भाग – ३
जातीव्यव्थेचे निर्मूलन अनुवादाच्या निमित्ताने
या समितीच्या निर्णयाप्रमाणे इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन १४ एप्रिल २०१३ रोजी मा. नामदार राजेश टोपे, उच्च शिक्षणमंत्री तथा मा. अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये करण्यात आले. याच कार्यक्रमात मा. मंत्री महोदयांनी याचा मराठी अनुवाद मराठी वाचकांसाठी तेवढ्याच अल्प किमतीत लवकरच प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते. ही मराठी आवृत्ती त्याचाच एक भाग आहे.
अनुवाद समितीने या ग्रंथाचा अनुवाद करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे कार्यरत असलेले इंग्रजी विषयाचे प्राध्यापक प्रकाश सिरसट यांच्यावर सोपविली. त्यांनी अथक मेहनतीने हा प्रकल्प दोन महिन्यांत पूर्ण केला. या अनुवादाच्या योग्य-अयोग्यतेसंबंधी शिफारस करण्याची जबाबदारी प्रसिद्ध आंबेडकर साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रा. अशोक गोडघाटे, नागपूर यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांच्या अभिप्रायासह प्रा.प्रकाश सिरसट, सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांच्यासह समितीच्या कार्यालयात झालेल्या दोन दिवसांच्या बैठकीत प्रत्येक ओळीवर चर्चा करण्यात आली. डॉ. गोडघाटे यांनी केलेल्या सूचनांचा साधक-बाधक विचार झाला. त्यांनी समाधान व्यक्त केल्यानंतर व समितीची मंजुरी घेतल्यानंतर हा अनुवाद मुद्रणालयाकडे सोपविण्यात आला. अनुवाद चांगला झाल्याबद्दल अनुवाद समितीने समाधान व्यक्त केले आहे. या तांत्रिक मुद्यांची चर्चा येथे अवास्तव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु समितीचे काम कसे चालते यासंबंधीची माहिती वाचकांपर्यंत जावी यासाठी हे नमूद करणे आवश्यक वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे एक ऐतिहासिक भाषण आहे. जातिसंस्था व तिच्या कार्यपद्धतीवर या भाषणात जेवढ्या खोलवर जाऊन बाबासाहेबांनी विचार केला आहे, तेवढा इतर कोणी केला असावा असे वाटत नाही. जातिसंस्था हे भारतीय समाजजीवनाचे एक अंगभूत वैशिष्ट्य आहे. जगामध्ये विषमता आहे, उच्च-नीचतेचा एक संघर्ष आहे पण त्याला भारतातल्यासारखी ‘पावित्र्याची’ जोड नाही. त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे. परंतु भारतात ती जन्मजात असल्यामुळे व तो देवी व धार्मिक आदेशानुसार असल्याची एक मानसिकता भारतीय व्यक्तीमध्ये असल्यामुळे त्यात बदल नाही. त्यामुळे जगभरातील समाजव्यवस्थेचा समता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु जेथे जेथे ही विषमता धर्माधिष्ठित पावित्र्याच्या कल्पनेत अडकली तेथे अधिकार मिळूनही मानवीसमूह पंगू बनतो. त्यासाठी केवळ समतेवर आधारित समाजरचना उभी करणे पुरेसे ठरत नाही, तर धर्माच्या नावाने झालेले संस्कार व त्यातून निर्माण झालेली मानसिकता हटविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी सोदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
🔹संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर
मो.९७६२२८६३७१
More Stories
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ९
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ८
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ७