भाग – ५
जातिव्यवस्थेचे निर्मूलन अनुवादाच्या निमित्ताने
त्यामुळे जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे या परंपरेत किती अवघड तरीही किती आवश्यक आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब हे केवळ अस्पृश्योद्धारक आहेत असे म्हणणे पुरेसे होणार नाही (कारण भारतीय अभ्यासक तसे म्हणताना दिसतात) तर जातिव्यवस्थेचा परिघ खूप मोठा आहे, ही समस्या बहुपरिणामी (multi dimension) आहे. याचा ते अतिशय सूक्ष्मपणे विचार करतांना दिसतात. त्यांनी दिलेले जागतिक संदर्भ पाहिले की, ते समकालीन अभ्यासकांच्या किती पुढे होते हे सहज लक्षात येते.
या भाषणाच्यावेळची परिस्थितीदेखील विचारात घेणे आवश्यक आहे. ‘हे माझे कदाचित हिंदूंसमोरील शेवटचे भाषण असेल’ असे सांगत त्यांनी एकवर्षापूर्वी येवला मुक्कामी धर्मांतर करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला होता. ‘हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ ही ऐतिहासिक घोषणा सर्व भारतभर दुमदुमली होती. त्याचे असंख्य पडसाद पुढील काळात उमटत राहिले. तत्कालीन राष्ट्रीय नेते म. गांधी यांच्यासह अनेक धर्मगुरुंनी यावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. बॅरिस्टर सावरकरांनीही प्रतिक्रिया दिलेली होती. या सा-या प्रतिक्रियांचा इत्यर्थ असा होता की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करू नये कारण या घटनेचे दूरगामी परिणाम होतील. ही सारी पार्वभूमी असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आर्यसमाज परिषदेत धर्मांतराची घोषणा करतात की काय अशी भीती त्यांना वाटत होती त्यामुळे त्यांच्या भाषणाच्या संदर्भात प्रत्येक वाक्य फुंकून प्यायची त्यांनी तयारी केलेली होती. शिखांच्या एका कार्यक्रमात बाबासाहेबांची अमृतसरला उपस्थिती होती. त्यामुळे हिंदूधर्म सोडून ते कदाचित शीख, ख्रिश्चन, मुस्लीम होतील या भीतीच्या सावटाखाली ही परिषद भरत होती. या परिषदेच्या निमित्ताने हिंदू समाजाशी प्रत्यक्ष बोलता येईल व त्यांना एक भावी दिशा मिळू शकेल यासाठीही आपली प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी हे अध्यक्षपदाचे निमंत्रण स्वीकारलेले दिसते. समाजाला विचाराच्या पातळीवर आणून विचारप्रवृत्त करण्याचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न असावा म्हणूनही या घटनेकडे बघावे लागेल.
या वेळेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवमुक्तिदाता व बुद्धिमान म्हणून तत्कालीन हिंदुस्थानने मान्यता दिलेली दिसत नाही. महाड सत्याग्रह, नाशिक काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रहासारखे मानवमुक्तीच्या लढ्याचे सरसेनापती म्हणून त्यांची काळाने दखल घेतली नाही तर ‘ अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी एका अस्पृश्य पुढा-याने उभी केलेली चळवळ’, अशी तिची संभावना केली गेली होती. त्यांच्या बौद्धिक सामर्थ्याची कल्पना भारतीय विद्वानांना आलेली नव्हती. त्यासाठी असणा-या व्यापक मानवतावादी दृष्टीचा अभाव या विद्वानांकडे असावा एवढेच या संदर्भात आपणास म्हणता येईल. बुद्धिवादी व्यक्तींमध्ये त्यांची गणना करण्यास तत्कालीन इतिहासलेखकांना, अभ्यासकांना वेळ मिळाला नव्हता.
🔹 संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर
More Stories
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ९
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ८
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ७