिक्खू संघाच्या निवासस्थानासाठी जमिनदान,धम्म प्रचारासाठी स्वतः मुलगा किंवा मुलगी म्हणजेच संततीदान करणे. त्याचप्रमाणे इतर मानवी जिवनासाठी आवश्यक रक्तदान, अवयवदान,नेत्रदान आदी. सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. वरील जे दान करणे शक्य असते ते दान नियमित अवश्य करत राहिले पाहिजे.
दान किती द्यावे याचे उत्तर आहे यथाशक्ति दान दिले पाहिजे. आपल्या आर्थिक कुवती प्रमाणे दान केले पाहिजे.परंतु, आपली अधिक दान देण्याची अंगी क्षमता असूनही जर आपण कमी दान दिले तर याचा अर्थ होतो की, आपल्याला दानाचे विशेष महत्व कळाले नसावे किंवा दान देण्यामध्ये आपण कंजूसपणा केला. दान देताना ते उदार भावनेने द्यावे.म्हणजेच या दानकर्माने माझे जीवन सुखी होवो ही भावना दान देणाऱ्याच्या नेहमीच मनामध्ये असावी. दान देवून आपण कोणावर उपकार करीत नाही किंवा हे दान देवून आपण आपले धन व्यर्थ खर्च करीत आहोत असे वाटून घेवू नये. तर आपण पुण्य अर्जित करीत आहोत. मग जसजसा आपला पुण्यकर्मावर दृढ़ विश्वास बसेल तसतसे आपल्याला दान देताना सढ़ळ हाताने दान देण्याची सवय लागेल. दान शुद्ध चित्ताने द्यावे ते देताना त्रास होता कामा नये.परंतु पूर्वी जे दान देत आलो किंवा नेहमीच जे ठराविक दान देत आलो त्यापेक्षा अधिक दान देण्याचा मनापासून नक्कीच प्रयत्न करावा.धम्म कार्यासाठी दान किती द्यावे याचे योग्य उत्तर आहे आपण कमावत असलेल्या कमाईचा 20 वा हिस्सा प्रत्येकाने अवश्य दान दिलाच पाहिजे. उदा.जर एक व्यक्ती महिन्याला किमान पन्नास हजार रुपये कमवत असेल तर त्याने धम्म विनयानुसार दरमहा अडीच हजार रुपये आर्थिकदान दिले पाहीजे. प्रापंचिक कारणास्त्व जर सुरुवातीला इतके दान देणे शक्य नसले तरी दरमहा महिन्याला यथाक्ती दान देवून पुण्यकर्म करावे. जर दान देण्याची भावना मनात आली तर मग बुध्द विहारात येण्याची इच्छा उत्पन्न होईल. जे दान धम्म कार्यासाठी दिले त्या विचारातून आंतरिक सुख मिळेल.दान दिल्यानेच दरिद्रता नष्ट होते. दान देणे हा मानवाचा सद्गुण आहे.जो कुशल कर्मावर विश्वास ठेवून दान करतो त्याचे आपत्ती, विपत्ती पासून संरक्षण होते. दान हे शीलवान व्यक्तीस द्यावे,जे शील ,समाधि व प्रज्ञेचा निरंतर अभ्यास करतात. ज्यांनी आपल्या चित्तातिल क्रोध, लोभ,द्वेष समूळ नष्ट केला आहे. पुजनीय भिक्खू संघाला दान देणे कारण ते महान पुण्याचे क्षेत्र आहे. जे त्या दानाचा उपयोग पुन्हा लोकांच्या हितासाठी,कल्याणासाठीच करतात.त्या दानाचा उपयोग भव्य बुध्द विहारनिर्मितिसाठी,भिक्खू निवास संघासाठी,ध्यानसाधना केंद्र निर्माण करण्यासाठी,धम्म प्रचार प्रसारासाठी, बाल संस्कार वर्ग चालविन्यासाठी, धम्म संस्कृति रुजविन्यासाठी,धम्म प्रशिक्षणकेंद्र उभारन्यासाठी तसेच जे धम्म प्रचार प्रसारासाठी धम्म उपासक उपासिका,साधक साधिका, बौद्धाचार्य, पाली भाषा प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, बुध्दलेणी,स्तुप संवर्धन करणारे धम्मसेवक जे अहोरात्र उल्लेखनीय निःस्वार्थभावनेने कार्य करतात. अश्या शीलवान,प्रामाणिक परंतु गरजु कार्यकर्त्याच्या, प्रवासासाठी,प्रचाराची साहित्य खरेदीसाठी,त्यांच्या आरोग्यासाठी आदी.ठिकाणी निसंशय भावनेने दान दिलेच पाहिजे. हे दान केवळ एकदाच देवून चालणार नाही तर वेळोवेळी सतत नियमित दान देवून ते कार्य तडिस नेइपर्यंत दान देण्याची सवय अंगी बाणली तरच खऱ्या अर्थाने आपले जिवन सुखी होईल. ज्या बौध्द धम्माचे आपण पाइक आहोत.या धम्माचे संस्थापक तथागत भगवान बुध्द यांनी मानवी कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवनदान केले,आपले राजवैभव, प्रिय माता पिता शुद्धोधन माता प्रजापति गौतमी, धनसंपत्ति, अतीसुंदर पत्नी माता यशोधरा, एकुलता एक मुलगा राहुल आदी. एवढे महान सर्व प्रकारे दान केले. तसेच प्रियदर्शी महान बौध्द शासक सम्राट अशोक यांनी देखील सर्व धन संपत्ती, राजसत्ता, स्वतःची मुलगा (महामहेन्द्र)मुलगी(माता संघमित्रा) तर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य, संसारिक जीवन, परिवार, स्वतःची चार मुले औषधाविना गेली तरी देखील समाज व भारतातील समस्त जनतेच्या उद्धाराचे कार्य अविरत न थकता न थांबवले नाही.त्यांच्या या महान त्यागाचा आदर्श आपल्या सर्वांच्या समोर असूनही बौध्द समाजातील अजुनही पुष्कळ लोक केवळ परिवारातील प्रासंगिक कार्यक्रमाच्या वेळीच दान करतात तेही दान देण्याची इच्छा नसून फक्त कार्यक्रम आहे म्हणून द्यावे लागते त्यासाठीच दान करतात.ऐरवी दानाचे महत्व लक्षात घेत नाही.
अश्या सर्वांना दान पारमितेचे खरे महत्व कळावे यासाठी हाच लेखन प्रपंच….
दान धर्मासाठी करणे अती आवश्यक आहे.नव्हे तर दान हाच गृहस्थी लोकांचा मंगल(श्रेष्ठ) धर्म आहे हे नेहमीच लक्षात ठेवावे. बौध्द साहित्यामध्ये वर्णन केलेल्या सुजाताचे खीर दान,आम्रपाली चे आम्रवन, अनाथपिंडकाचे जेतवन, विशाखेची दानशूरता ही उदाहरण आपल्याला दान पारमितेकडे घेवून जाणारे दीपस्तंभ आहे.श्रीलंका देशात बुध्द विहारात बुध्द वंदना झाली की लगेच उपस्थित उपासका उपासिका मध्ये आर्थिकदान करण्यासाठी एक ताट फिरवतात .हे श्रीलंकन लोक मोठ्या मनाने प्रत्येक वेळी नियमित दान करतात. मुलांना दान देण्याची सवय शालेय जिवनात लागावी म्हणून मुख्य रस्त्यावर चौकामध्ये धम्म डोनेशन बॉक्स बसविले आहे.ते लोक केवळ आर्थिकदान करीत नाही तर आपला स्वतः चा मुलगा किंवा मुलगी देखील भिक्खू संघाला दान देवून महान पुण्य करतात. दान करणे म्हणजेच त्याग करणे होय. म्हणून आपल्याला दान करण्याची संधी उपलब्ध होत असते त्यावेळी आपण स्वतः च्या व परिवाराच्या सुखाकरिता, प्रगतीसाठी नियमित यथाशक्ति दानकर्म केलेच पाहिजे.सर्वप्रथम धम्मकार्यासाठी वेळ दान करावा. नंतर परिश्रम दान करावे. त्यांनंतर वस्तू साहित्य स्वरुपात किंवा आर्थिकदान द्यावे. पैगोडा किंवा बुध्द विहार,स्तूप,चैत्य, निर्माण करण्यासाठी सोने(सुवर्ण) दान करावे व शेवटी आपली संतती म्हणजेच स्वतः चे मुले धम्म कार्यासाठी दान करावी अशी क्रमवार दान पारमिता पूर्ण करावी. प्रासंगिक कार्यक्रमा व्यतिरिक्त किमान प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी धम्मकार्यासाठी सांघिक दान देण्याची वृत्ती अंगिकारणे आवश्यक आहे.
कारण भगवंताने मनुष्य व श्रेष्ठ पुरुषाच्या कल्याणासाठी महामंगल सुत्तात्त सांगितल्या प्रमाणे,
दानं च धम्मचरया च,ञातकानं च सग्ङहो |
अनवज्जनि कम्मानि,एतं मग्ङलमुत्तमं||
✍️लेखन – आयु-मिलिंद उद्धवराव बनसोडे (बौद्धाचार्य)
22 प्रतिज्ञा मुख्य प्रचारक,नाशिक
प्रशिक्षक धम्मकाया बाल संस्कार वर्ग,नाशिक
मो.9960320063
More Stories
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार Replica of Bamiyan Buddha statue to be built in Nagpur
भीमटेकडीवर जागतिक धम्म परिषदेचा दुसऱ्या दिवशीही उत्साह उसळला., बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या– रामदास आठवले
🌼 दिवस ३ – धम्मपद महोत्सव (मुख्य दिवस) फग्गुण पुन्नमी – पूज्य आचार्य बुद्धरक्षित महाथेर यांची १०४ वी जयंती