संबोधी प्राप्त झाल्यानंतर भ.बुद्धांनी ४५ वर्षे धम्माचा प्रसार केला. त्यांचा पायरव हा आत्ताच्या उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात होता. मात्र एवढ्या सीमित प्रदेशात फिरत असताना देखील, बुद्धविचार सगळ्या जगात पोहोचले आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा धम्म पोहचविणारे भिक्खू हे बुद्धीविचारातून प्रेरणा घेत, स्वयं प्रयत्नाने तेजाळलेले होते. मनुष्याच्या प्रति करुणा जागृत झाल्याने, हे मानवतावादी विचार सर्वदूर पोहचविण्या साठी ते कोणतेही कष्ट उपसायला तयार होते आणि म्हणूनच जगातील सर्वोत्तम मानव म्हणून बुद्धांचा आदर केला जातो.
सर्व जगात बुद्धीविचार कसे पोहचले हे दोन भागात “शहर मुंबई” मध्ये प्रकाशित होत आहे. त्यातील पहिला भाग वाचा…
धम्माचा सिंहनाद चोहीकडे…
संबोधी प्राप्त केल्यानंतर भ.बुद्धांनी ४५ वर्षे मगध प्रांतात धम्माचा प्रसार केला. सम्राट अशोक यांनी हा मानवतावादी धम्म जगभर नेला. बुद्धविचारांचा प्रसार सर्व दिशांना व्हावा म्हणून सम्राट अशोक यांनी खास स्तंभ उभारून त्यावर चार दिशेला तोंड असलेले चार सिंहांचे शीर्षस्तंभ उभारले. त्याचा अर्थ हा आहे कि भ.बुद्धांनी सांगितलेली मानवतावादी शिकवण, चारही दिशेला सिंहानादासारखी पोहचावी! कुठलाही विध्वंस अथवा रक्तसंहार न करता, कुठलीही बळजबरी न करता, केवळ मानवतावादी दृष्टिकोन असलेला बुद्धविचार, वेगवेगळ्या कालखंडात जगातील प्रत्येक कोपऱ्यात कसा पोहोचला याचा हा रोचक इतिहास…
श्रीलंका: सम्राट अशोक यांनी महिन्द आणि संघमित्त यांना श्रीलंकेस बुद्धविचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यास पाठविले. श्रीलंकेचा राजा वट्टगामिनीच्या काळात, पालि त्रिपिटक सगळ्यात पहिल्यांदा लिपिबद्ध झाले. चीनी बौद्ध भिक्खू फा-हियान यांच्यानुसार त्याकाळात अभयगिरी मॉनेस्ट्री मध्ये १४,००० भिक्खू राहत होते. त्यानंतर अनेक भारतीय बौद्ध आचार्य यांनी श्रीलंकेत जाऊन त्रिपिटकाचा अभ्यास केला. भारत, थायलंड, लाओस, कंबोडिया, म्यानमार या देशांबरोबर श्रीलंकेने, बुद्धविचारांच्या प्रसारासाठी अनेक बौद्ध आचार्यांची आदानप्रदान केली. संपूर्ण बौद्ध राष्ट्र असलेल्या श्रीलंकेत आजही, प्रत्येक गावांत एक बुध्दविहार, एक चैत्यगृह, भिक्खूंसाठी राहण्याची खोली, ध्यान व धम्माभ्यास करण्यासाठी सभागृह, एक बोधिवृक्ष, एक ग्रंथालय, एक अतिथीगृह आणि एक उपोसथगृह बांधलेले असते.
अफगाणिस्तान: सम्राट अशोक यांनी सर्वात प्रथम येथे बौद्ध भिक्खूंना पाठवून धम्माचा प्रसार केला. नंतर कनिष्काच्या काळात धम्माची भरभराट झाली. बौद्ध संस्कृतीने चित्रे, शिल्प आणि लेणीं या माध्यमातून बुद्धविचार संपूर्ण राज्यात पसरविले. कनिष्काच्या काळातच सर्वात पहिल्यांदा मानवी आकृतीतील बुद्धशिल्प कोरण्यात आले. बौद्ध संस्कृतीची ओळख निर्माण करणारी गांधार शिल्पे तयार झाली ज्यांची ख्याती आज जगभर आहे. अफगाणिस्तान मधे असलेले बामियान बुद्धशिल्प, हजारों स्तूप आणि विहार यांची निर्मिती कनिष्क आणि नंतरच्या कुशाण राजांनी केली. आजही उत्खननात प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अवशेष पाहायला मिळतात.
थायलंड: श्रीलंकेतून बुद्धविचार थायलंडला पोहोचले. अतिशय वैज्ञानिक आणि मानवकल्याणाचा मार्ग येथील राजांनाही पटला आणि त्यामुळे ६व्या शतकापासून थायलंड एक बौद्ध राज्य म्हणून विकसित झाले. आज थायलंडमध्ये ३५,००० मॉनेस्ट्रीस आहेत तर जवळपास तीन लाख भिक्खू वेगवेगळ्या संघात कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त चीन, व्हिएतनाम यांची बुद्धविहारे येथे आहेत. थायलंडमध्ये ९७% बौद्ध असून, ३% परदेशातून स्थायिक झालेले ख्रिश्चन आहेत. थायलंड मध्ये बुद्धरुप घडविण्याचे अनेक कारखाने आहेत आणि तेथील अतिशय सुंदर बुध्दरूपांना जगभरातून मागणी येते. बुद्धरुप दान करणे हा तेथील लोकांसाठी श्रद्धेचा भाग असून, भारतातील अनेक विहारांना अथवा संस्थांना तेथील लोकांनी बुद्धरुप दान दिले आहे.
बांगलादेश: भ.बुद्धांच्या काळापासून बांगलादेश हा भारत आणि म्यानमारला जोडला गेला आहे. त्यामुळे चितगाँग भागात बौद्ध भिक्खू व उपासक प्राचीन काळापासून आहेत. १३व्या शतकापासून मुस्लिम राजवटीने बौद्धांना त्रास द्यायला सुरुवात केली. १८५६ मध्ये येथील महास्थवीर राधाचरण यांनी म्यानमार येथील महास्थवीर सारामित्र यांना बांगलादेश मध्ये येण्याचे आमंत्रण दिले. १८६४ मध्ये सारामित्र यांनी म्यानमार येथील अभ्यासू बौद्ध भिक्खूंना घेऊन बांग्लादेशमध्ये पुन्हा आले आणि बुद्धविचारांचा प्रसार अतिशय प्रभावीपणे झाला. नंतर बांगलादेश मध्ये बौद्ध संघाची स्थापना झाली. विशेष म्हणजे भारतातून जेव्हा पालि भाषा हद्दपार झाली होती, त्यावेळेस देखील चितगाँग भागात पालि भाषा बोलली जायची.
भूतान: जगातील सर्वात समाधानी लोक असलेला हा देश सुरुवातीपासून बौद्ध धम्माचा उपासक होता. हे लोक मूळचे तिबेटचे रहिवासी होते आणि म्हणूनच तिबेटी लामांची परंपरा ते जपतात. बुद्धविचारांनीच मानवाची प्रगती होऊ शकते हा ठाम विश्वास येथील लोकांमध्ये आहे; त्यामुळेच बौद्ध धम्माचे येथे काटेकोर पालन केले जाते. म्हणूनच अहिंसावादी भूमिकेतून कोणत्याही युद्धात भाग न घेण्याच्या भूमिकेमुळे, भूतान नेहमीच तटस्थ राहिला आहे आणि त्यामुळेच या देशावर कोणी हल्ला करू शकत नाही अथवा त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही.
चीन: चीनमध्ये बुद्धविचार साधारणतः पहिल्या शतकात पोहचला. बुद्धविचार जाणून घेण्याच्या उत्सुकतेने, चीनने भारतातून अनेक बौद्ध आचार्यांना आमंत्रित केले आणि त्यांच्याकडून संपूर्ण बुद्धविचार लिहून घेतले. इ.स. दुसऱ्या शतकापासून ते १९व्या शतकापर्यंत अनेक प्राचीन बौद्ध ग्रंथांची भाषांतर करण्यात आली आहेत आणि हे काम आजतागायत सुरु आहे. त्यामुळे भारतातून नष्ट झालेले हजारों ग्रंथ आजही चीनी भाषेत सुरक्षित आहेत. बौद्ध आचार्य कुमारजीव, गुणभद्र, बोधिरूची, धर्मक्षेमा, नरेन्द्रयास, अमोघवज्र यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विहारांमध्ये हे भाषांतराचे काम झाले. आचार्य बोधीधर्म यांनी ध्यान पद्धत चीन मध्ये पोहोचविली. फा-हियान, युआन त्सांग, इ-त्सिंग सारखे बौद्ध भिक्खू भारतात येऊन धम्माचे ज्ञान व ग्रंथ चीनमध्ये घेऊन गेले. चीनच्या संस्कृतीमध्ये बुद्धविचारांचे गारुड दिसते. त्यांचे नाट्य, संगीत, काव्य, गीत, शिल्पकला, स्थापत्य, आयुर्विज्ञान, खगोलशास्त्र, भाषा-लिपी हे सर्व बुद्धविचारांनी प्रभावित झाले आहे. चायनीज बुद्धिस्ट असोसिएशन ही सर्वात मोठी संस्था असून, १९२९ पासून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय सांगोष्ठी आयोजित करीत असते.
हाँगकाँग: साधारणतः इ.स.४२८मध्ये ब्यू दु नावाच्या बौद्ध भिक्खुंनी येथील बुद्धविहाराचे नूतनीकरण व नामकरण केल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच ४थ्या शतकापूर्वीच हाँगकाँगमध्ये बुद्ध विचार पोहोचले होते. १९५७ साली, हाँगकाँगमध्ये ८३ बौद्ध मोनेस्टरी होत्या ज्या मुख्यतः भिक्खुणींसाठी बांधल्या होत्या. द हाँगकाँग बुद्धिस्ट असोसिएशन ही सध्या सर्वात मोठी बौद्ध संस्था आहे.
कंबोडिया: ५व्या शतकापूर्वी येथे बुद्धविचार पोहोचले होते. प्रामुख्याने थेरवाद परंपरा मानणाऱ्या या देशात, १२३० साली राजा जयरामन याने पालि भाषेला राजमान्यता देत सर्व विधी पालि भाषेत करावेत असा आदेश काढला होता. ख्मेर राजवटीने अंगकोर वट वसवले होते मात्र १४३१ मध्ये सोडून गेले. त्याच दरम्यान थेरवाद परंपरा येथे अग्रेसर झाली, मात्र १९७५ साली उसळलेल्या वांशिक संघर्षात पोल पॉट याची कम्युनिस्ट राजवट आली आणि तिने सर्व भिक्खू-भिक्खुणींवर अत्याचार करीत त्यांना हाकलून लावले. १९७९ मध्ये व्हिएतनामच्या आक्रमणानंतर, येथे बुद्धविचारांचा प्रसार पुन्हा सुरु झाला. १९९३ पासून कंबोडियात, बौद्ध धम्माला पुन्हा मनाचे स्थान प्राप्त झाले.
तिबेट: समुद्रसपाटी पासून सोळा हजार फूट, जगातील सर्वात उंचीवर वसलेली लोकवस्ती म्हणजे तिबेट! त्याच्या आजूबाजूला उत्तर-पश्चिम भारत, चीन, नेपाळ, मध्य आशिया हे सगळे बौद्ध संस्कृतीने प्रभावित झालेले देश होते. ६व्या शतकात, राजे सोंगतसें गंपो यांनी तिबेटच्या काही विद्वानांना बौद्ध संस्कृतीचा अभ्यास तसेच तिबेटसाठी लिपि आणि भाषेचे व्याकरण तयार करण्यास, भारतात पाठवून दिले. चीन आणि नेपाळच्या राजकन्यांशी लग्न करून सोंगतसें यांनी या देशांबरोबर राजनैतिक व कौटुंबिक संबंध स्थापन केले. त्यांच्या चीनच्या राणीने सर्वात प्रथम येथे एक विहार बांधून त्यात बुद्धरुप प्रतिष्ठापित केले. तिबेटचे राजे स्वतःला ‘धर्मराजे’ म्हणवून घेत असत. पुढे ७व्या शतकात, बौद्ध आचार्य पद्मसम्भव आणि शांतरक्षित हे तिबेट मध्ये धम्मप्रसारासाठी गेले. आचार्य पद्मसम्भव यांना गुरु रिंपोचे असेही म्हटले गेले आहे.त्यांनीच तिबेटमध्ये सर्वात पहिली बौद्ध भिक्खूंची मॉनेस्ट्री सुरु केली. यामुळे चीन आणि भारतामधील अनेक बौद्ध आचार्य या भूमीकडे आकृष्ट झाले. एकदा चीन मधील बौद्ध आचार्य हुआ शांग आणि भारतातील बौद्ध आचार्य कमलशील यांच्यात वादविवाद ठेवण्यात आला ज्यात कमलशील जिंकले आणि त्यामुळे तिबेटमध्ये भारतीय बौद्ध शिकवण कायम करण्यात आली. आक्रमण करण्यासाठी आलेल्या चंगेज खानने देखील बौद्ध संस्कृती जपण्यासाठी मदत केली. १५५२ मध्ये येथे दलाई लामा परंपरा सुरु झाली जी आजतागायत चालू आहे.
मंगोलिया: चीनमध्ये बुद्धविचार पोहोचल्यानंतर त्यांचा प्रसार मंगोलिया मध्ये देखील झाला. १२४० मध्ये चंगेज खान याचा नातू, राजकुमार गोदन याने तिबेटवर आक्रमण केले, मात्र त्याला कुणी विरोध केला नाही जे त्याला अनपेक्षित होते. त्यावेळेस तेथील लामा शाक्य पंडीदा यांनी गोदन याला बुद्धविचार ऐकिवले. राजकुमाराला ते विचार खूप आवडले आणि त्याने बौद्धधम्माचा स्वीकार केला मात्र मंगोलिया जनतेवर त्याने ते लादले नाहीत. पुढे त्याचा भाऊ, कुब्लाई खान याने बौद्धधम्माला राजधर्म केला. १५५२ मध्ये अल्तान खान याने तिबेट कडे पुन्हा एखाद्या धर्मगुरूंची मागणी केली. त्यावेळेस सोनम ग्यातसो नावाचे बौद्ध आचार्य मंगोलियाला गेले असता अल्तान खानने त्यांना आदराप्रीत्यर्थ ‘दलाई लामा’ ही पदवी बहाल केली ज्याचा अर्थ होतो – प्रज्ञासागराचा गुरु. मंगोलियन राजांनी अनेक बुद्धविहारे, स्तूप बांधली. १९२९ साली, मंगोलियातील कम्युनिस्ट राजवटीने मंगोलियातील २५०० बुद्धविहारे नष्ट केली आणि २०,००० भिक्खूंना मारून टाकले. १९६० मध्ये मंगोलियात पुन्हा एकदा बुद्धविचारांचा प्रसार सुरु झाला. मंगोलियामध्ये नियुक्त असलेले भारताचे राजदूत, भिक्खू बकुला रिंपोचे यांनी बुद्धविचारांच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले.
जपान: इ.स.५५० मध्ये कोरियाच्या राजांनी जपानच्या राजांना बुद्धरुप, रेशीम कपड्यांवर लिहिलेले बुद्धांचे चरित्र आणि काही चांदीची पात्र भेट दिली. जपानच्या राजांनी एक विहार बांधले आणि त्यात हे बुद्धरुप प्रतिष्ठापित केले. पुढे राजकुमार शोतोकू, ज्याने चीनच्या संस्कृतीचा अभ्यास केला होता, त्याने काही विद्वानांना चीनमध्ये पाठवून धम्म जाणून घेतला. यानंतर जपानमध्ये बुद्धविचार तसेच झेन यांचा प्रसार झपाट्याने वाढला. ७व्या शतकात, तोदा-जी येथे ५३ फूट उंच ब्रॉन्झ धातूचे बुद्धरुप बसविण्यात आले. जपानमध्ये सुरुवातीला फक्त उच्च्भ्रू लोक बौद्धधम्माचे पालन करत, कालांतराने सर्वसामान्यांना देखील बुद्धविचारांचे आकर्षण वाटले. ११व्या शतकापर्यंत जपानमध्ये अनेक वेगवेगळे पंथ सुरु झाले. सोका गोक्कई एक मोठी संस्था असून, जगभर तिच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. जपानी लोकांमध्ये बुद्धविचार मोठ्या प्रमाणात रुजले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कितीही संकटे आली तरी ते न डगमगता त्यातून पुन्हा उभे राहतात.
More Stories
Buddhist Meditation : बौद्ध ध्यानासाठी संपूर्ण मार्गदर्शक: तत्त्वे, तंत्रे आणि फायदे
बौद्ध समाजात भावकी पाहिजे – आद. आयु सयाजी वाघमारे
त्रिरश्मी बुध्दलेणी व वर्षावास परस्पर संबंध